#MeToo ने सिनेसृष्टी सोबतच शैक्षणिक क्षेत्र देखील ढवळून काढायला सुरवात केली आहे
अभिनेत्री तनुश्री दत्ता पासून सुरु झालेल्या या वादळाने सिनेसृष्टी सोबतच शैक्षणिक क्षेत्र देखील ढवळून काढायला सुरवात केली आहे. या वादळाचे तडाखे अजून अनेक क्षेत्रांना बसतील असे दिसतंय. या निमित्ताने “बात निकलेगी तो दूर तलक जायेगी” या स्वर्गीय जगजीत सिंग यांची गझल या ठिकाणी आठवण झाली. आजची स्त्री कितीही आधुनिक असली तरी खूप असुरक्षित आहे, घरातही आणि बाहेरही हे प्रकर्षाने जाणवते, मग ती एक सामान्य स्त्री असो किंवा एखादी प्रसिद्ध अभिनेत्री. बसमध्ये, ट्रेनमध्ये गर्दीच्या बहाण्याने होणारे चोरटे स्पर्श असोत, ऑफिसमध्ये जॉब मिळण्यासाठी अथवा प्रमोशन साठी मागितले जाणारे फेव्हर्स असोत किंवा कास्टिंग काऊचची प्रकारणे असोत; आपल्याला नवीन नाहीत. पण ज्या स्त्रियांच्या बाबतीत हे घाणेरडे प्रकार घडतात त्यांच्यासाठी ही गोष्ट नक्कीच सामान्य नसते. वर्तमानपत्रात रोज एक तरी बलात्काराची बातमी वाचायला मिळतेच यावरून या विषयाचे गांभीर्य समोर येते. त्यातील काही प्रकरणे उचलून धरली जातात तर काही काळाच्या ओघात विसरली पण जातात तर काही समोर येताच नाहीत. ती पैशाच्या अथवा मनगटाच्या ताकदीवर दाबून टाकली जातात. प्रत्येक नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तशा इथेही आहेत आणि ही आहे त्याची काळी बाजू. स्त्रिया पुरुषांएवढ्याच किंबहूना अनेक बाबतीत पुरुषांपेक्षाही जास्त सक्षम असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. परंतु अजूनही स्त्रीकडे एक भोगवस्तू म्हणुनच पाहिले जाते ही एक शोकांतिका आहे. अर्थात सर्वच पुरुष असा दृष्टिकोन ठेवत नाहीत हेही तितकेच खरे आहे, नाहीतर स्त्री आज इतकी प्रगत होऊच शकली नसती. चांगल्या पेक्षा वाईटाकडे लगेच आकर्षित होणे हा मनुष्याचा स्वभाव धर्म आहे. लहान पणापासून नकळतपणे आपल्या आईवडिलांकडून, समाजाकडून, शेजारी पाजारी, नातेवाईक यांच्याकडून जास्तीत जास्त नकारात्मकताच मिळत असते. ज्याप्रमाणे आपल्याला सफेद कागद न दिसता केवळ त्यावरील काळा ठिपकाच दिसतो तसेच आपल्याला फक्त वाईट गोष्टीच पाहण्याची सवय लागते. आता हेच पहा ना, एखाद्या दिवशी वर्तमानपत्रात कुठेच बॉम्बस्फोट, बलात्कार, हाणामाऱ्या, टोळीयुद्ध, अत्याचार वगैरे सारख्या नकारात्मक गोष्टी आढळल्या नाहीत तर आपल्या तोंडून आपसूक निघून जाते की, “आज पेपर मध्ये काही राम नाही!” मग आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी वर्तमानपत्र जास्तीत जास्त चटपटीत आणि ब्रेकिंग न्युज देण्याच्या शर्यतीत सर्व नीतिमत्ता, मुल्ये, माणुसकी, सद्सद्विवेक बुद्धी आणि बऱ्याचदा सत्याच्या मानेवर पाय देतात.