सिंधुदुर्ग जिल्हा - [Detailed Information and Photos of Sindhudurg District] सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
![सिंधुदुर्ग जिल्हा | Sindhudurg District](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjYDK4hXXhMpyoV9V7VOhIz2XZ6xsRgeoSjb1SCxY3gL78gzIyTGqAQV4GQ7Pjb49Gds9RbzWWt34Bko2tQ6LyFiXpdokQnf0nszu4oleHGDDvDMm4l37BKgjo3pVaBcNj9dp-hvdGtDjuyM6Q6ObRccOCVFA64FCuVVSPy7XycvqeA0S6OYqAxONxDpA/s1600-rw/sindhudurg-district.webp)
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.
सिंधुदुर्ग जिल्हा
सिंधुदुर्गच्या रूपाने जणू समुद्राच्या लाटांवरच चितारलेला आहे, साकारलेला आहे. या सिंधुदुर्गचे नावच या जिल्ह्याने धारण केले आहे
अंगावर आदळणाऱ्या असंख्य लाटा झेलत आणि छत्रपती शिवरायांच्या असामान्य कर्तृत्वाची साक्ष देत व शिवकालीन इतिहासाच्या देदीप्यमान आठवणी काढीत जलदुर्ग - सिंधुदुर्ग अरबी समुद्रात ताट मानेने उभा आहे. मराठ्यांचा उज्ज्वल इतिहास सिंधुदुर्गच्या रूपाने जणू समुद्राच्या लाटांवरच चितारलेला आहे, साकारलेला आहे. या सिंधुदुर्गचे नावच या जिल्ह्याने धारण केले आहे.
महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावर अजिंक्य असा जलदुर्ग असणे आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन शिवछत्रपतींनी कुरटे बेटावरील सुमारे पन्नास एकर क्षेत्रावर या दुर्गाची उभारणी केली. १० नोव्हेंबर १६६४ रोजी किल्ल्याचे बांधकाम सुरू केले गेले, ते तीन वर्षे अहोरात्र चालूच होते. शिवरायांची दूरदृष्टी इतक्यावरच थांबली नाही, तर पद्मगड, भगवंतगड, सर्जेकोट, भरतगड आदी लहान-मोठे किल्ले सिंधुदुर्गच्या परिसरात बांधून त्यांनी सिंधुदुर्गला अभेद्य बनविले. महाराष्ट्रातील एकमेव असे ‘शिवछत्रपती मंदिर’ या किल्ल्यात आहे. हे मंदिर छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले आहे.
विविध क्षेत्रांत आपल्या तेजाने तळपणारी अनेक नररत्ने या जिल्ह्याने राज्यास दिली. उक्ती आणि कृती यांमध्ये एकवाक्यता असणारे थोर समाजसुधारक रा. गो. भांडारकर, कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन, र. के. खाडीलकर, बॅरिस्टर नाथ पै यांसारखी नररत्ने म्हणजे याच जिल्ह्याने आपणास दिलेली देणगी होय!
मुख्य ठिकाण: ओरोस बुद्रुक
तालुके: सात
क्षेत्रफळ: ५,२०७ चौ.कि.मी.
लोकसंख्या: ८,३२,१५२
[next]
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. भगवान श्रीकृष्ण कालयवन या द्रवीड राजास द्वारकेहून हुलकावणी देत देत मुचकुंद राजाच्या गुहेत (सह्याद्रीत) गेले व कालयवनाचा वध झाल्यानंतर या जिल्ह्याच्या उत्तरेकडून घाट उतरून करवीरला गेले, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. रामायणातही या प्रदेशाचा उल्लेख आढळतो.
या जिल्ह्याचा प्राचीन इतिहास थोडाबहुत स्पष्ट करणारे काही शिलालेख अलीकडील काळात सापडले आहेत. वेंगुर्ल्याजवळ मठ या गावात शके १३९७ मधील शिलालेख उपलब्ध मिळाले आहेत. याशिवाय कुणकेश्वर, आजगाव व सातार्डे आदी ठिकाणी काही शिलालेख मिळाले आहेत. नेरूर येथे सापडलेल्या चालुक्यकालीन शिलालेखावऊन प्राचीन काळी या परिसरात चालुक्यांची सत्ता नांदली असावी, असे अनुमान काढता येते.
