ललितापंचमीची कहाणी, श्रावणातल्या कहाण्या - [Lalitapanchamichi Kahani, Shravanatalya Kahanya] श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी - ललितापंचमीची कहाणी.
श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - ललितापंचमीची कहाणी
आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याला आवळे जावळे मुलगे होते. त्यांच्या लहानपणीच त्यांचे आईबाप मेले. भाऊबंदांनी त्यांचं काय होतं नव्हतं ते सगळे हिरावून घेतलं व मुलांना देशोधडीला लावलं. पुढं ती मुलं जाता जाता एका नगरात आली. दोन प्रहरची वेळ झाली आहे. वाट चालता चालता दोघे दमून गेले आहेत. दोघांचे जीव भुकेनं कळवळले आहेत. दोघांची तोंडं सुकून गेली आहेत. असे ते दोघेजण त्या नगरीत आले. इतक्यात एक चमत्कार झाला. एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरिता घरातून बाहेर आला. ब्राह्मणाने त्या मुलांस पाहिलं. आपल्या घरातून बोलावून नेलं. जेवू घातलं. खाऊ घातलं. नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली. त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली. ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं. वेदाध्ययन पढवू लागला. मुलंही तिथं राहून वेद पढू लागली. असं करता करता पुष्कळ दिवस झाले.पुढं काय झालं ? तो ब्राह्मण ललितापंचमीचं व्रत करू लागला. शिष्यांनी गुरुजीला विचारलं, “हे आपण काय करता?” तेव्हा गुरुजी म्हणाले,“ हे उपांगललितापंचमीचं व्रत आहे. ह्यानं द्रव्य मिळतं, विद्या प्राप्त होते. इच्छित हेतु प्राप्त होतात,” हे त्या शिष्यांनी ऐकलं. यथाशक्ति त्यांनी व्रत केले, तशी त्यांना लवकर विद्या आली. दोघां मुलांची लग्ने झाली. पुढं ते आपल्या नगरी आले. श्रीमंत झाले. सुखासमाधानानं किर्ती मिळवून राहू लागले. याप्रमाणं काही दिवस गेले.
पुढं काय चमत्कार झाला? दोघे भाऊ वेगळे निघाले. थोरला भाऊ दर वर्षी आपलं ललितापंचमीचं व्रत करी, त्यामुळं त्याची संपत्ति कायम राहिली. धाकट्या भावानं व्रताची हेळसांड केली त्याचा देवीला राग आला. त्यामुळं त्याला दारिद्र्य आलं. पुढं ती नवराबायको थोरल्या भावाकडे रहावयास गेली. एके दिवशी वडील भावाची बायको दिराला काही बोलली. त्यामुळं त्याला राग आला. मोठा पश्चात्ताप झाला. आपल्या बायकोला म्हणाला, “मी उपांगललितेचं व्रत टाकलं. त्याचं मला हे फळ आलं. हा अपमान सहन करून इथं रहाणं चांगलं नाही, मी आता देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन.” असं बोलून तो गेला. पुढं त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला; परंतु शोध काही लागला नाही. पुढं हिंडतां हिंडतां एकदा तो नगराजवळ आला. त्या नगराबाहेर गुराखी भेटले. त्यांना विचारलं, “ह्या गावाचं नाव काय? कोणता राजा इथं रहातो? उतरायला जागा कुठं मिळेल?” ते म्हणाले, “ह्या गावाचं नांव उपांग आहे. इथं राजाही उपांगच आहे. तिथं ललितेचं एक देऊळ आहे. तिथं मोठी धर्मशाळा आहे. तिथं उतरायला जागा मिळेल. आम्ही त्याच गावातून आलो. तिकडेच आम्हांला जायचं आहे. तुम्हालाही यायचं असेल तर चला” मग तो त्या नगरात गेला. धर्मशाळेत उतरला. देवीचं दर्शन घेतलं. अनन्यभावानं तिला शरण गेला. रात्री देवळातच निजला. देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. “राजाकडे जा, माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग, त्याची नेहमी पूजा कर, म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होईल.” इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला.