[next] हळूहळू सर्वच क्षेत्रातून ‘मी टू’ (#MeToo) या मोहिमेअंतर्गत स्त्रिया पुढे येण्याचे धाडस करत स्वतःवरील अन्यायाला वाचा फोडतील. तनुश्री दत्तामुळे स्त्रियांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला आहे. पण सर्व स्त्रियांनी तनुश्रीला भोगाव्या लागलेल्या नारकयातनांचाही विचार करावा. मानसिक त्रास हा शारीरिक त्रासापेक्षा माणसाला जास्त उध्वस्त करतो. तेव्हा स्त्रियांनी केवळ ‘मी टू’ (#MeToo) म्हणुन भागणार नाही तर ज्यांनी अन्याय केला आहे त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळेपर्यंत कितीही त्रास झाला तरीही स्वतःला खंबीर ठेवण्याचे शिवधनुष्य पेलायची ताकदही त्यांना आपल्या अंगी आणणे गरजेचे आहे. प्रवाहाविरुद्ध पोहोणे कधीच सोपे नसते. भारत लोकशाहीवादी देश आहे, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे हे फक्त राज्यघटनेत लिहिलेले आहे. वस्तुस्थिती मात्र विपरीत आहे. सोशल मिडीयावर जरा कोणी काही विधान केले की लोकं ट्रोल करायला सुरवात करतात. जर विधान एखाद्या ऐतिहासिक व्यक्ती किंवा राजकारणी व्यक्ती बद्दल असेल तर मग बघायलाच नको. सत्य असत्य याची खातरजमा करायला इथे वेळ कोणाकडे आहे? ज्या व्यक्तीने विधान केले आहे त्याला दूषणे दिली जातात, अनेक लोक फार खालच्या पातळीला जाऊन त्या व्यक्तीच्या आई बहिणीचा उद्धार करतात. त्याला शोधून काढून देशाला शिस्त लावण्याची धुरा स्वतःहून आपल्या खांद्यावर घेतलेल्या काही तथाकथित पक्षांच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांकडून प्रसंगी मारहाण केली जाते. यात स्त्रियाही मागे नाहीत बरें! इतके दडपण टाकले जाते की त्याला मनात नसतानाही त्याला माफी मागावी लागते आणि आपली पोस्ट काढून टाकावी लागते. कोणी काय बोलावे, कोणते कपडे घालावेत अथवा घालू नयेत हे आजकाल लोक ठरवू लागले आहेत. एखाद्या अभिनेत्रीने तिचे फोटो सोशल मिडीयावर टाकले, किंवा कोणी एखाद्या विषयावर आपले मत मांडले की फक्त लोकांच्या प्रतिक्रिया वाचाव्यात. सुसंस्कृत म्हणवणाऱ्या लोकांच्या तोंडची भाषा वाचून त्यांच्या बुरसटलेल्या आणि खालच्या पातळीच्या विचारसरणीची कीव करावीशी वाटते. कुठे आहे वैचारिक स्वातंत्र्य?
