एके दिवशी सकाळच्या उन्हात माखलेला एक जण भेटला ओळखीचा वाटला म्हणून
एके दिवशी सकाळच्या उन्हात माखलेलाएक जण भेटला ओळखीचा वाटला म्हणून
ख्याली-खुशाली घेतली तर म्हणाला,
“माहीत नाही मजला
मी जगलो कसा अन मेलो कसा
आलो तसाच गेलो
ना वाटले जगावे ना वाटले मरावे”
त्याच विचार चक्रात गुंतून राहीलो
दुपार होईपर्यंत...
तोच रस्त्यावरून जाणारा दुसरा एक जण
बोलता बोलता म्हणाला,
“दिसत नसले जरी
मृत्यूच्या गावात घर माझे;
याचा अर्थ जीवनाच्या गावात माझे
वास्तव्य आहे असा होत नाही”
विचार चक्राने मग तर अधिकच
वेग घेतला... सावल्या विखरून गेल्या
पक्षी घरट्याकडे परतायला लगलेले
नदीच्या काठावर पाण्यात पाय सोडून
बसलेला एक जण दिसला;
तसा माझ्याकडे पाहून हसला
हसत हसतच म्हणाला,
“जगतो असा मी की मृत्यूसही वाटते जगावे
धुंद होऊन जगातल्या कणकणात उरावे”