मराठ्यांपूर्वी या परिसरात काही काळ आदिलशाही राजवटही अस्तित्वात होती. आदिलशाही राजवटीत उभारल्या गेलेल्या काही वास्तू याची साक्ष देतात. स्वातंत्र्य चळवळीतही या जिल्ह्याने मोलाची कामगिरी बजावली आहे. १९३० मध्ये शिरोडे येथे झालेला मिठाचा सत्याग्रह व १९४२ च्या आंदोलनात जिल्ह्याने घेतलेला सहभाग इतिहासास ज्ञात आहे.
कोकण विभागातील दक्षिण प्रदेशाच्या औद्योगिक व कृषिविकास जलदगतीने व्हावा, म्हणून मूळच्या रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन १ मे १९८१ रोजी महाराष्ट्र दिनाच्या सुमूहुर्तावर सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला.
[next]सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भौगोलिक स्थान
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील अगदी दक्षिणेकडील जिल्हा. पूर्वेस सह्याद्री पर्वताच्या रांगा व त्यालगत कोल्हापूर जिल्हा. पश्चिमेस अरबी समुद्र. दक्षिणेस गोवा व कर्नाटक राज्य. उत्तरेस रत्नागिरी जिल्हा.
पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस शुक नदी, पूर्वेस सह्याद्री रांगा व दक्षिणेस तेरेदेखोल नदी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याची नैसर्गिक सीमा स्पष्ट केली आहे. या जिल्ह्यास सुमारे १२१ कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता आकारमानाचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्हा राज्यातील सर्वात लहान जिल्हा आहे, असे म्हणता येईल. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या १.७० टक्के इतके अत्यल्प क्षेत्र या जिल्ह्याच्या वाट्यास आले आहे.
[next]सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुके
सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ७ तालुके आहेत- कणकवली
- कुडाळ
- सावंतवाडी
- वेंगुर्ले
- मालवण
- देवगड
- वैभववाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्याची प्राकृतिक रचना
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पश्चिमेकडील किनारी भागापासून जसजसे पूर्वेकडे जावे तसतशी समुद्रसपाटीपासूनची जमिनीची उंची वाढत जाते. किनाऱ्यालगत अतिशय सखल व सपाट असा प्रदेश पसरलेला आहे. याला ‘खालाटी’ अथवा ‘किनारी प्रदेश’ असे म्हटले जाते. सखल-मैदानी प्रदेशाचा उत्तर-दक्षिण लांबी असलेला हा एक अरुंद पट्टा आहे. देवगडा मालवण तालुक्यांचा पश्चिम भाग व बहुतांश वेंगुर्ले तालुका या पट्ट्यात येतो.
खालाटी अथवा किनारी प्रदेशाला लागून डोंगराळ प्रदेशाच्या पायथ्याशी असलेला जो काहीसा सपाट पट्टा लागतो, त्याला ‘वलाटी’ अथवा ‘पठारी प्रदेश’ असे म्हणतात. देवगड व मालवण तालुक्यांचा पूर्व भाग आणि कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तालुक्यांचा पश्चिम भाग या विभागात मोडतो. वलाटी अथवा पठारी प्रदेशाच्या पूर्वेकडे सह्याद्रीच्या डोंगररांगाचा बऱ्याचशा उंचवट्याचा व दऱ्याखोऱ्यांचा प्रदेश पसरलेला आहे.
वैभववाडी, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तालुक्यांचा पूर्वभाग या विभागात समाविष्ट होतो. या डोंगराळ भागातून पूर्वेकडे देशावर उतरण्यासाठी भुईबावडा, करुळ, फोंडा, आंबोली असे अनेक घाट आहेत. या जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यासाठी आंबोली, करूल किंवा फोंडा घाट पार करावा लागतो. रत्नागिरी जिल्ह्यात जाण्यासाठी राजापूरची घाटी उतरावी लागते. या प्रदेशात शिवगड, मनोहरगड यांसारखे प्रमुख दुर्ग वसले आहेत.