[next] बऱ्याच स्त्रियांच्या तोंडून “ऑल मेन आर डॉग्ज” असे वाक्य बऱ्याचदा ऐकू येते, त्याचे कारण कदाचित त्यांना काही पुरुषांचा आलेला वाईट अनुभव असू शकेल. पण खरंच सर्व पुरुष हे वाईट असतात का? जर तसे असेल तर त्या स्त्रियांचे वडील, भाऊ, मुलगा, काका, मामा वगैरे सर्व पुरुष पण त्यात आले. पण वस्तुस्थिती तशी नसते, आपल्या घरातील पुरुषांचा मात्र त्या स्त्रियांना अभिमान असतो. अशा स्त्रिया त्यांच्या घरातील पुरुषांवर कोणी हल्ला केला किंवा आरोप केले तर त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभ्या राहिलेल्या दिसतात. पण शितावरून भाताची परीक्षा करण्याचे बाळकडू घेऊनच आपण जन्माला आलेले असतो. कुठे बॉम्बस्फोट झाला, हत्याकांड झाले आणि त्यात मुस्लिम समाजाचे लोक सहभागी असल्याचे कळले की सर्व मुस्लिम बांधवांना जसे दहशतवादी संबोधले जाते, हे तसेच आहे. कोणालाही पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगले असे आपण म्हणूच शकत नाही. आपण स्वतः सद्गुणांचे पुतळे आहोत का हे प्रत्येकाने स्वतःशीच पडताळावे मगच इतरांना शहाणपण शिकवायला जावे. लोकांच्या या अंध भक्तीमुळेच बाबा लोक आणि राजकारणी लोकांचे फावते. त्यांच्या एका शब्दसाठी लोक मरायला आणि मारायला तयार होतात. प्रत्येक गोष्ट सत्याच्या कसोटीवर पारखून घेऊन मगच निर्णय घेणे आवश्यक आहे पण आजकाल लोक ऐकीव बातम्या आणि अफवांवर जास्त विश्वास ठेवताना दिसतात आणि फसतात. एका रात्रीत पैसे दुप्पट करायला काय धावतात, फळं खाऊन पुत्र प्राप्तीची अपेक्षा काय ठेवतात, पैशांचा पाऊस पडावा यासाठी लहान मुलांचा बळी काय देतात! अशा अनेक गोष्टी लोकं डोकं गहाण ठेऊन करताना दिसतात.
[next] अचानक आठवले म्हणुन सांगतो. बऱ्याच वर्षांपुर्वी मी माझ्या मैत्रिणीसोबत मुंबईच्या लोकल मधून प्रवास करत होतो तेव्हा गर्दीने तुडुंब भरलेल्या त्या लोकल मध्ये आम्हाला कशी बशी जागा मिळाली. माझी मैत्रीण बडबडी असल्यामुळे तिची आपली बडबड सुरु होती. अचानक माझे लक्ष समोर बसलेल्या एका माणसाकडे गेले. तो अधाशीपणे माझ्या मैत्रिणीला नखशिखांत न्याहाळत होता, अगदी कसलाही विधिनिषेध न बाळगता. मी त्या व्यक्तीकडे रागाने पाहू लागलो, थोड्या वेळात त्याची नजर माझ्या नजरेला भिडली आणि तो ओशाळला आणि त्याने नजर दुसरीकडे फिरवली. मी थोडा रिलॅक्स होतो न होतो तोच तो पुन्हा माझ्या मैत्रिणीकडे त्याच नजरेने पाहू लागला. मी प्रचंड अस्वस्थ झालो पण माझ्या मैत्रिणीचे त्याच्याकडे लक्षही नव्हते तिची आपली बडबड सुरूच होती. आमचे स्टेशन आले म्हणुन आम्ही उठलो तसा तोही उठला आणि तिच्या जवळ जाऊ लागला तसा मी पुढे होऊन त्याला बाजूला ढकलले आणि माझ्या मैत्रिणीच्या मागे उभा राहिलो. आम्ही दरवाज्याच्या दिशेने पुढे सरकू लागलो. म्हटले चला सुटलो एकदाचे त्या प्रवासातून. कहर तर तेव्हा झाला की माझ्या मागुन त्याने माझ्या मैत्रिणीला स्पर्श करायचा प्रयत्न केला मग मात्र माझा संय्यम सुटला आणि मी तसाच त्याचा हात पकडून त्याला पुढे ओढला आणि एक सणसणीत त्याच्या थोबाडात ठेऊन दिली. ट्रेन थांबली तसे आम्ही खाली उतरलो. बरेचसे पुरुष आणि काही महिला गोळा झाल्या आणि झालेला प्रकार कळताच तिथे जमलेल्या पुरुषांनी त्याला धु धु धुतला. प्रकरण वाढविण्याऐवजी त्याला समज देऊन सोडून दिला.
