
तुकाराम गाथा - अभंग १
समचरणदृष्टी विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त नको देवा ॥ध्रु॥ ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥ तुका म्हणे त्याचे कळले आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥
अभंगाचा अर्थ
हे हरी तुमचे चरण विटेवर सम आहेत तुमची दृष्टीही सम आहे आणि अशा तुमच्या साजर्या रूपावर माझी वृत्ती स्थिर राहो. आणि देवा या व्यतिरिक्त मला कोणतेही माइक पदार्थ म्हणजे मायेने व्यापलेले पदार्थ नको व त्या ठिकाणी माझी तृष्णा इच्छा देखील राहू देऊ नका. हे देवा ब्रह्मादिक पदे व या सारखे पदे उच्च ठिकाणी माझे मन जडू देऊ नको कारण ते पद म्हणजे एक प्रकारची दुःखाची शीराणीचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा जे जे काही कर्म धर्म आहे त्याचे वर्म आता आम्हाला समजले आहे ते म्हणजे असे की हे सर्वकाही नाशिवंत आहे.
अभंगाची चित्रे