[next]सिंधुदुर्ग जिल्ह्याची मृदा
दमट हवामानामुळे व अतिवृष्टीमुळे दीर्घकालीन प्रक्रिया घडून बेसॉल्ट खडकापासून जांभा खडक तयारत होतो. जिल्ह्यातील बहुतांश जमीन अशा प्रकारच्या जांभा खडकापासून तयार झालेली आहे. अतिवृष्टी व दमट हवामान यांमुळे बेसॉल्ट खडकातील सिलिका, कॅल्शियम व मॅग्नेशियम आदी घटकांचा विनाश होतो. परंतु लोहाचे प्रमाण मात्र अधिकच रहाते. त्यामुळे मृदेचा रंग तांबूस-तपकिरी असतो. जिल्ह्यातील बहुतांश मृदा अशा प्रकारची आहे. डोंगरउतारावरील माती व गाळ वाहात येऊन त्याचे संचयन झाल्याने समुद्रकिनाऱ्यावरील मृदा पोयटायुक्त आहे. समुद्र-सान्निध्यामुळे ही मृदा क्षारयुक्तही आहे.
[next]सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हवामान
समुद्रसान्निध्यामुळे जिल्ह्याचे हवामान सम, उष्ण व दमट आहे. समुद्रकिनारा जवळ असल्याने उन्हाळ्यात तापमानात खूप वाढ नाही, तसेच हिवाळ्यातही तापमान खूप खाली येत नाही. तथापि, समुद्रकिनाऱ्यापासून जसजसे पूर्वेकडे जावे तसतसे हवामान किंचितसे कोरडे व विषम होत जाते. जिल्ह्यात सरासरी २७५ से. मी. इतका पाऊस पडतो. सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांत वसलेल्या ‘आंबोली’ या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक पावसाची (७४८ से.मी.) नोंद होते. एवम, हा जिल्हा भरपूर पावसाचा जिल्हा असून जिल्ह्यातील एकही तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडत नाही.
[next]सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नद्या
जिल्ह्यातील बहुतेक नद्या पूर्वेकडील सह्याद्री पर्वतरांगाम्तून उगम पावून पश्चिमेकडे वाहात जातात व जवळच असलेल्या अरबी समुद्रास मिळतात. जिल्ह्याची पूर्व-पश्चिम रुंदी कमी असल्याने साहजिकच, या नद्या कमी लांबीच्या आहेत. उताराच्या व डोंगराळ प्रदेशामुळे या नद्या उथळही आहेत. शुक नदी सह्याद्रीत उगम पावून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून तर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून वाहात जाऊन विजयदुर्गच्या खाडीत अरबी समुद्रात मिळते. वेगळ्या भाषेत सांगावयाचे तर या नदीच्या मुखाशी विजयदुर्गची खाडी तयार झाली आहे, असेही म्हणता येईल. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून होणारा हिचा प्रवास साहजिकच, उत्तरेकडील वैभववाडी, कणकवली व देवगड या तालुक्यांच्याही उत्तर सीमेवरून होतो.
देवगड नदी सह्य पर्वतरांगांत उगम पावून वैभववाडी तालुक्याच्या दक्षिणसीमेवरून वाहत जाऊन कणकवली तालुक्यात प्रवेश करते. तिच पुढील प्रवास कणकवली व देवगड तालुक्यांचा मध्यातून होतो. पुढे ही अरबी समुद्रास मिळते. हिच्या मुखाशी तयार झालेली खाडी ‘देवगडची खाडी’ म्हणून ओळखली जाते. आचरा नदी कणकवली व देवगड तालुल्यांमधून पूर्व-पश्चिम अशी वाहते. या नदीच्या मुखाशीही छोटीशी खाडी तयार झाली असून ती ‘आचाऱ्याची खाडी’ म्हणून ओळखली जाते. आचरा नदीला बहुतांशी समांतर अशी गडनदी, कणकवली व मालवण तालुक्यांमधून वाहते. या नदीच्या मुखाशी कालावलीची खाडी आहे.