[next] सांगायचे तात्पर्य हे की डब्यात तुरळक स्त्रिया होत्या आणि बहुतांश पुरुष होते. ज्याने हा प्रकार केला तोही एक पुरुष होता आणि ज्यांनी त्याला मारले तेही पुरुषंच होते. असे प्रकार करणारे विकृत पुरुष खूप कमी असतात पण त्यांच्यामुळे सर्व पुरुषांना त्यांच्या पंगतीत बसवले जाते. या सगळ्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला म्हणालो की ज्या पद्धतीने तो तुझ्याकडे पाहत होता ते पाहता मी एक पुरुष असूनसुद्धा मला प्रचंड किळस वाटली तर तुला किती बेकार वाटले असेल! यावर ती मला म्हणाली हे तर माझ्यासाठी आणि इतर स्त्रियांसाठी रोजचेच आहे, कोणा कोणाच्या तोंडाला लागणार. त्यामुळे मी अशा लोकांच्याकडे लक्षच देत नाही. तिच्या या वाक्यामुळे मला एक गोष्ट जाणवली की स्त्रियांना रोज किती मानसिक त्रासातून जावे लागते. आम्हा पुरुषांची ही नैतिक जवाबदारी आहे की जर एखाद्या स्त्रीसोबत असे काही घडत असेल तर ती स्त्री आपल्या घरातील असो वा दुसऱ्याच्या, ओळखीची असो व अनोळखी; त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवला पाहिजे, तिचे रक्षण केले पाहिजे.
[next] ‘मी टू’ (#MeToo) या मोहिमेतून अनेक विकृत पुरुष समोर येतील. त्यातील काही खरंच तसे वागले असतील तर काही निर्दोषही असतील. स्त्रियांकडून या मोहिमेचा चुकीचा वापर करून निर्दोषांना विनाकारण त्रास दिला जाऊ नये म्हणजे मिळवले. बहुतांश कायदे स्त्रियांच्या बाजूने असल्यामुळे अनेक स्त्रिया याचा गैरवापर करत असल्याचे देखील आढळून आले आहे. जे दोषी आहेत ते कितीही मोठ्या पदावर असोत, सेलिब्रिटी असोत, सकारात्मक भुमिका करणारे कलाकार असोत, निर्माते वा दिग्दर्शक असोत; सर्वाना शिक्षा ही झालीच पाहिजे. मग घटना कितीही जुनी असो, पूर्वी तक्रार केलेली असो व नसो, त्याची पोलिसांनी दाखल घेणे गरजेचे आहे. अशा घटनांमध्ये स्त्रीच्या अस्मितेला धक्का बसलेला असतो, ती अंतर्बाह्य हादरलेली असते त्यामुळे कधी कधी दबावामुळे, डिप्रेशनमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे ती तक्रार करू शकत नाही. पण अशा पिडीत स्त्रियांच्या मागे त्यांच्या कुटुंबीयांनी खंबीरपणे उभे राहून लवकरात लवकर तक्रार नोंदवली पाहिजे म्हणजे त्यांना लवकर न्याय मिळणे शक्य होईल. बऱ्याचदा अशा घटनांचे पुरावे मिळत नाहीत त्यामुळे आरोपी संशयाच्या बळावर निर्दोष सुटतात.