[next] दुसरे दिवशी तो राजाकडे गेला, देवीचा दृष्टांत सांगितला, पूजेचं झाकण मागितलं. राजानं ते दिलं. ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला. घरी नेऊन त्याची पूजा करू लागला. ललितादेवीचं व्रत करू लागला. तसे पुन्हा सुखाचे दिवस आले. इच्छित मनोरथ सिद्धीला गेले. पुढं देवीच्या आशीवार्दानं त्याला एक मुलगी झाली. सोबतिणीबरोबर खेळायला जाऊ लागली. पुढं काय चमत्कार झाला? एके दिवशी मुलीनं तें झाकण घेतलं. नदीवर खेळायला गेली. तिथं जाऊन आंघोळ करू लागली. इतक्यात एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं. तिनं त्याच्यावर झाकणानं पाणी उडविलं, तसा तो ब्राह्मण जिवंत झाला. देवीच्या प्रसादानं त्याला सुंदर रूप प्राप्त झालं. तिनं ते पाहिलं. आपल्याला हा पति असावा असं तिला वाटलं. आपला हेतु त्याला कळविला. तेव्हा त्यानं हिला विचारलं, “ही गोष्ट घडेल कशी? तशी ती म्हणाली, “मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते, जेवायच्या वेळेस आपोषणी हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील. “भटजी, आपोषणी का घेत नाही? तेव्हां सांगा कीं, आपली कन्या मला देशील तर जेवतो, नाही तर असाच उठतो. म्हणजे ते देतील.” त्याप्रमाणं तिनं जेवायला बोलावलं. ब्राह्मण जेवायला बसू लागला. मुलीचं मागणं केलं. बापानं मुलगी देण्याचं कबूल केलं. सुखासमाधानानं जेवणं झाली. चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं, नवरानवरींची बोळवण केली. मुलगी घरी जातेवेळेस देवीचं प्रसादाचं झांकण घेऊन गेली. त्यामुळे बापाच्या घरातलं सगळं द्रव्यं गेलं. दळिद्र आलं, तो फार गरीब झाला. तसं त्याच्या बायकोनं मुलीजवळ झाकण मागितलं. मुलीनं ते दिलं नाहीं. तिनं तो रोष मनात ठेवला. एके दिवशी आई मुलीच्या घरी जाऊ लागली. जाताना वाटेत जांवई भेटला. सासूनं त्याला ठार मारवलं. झांकण घेऊन घरी आली.
इकडे मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावई जिवंत झाला. उठून घरी गेला. बायकोला झालेली हकीगत सांगितली. तिला मोठा आनंद झाला. पुढं ही सगळी हकीगत सासूला समजली, तशी ती जावयाच्या घरी आली. पटापट पाया पडू लागली. केलेला अपराध कबूल झाली. तिला पश्चात्ताप झाला. अशा कर्मामुळं तिला गरीबी आली. तिचा नवरा आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं? ह्याचं कारण काही केल्या त्याच्या लक्षात येईना. म्हणून वडील भावाकडे गेला. त्याला सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, “तू ललितापंचमीच्या व्रताची हेळसांड करतोस, त्या योगानं असं होतं. व्रतनेम यथास्थित कर. देवीची पूजा कर. म्हणजे तुझं कल्याण होईल.” त्यानं तसं वागण्याचा निश्चय केला. घरी आला. व्रत करू लागला. काही काळाने दळिद्र गेलं. मनातले त्याचे इष्ट हेतु पूर्ण झाले. तसे तुमचे आमचे होवोत.
ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
तात्पर्य: जो उन्मत्त होऊन देवाच्या भक्तीकडे दुर्लक्ष करतो त्याला त्याच्याबद्दल चांगले शासन होते.
अभिप्राय