कर्ली व तिची उपनदी काली कुडाळ तालुक्यातून वाहात गेल्या आहेत. कर्ली नदीच्या मुखाशी ‘कर्लीची खाडी’ आहे. तेरेदेखोल ही जिल्ह्यातील एक प्रमुख नदी असून ती सावंतवाडी तालुक्यात सह्य पर्वताच्या डोंगराळ भागात आंबोली घाटाजवल उगम पावते. हिचा सुरुवातीचा प्रवास काहीसा ईशान्येकडून नैऋत्येकडे असा होतो. नंतर ती जिल्ह्याच्या दक्षिणे सीमेवरून पश्चिमेकडे वाहत जाऊन पुढे गोवा राज्यात प्रवेशते. काही अंतर तिने सिंधुदुर्ग जिल्हा व गोवा राज्याची सीमा निश्चित केली आहे. कळणा व तिल्लारी या नद्या जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातून वाहत जाऊन गोवा राज्यात प्रवेशतात. पुढे गोवा राज्यात त्यांचा संगम होतो.
[next]सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणे
तिल्लारी नदीवर कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या तिल्लारी प्रकल्पाचा लाभ या जिल्ह्यास होतो. कुडाळ तालुक्यात कर्ली नदीवर उभारण्यात येणारा ‘ताळंबा’ हा जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प होय. जिल्ह्याची एकूण भौगोलिक रचना लक्षात घेता कणकवली तालुक्यातील घोणसरी येथील धरणाचा अपवाद वगळता जिल्ह्यात मोठी धरणे नाहीत. जिल्ह्यात पाट, धामापूर, खांबाळे, रेडी, आदी ठिकाणी तलाव असून नावळे, कोकिसरे, नाधवडे, ओसरगाव, वरवडे, हरकूळ, माडखोल, वाफोली इत्यादी ठिकाणी नद्यांवर छोटेसे बंधारे उभारण्यात आले आहेत.
[next]सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पिके
कृषिप्रधान जिल्हा. भात हे जिल्ह्यातील प्रमुख पीक. सावंतवाडी, कुडाळ, माळवण, कणकवली हे तालुके भाताच्या उत्पादनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे होत. रागी किंवा नाचणी, वरी, कुळीथ ही जिल्ह्यातील अन्य प्रमुख अन्नधान्य पिके होय.
गेल्या तीन शतकांहून अधिक काळ सावंतवाडी हे ठिकाण लाकडी रंगीत खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे. लाकडी रंगीत फळे, गंजिफा व लाखेच्या वस्तू यांच्य निर्मितीचेही सावंतवाडी हे परंपरागत केंद्र आहे.
फळांच्या उत्पादनासाठी उत्पादनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रसिद्ध आहे. नारळ, सुपारी, आंबा, काजू ही जिल्ह्यातील प्रमुख फळपिके होत. जिल्ह्याच्या किनारी भागात नारळाची व सुपारीची झाडे भरपूर आहेत. नारळाच्या झाडाला ‘माड’, तर सुपारीच्या ‘पोफळी’ असे संबोधले जाते. देवगड व वेंगुर्ले हे तालुके आंब्याच्या उत्पादनासाठी, तर सावंतवाडी व वेंगुर्ले हे तालुके काजूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. देवगड तालुक्यातील हापूस आंब्यास देशात व विदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. याशिवाय रातांबी (कोकम), फणस, जांभूळ वगैरे फळझाडेही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहेत.