[next] बऱ्याच अभिनेत्रींना जेव्हा पब्लिकमध्ये जावे लागते तेव्हा पुरुषांच्या घाणेरड्या स्पर्शाना आणि नजरांना सामोरे जावे लागते. सोशल मिडीयावर अशा घटनांचे शेकडो व्हिडीओ आढळतात. अशा घटनांचे वार्तांकन जास्तीत जास्त चटपटीत प्रकारे सादर करताना स्त्रियाच आढळतात हे आणि विशेष. 'बाईचं बाईची शत्रू असते' या उक्तीचा इथे प्रत्यय येतो. असो या व्हिडिओंमुळे काही प्रकरणांमध्ये खऱ्या आरोपींना पकडून शासन करणे शक्य झाले आहे ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल. कारण त्या व्यक्तीच्या कृत्याचा ढळढळीत पुरावाच मिळाला ना! आजकाल सर्वांकडे चांगल्या प्रतीचे व्हिडिओ कॅमेरे असलेले मोबाईल्स असतात. स्त्रियांनी असे प्रसंग आल्यास धैर्य दाखवावे आणि आपल्या अक्कल हुशारीने तो प्रकार जर कॅमेऱ्यात कैद केला तर गुन्हा दाखल करताना आणि पुरावा म्हणुन त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो. आपल्या सुरक्षेसाठी इतरांवर अवलंबून न राहता स्त्रिया सजग राहून स्वतःला वाचवू शकतात. स्त्रियांनी चुकीच्या गोष्टीला वेळीच रोखले पाहिजे आणि ठामपणे विरोध केला पाहिजे नाहीतर त्या व्यक्तीची हिंम्मत वाढते आणि पुढे नको तो प्रकार घडून बसतो. जे योग्य वाटत नाही त्याला स्त्रियांनी नाही म्हणणे गरजेचे आहे. स्त्रियांना सिक्स्थ सेंस असतो असे म्हणतात. त्यांना पुरुषाची वाईट नजर, आणि स्पर्षामागचा उद्देश लगेच कळतो, मग त्याचा त्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे. अशा व्यक्तीला वेळीच रोखले पाहिजे आणि वेळीच त्याच्यापासून दूर झाले पाहिजे ज्याने अनर्थ टळू शकेल. आपल्या वागण्यातून चुकीचा संदेश समोरच्या व्यक्तीला जात तर नाही याचीही स्त्रियांनी काळजी घेतली पाहिजे.
[next] भारतीय समाजाची मानसिकता फारच विचित्र आहे. जे लहानपणापासून आपण ऐकत आलो आहोत त्याच्या विरुद्ध त्यांना काहीही खपत नाही. अमुक एक व्यक्ती चांगली म्हणजे चांगलीच ती कधीच वाईट वागू शकणार नाही आणि एखादी व्यक्ती वाईट म्हणजे वाईटच. याचाच गैरफायदा तथाकथित इतिहासकारांनी घेतला. इतिहासात आपल्याला हवे तसे बदल केले आणि मुर्ख समाजाने डोळे झाकून त्याचा स्विकार केला. जर चांगले आणि वाईट याचे मिश्रण म्हणजे माणूस आहे असे आपण म्हणतो, चुका करणे हा मानवाचा स्वभावधर्म आहे असे आपण मानतो मग एखादी व्यक्ती पूर्णपणे चांगली किंवा पूर्णपणे वाईट कशी काय असू शकते? लोक याचा विचारही करायला तयार नाहीत. प्रत्येक व्यक्ती मी किती चांगला आहे हेच दाखवायचा प्रयत्न करतो. चित्रपट कलाकार हे चित्रपटात भुमिका करत असतात मग ती सकारात्मक असेल किंवा नकारात्मक. पण आपण त्या व्यक्तीकडे एक कलाकार म्हणुन पाहातच नाही. पडद्यावर हिरोची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला आपण आपल्या आयुष्यात हिरो म्हणुनच स्विकारतो त्याची स्टाईल, फॅशन, सवयीचे अंधानुकरण करतो आणि व्हिलन साकारणाऱ्या व्यक्तीला आपण व्हिलन म्हणुनच स्विकारतो. मुळात आजवर पडद्यावर गाजलेले अनेक व्हिलन हे खरंच देवमाणसे होती. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील जसे निळू फुले, प्राण, अमजद खान, डॅनी, कादर खान, अजित, प्राणनाथ वगैरे. पण या कलाकारांच्या नकारात्मक भुमिकांमुळे त्यांना समाजाकडून नेहेमीच दोष दिला गेला, वाईट वागणूक दिली गेली. परंतू हे सर्व कलाकार खूप दयाळू, लोकांना मदत करणारे, परोपकारी आणि चांगल्या चारित्र्याचे होते. विनोदी अभिनेते अशोक सराफ, मकरंद अनासपुरे वगैरे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा तसेच विनोदी आहेत असे लोकांना वाटते पण मुळात ते मितभाषी आणि शांत स्वभावाचे आहेत. कलाकार हे अभिनय करतात, ते पडद्यावर जसे वागतात तसेच ते त्यांच्या खाजगी आयुष्यात नसतात हे लोकांनी समजणे गरजेचे आहे. किंबहुना बरेच कलाकार आपल्या मुळ स्वभावाच्या अगदी विपरीत भूमिका करणारे आहेत.
[next] आपल्याला कलाकारांना लेबल लावायची जी सवय लागली आहे त्यामुळे विनोदी अथवा चरित्र अभिनेता कधीच चुकीचे वागू शकत नाही असे आपण स्वतःच स्वतःला पटवून देतो आणि त्याची चुकीच्या गोष्टींसाठी पाठराखण करतो. माणुस चुकीच्या गोष्टी सर्वांसमोर करत नाही हा एक मोठा भ्रम आहे. उलट या गैरसमजाचा अनेक लोक मस्त फायदा उठवतात आणि मग मी सर्वासमोर असे कसे करेन म्हणुन समोरच्याला खोटे पडतात. जोवर आपण आपल्या मान्यता सोडून डोळसपणे परिस्थिती पाहत नाही तोवर सत्य समोर असूनही आपण कधीच पाहू शकत नाही. कलाकार, खेळाडू, राजकारणी लोकांच्या प्रतिमेला दुधाने आंघोळ घालणारे, त्यांची देवळे बांधून पूजा अर्चा करणारे लोक पाहिल्यावर हसावे की रडावे तेच कळत नाही. क्रिकेटला एक धर्म म्हणुन पाहिले जाते. भारतीय लोकांचे प्रेमही अतिरेकी आणि रागही अतिरेकी असतो. क्रिकेटची मॅच जिंकले की खेळाडूंना जिथे डोक्यावर घेतात तिथे ते धावा बनवू शकले नाहीत, बाद झाले किंवा सामना हरले तर त्यांचे पुतळे जाळतात, त्यांच्या घरावर, कारवर हल्ले करण्यापर्यंत लोकांची मजल जाते. क्रिकेटकडे एक खेळ म्हणुनच का पाहू शकत नाही आपण? प्रत्येक गोष्टीला आपल्याला आवडणाऱ्या संकल्पनेतच न पाहता जसे आहे तसे पाहायला लोक कधी शिकणार देव जाणे!
[next] एकीकडे स्त्रियांना देवीचा दर्जा दिला जातो आणि दुसरीकडे त्यांच्यावर अत्याचार केले जातात. नद्यांना जिथे माता मानले जाते आणि त्याच नद्या प्रदूषित केल्या जातात. जनावरांना देवाचा अवतार मानले जाते आणि त्याच जनावरांची अमानुषपणे कत्तल केली जाते. त्यामुळे मला वाटते की सगळ्याला देवत्व बहाल करण्याऐवजी जसे आहे तसेच राहू दिले तर जास्त योग्य होईल. आपल्या देशाची आर्थिक प्रगती होण्याआधी खऱ्या अर्थाने वैचारिक प्रगती होणे जास्त आवश्यक आहे. लोकांचे जोपर्यंत विचार प्रगल्भ होत नाहीत तोपर्यंत भारत जरी महासत्ता बनला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ‘मी टू’ (#MeToo) या मोहिमेमुळे किती स्त्रियांना न्याय मिळेल माहित नाही पण या मोहिमेमुळे विकृत विचारसरणीच्या पुरुषांना चाप बसून अशी एकही घटना भविष्यात टळली तरी ही मोहिम यशस्वी झाली असे मी म्हणेन. केवळ स्त्रियांवरच अन्याय होतो असे नाही, पुरुषांवरही अन्याय होतात. गरज आहे ती एकमेकांचा सम्मान करण्याची आणि चांगली वागणूक देण्याची. चांगले संस्कार तर आवश्यक आहेतच सोबत चांगली विचारसरणीही जोपासली पाहिजे तेव्हाच परिवर्तन घडू शकेल.
शुभं भवतु !