[next]सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिजे
खनिज संपत्तीचा विचार करता समृद्ध जिल्हा. वेंगुर्ले तालुक्यात रेडी येथे लोह खनिज मोठ्या प्रमाणावर सापडते. सावंतवाडी तालुक्यातील डिंगणे, नेतर्डे, सासोली तसेच कणकवलीत खनिज म्हणजे इल्मेनाइट. हे खनिज किनाऱ्यावर अनेक ठिकाणी आढळते. कोमाईट हे जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाचे खनिज. कणकवली तालुक्यात कोमाईटचे साठे मोठ्या प्रमाणावर आढळतात. सावंतवाडी तालुक्यात आंबोली घाटमाथ्यावर बॉक्साईटचे साठे आहेत. कणकवली व कुडाळ तालुक्यात अभ्रकाचे साठे आहेत. वेंगुर्ले तालुक्यात रेडी येथे लोहखनिजाच्या खाणी आहेत.
याशिवाय फोंडा घाटाच्या नैऋत्यकडील परिसरात तसेच हनुमंत घाटाच्या क्षेत्रात चुनखडीचे साठे आढळतात. मालवण बंदराच्या पूर्वेस कुंभारमाठजवळ चिकणमाती सापडते. या मातीचा उपयोग मातीची भांडी व कौले तयार करण्यासाठी होतो. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले तसेच मालवण किनाऱ्यावर बऱ्याच ठिकाणी विविध रंगछटाचा ‘गेरू’ सापडतो. त्याचा रंगनिर्मितीसाठी उपयोग होतो. मालवण, कणकवली, कुडाळ व वेंगुर्ले या तालुक्यात ‘शिरगोळा’ हा दगड सापडतो. या दगडाचा उपयोग रांगोळी तयार करण्यासाठी होतो.
[next]सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय
जिल्ह्याला १२१ कि. मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून जिल्ह्यात लहानमोठ्या १८ खाड्या आहेत. साहजिकच, मत्स्यव्यवसाय हा येथील एक महत्त्वाचा आर्थिक व्यवसाय ठरला आहे. देवगड तालुक्यात मीठबाव येथे व मालवण तालुक्यात तारकर्ली येथे मत्स्यव्यवसायाचे शिक्षण देणाऱ्या शाळा आहेत. जिल्ह्यात मासेमारीसाठी यांत्रिक नौकांचा व गिल-नेटिंग, पासिंग-नेटिंग यासारख्या प्रगत तंत्रांचा मोठ्या प्रमाणावर अवलंब केला जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी खाजण जमिनीत कोळंबी संवर्धनाचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. एकूणच जिल्हा चंदेरी क्रांतीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. जिल्ह्यात शिरोडे व मालवण येथे मिठागरे आहेत.
महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात जामसंडे (देवगड) येथे उभारण्यात आला आहे.
[next]
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वने
जिल्ह्याच्या पूर्व भागात सह्य पर्वतरांगांच्या पायथ्याशी दाट वने आहेत. या वनांमध्ये साग, ऐन, खैर, शिसव हे वृक्ष मोठ्यावर प्रमाणावर आढळतात. सोनचाफा व सुरंगी यांसारखे फूलझाडेही येथील वनात मोठ्या प्रमाणावर आहेत.
येथील वनांमध्ये वाघ, बिबट्या, गवा, सांबर, भेकर, तरस, ससा यांसारखे प्राणी तसेच मोर, रानकोंबडा, साकोत्री, होला यांसारखे पक्षी आढळतात.
हिरडा, बेहडा यांसारखी वनौषधे व मध ही येथील प्रमुख वनोत्पादने होत. फोंडा घाटातील मध सुप्रसिद्ध आहे.
[next]सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले
सिंधुदुर्ग ह जिल्ह्यातील महत्त्वाचा जलदुर्ग. हा कुरटे बेटावर बांधण्यात आला आहे. तिन्ही बाजूंनी तट असलेला विजयदुर्ग हा किल्ला देवगड तालुक्यात आहे. पद्मदुर्ग हा तटबंदीवजा बालेकिल्ला सिंधुदुर्गच्या प्रवेशद्वाराशी पूर्वेस सुमारे दोनशे मीटर अंतरावर खडा आहे. कुडाळ तालुक्यातील कार्यातनारूर येथील रांगणा किल्ला, याच तालुल्यातील शिवापूरजवळचा मनोहरगड, मालवण तालुक्यातील रामगड, शिरोडे-रेडी जवळच्या यशवंतगड हे जिल्ह्यातील महत्त्वाचे अन्य किल्ले होत.
[next]सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योगधंदे
कुडाळ व सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथे सहकारी औद्योगिक वसाहती असून कणकवली येथे कोकण महामंडळाची छोटी औद्योगिक वसाहत आहे. जिल्ह्यात कोकण गॅस, मेल्ट्रॉन, पावडर मेटल, सुंदर स्टील, सह्याद्री ग्लास, बायमन गार्डन, कोकण मिनरल्स, महाराष्ट्र मिनरल्स आदी उद्योग उभे राहिले आहेत.
वेंगुर्ले व मालवण परिसरात काजूबियांपासून काजूगर काढण्याचे अनेक छोटे-मोठे कारखाने आहेत. आंबे भरण्यासाठी लागणाऱ्या करंड्या-पेट्या वा खोकी बनविण्याचे उद्योग देवगड व वेंगुर्ले या तालुक्यात उभे आहेत. वेंगुर्ले, आरोटे, वालावल, मालवण या ठिकाणी नारळाच्या सोडण्यापासून काथ्या बनविण्याचे व या काथ्यापासून ब्रश, दोरखंड, पायपुसणी आदी वस्तू बनविण्याचे कारखाने आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोलची खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचेही अगदी दक्षिणेकडील टोक होय. या तेरेखोल खाडीवरील पुलामुळे महाराष्ट्र व गोवा ही दोन राज्य जोडली गेली आहे.
[next]
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख स्थळे
कणकवली: कणकवली तालुक्याचे मुख्य ठिकाण. भालचंद्र महाराजांचे समाधीस्थळ. जवळच वागदे येथे ‘कोकणचे गांधी’ म्हणून विख्यात असलेले अप्पासाहेब पटवर्धन यांचा गोपुरी आश्रम.
मालवण: तालुक्याचे मुख्य ठिकाण. या परिसरातील कोकणी बोली खास ‘मालवणी’ म्हणून ओळखली जाते. मालवणी पद्धतीचे सागरी खाद्यान्न प्रसिद्ध आहे. एवम, भाषा, रहाणी व खाद्यान्न या बाबतीत मालवणचे वेगळेपण उठून दिसते. सिंधूदुर्ग हा जलदुर्ग मालवणपासून जवळच आहे. मालवणपासून अकरा कि.मी. अंतरावर धामापूर येथे शिवाजीराजांनी बांधलेला तलाव त्यांची स्मृती जतन करीत आहे.
आंबोली: सावंतवाडी तालुक्यातील डोंगरमाथ्यावरील निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण. समुद्रसपाटीपासून उंची १,०२३ मी. जवळूनच हिरण्यकेशी नदी उगम पावते. अलीकडील काळात हे स्थळ एक पर्यटनकेंद्र म्हणून विकसित झाले आहे. आंबोलीपासून जवळच नारायणगड व महादेवगड हे डोंगरी किल्ले आहेत. आंबोली येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (M.T.D.C.) विश्रामधाम असून टाटा उद्योगसमूहाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉटेलही आहे.
वेंगुर्ले: वेगुर्ले तालुक्याचे मुख्य ठिकाण. सागरकिनाऱ्यावरील निसर्गरम्य पुळण. अलीकडील काळात विकसित होऊ लागलेले नैसर्गिक बंदर. येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात (कोकण कृषी विद्यापीठांतर्गत) आंबा व काजू या फळपिकांबाबत संशोधन आणि हापूस यांच्या संकरापासून नीलम आणि हापूस या जातींच्या संकरापासून ‘रत्ना’ व रत्ना आणि हापूस यांच्या संकरापासून ‘सिंधू’ या आंब्याच्या नव्या जाती तयार केल्या असून अल्पवधीतच त्या लोकप्रिय झाल्या आहेत. या केंद्राने वेंगुर्ला १, वेंगुर्ला २, वेंगुर्ला ३, वेंगुर्ला ४, वेंगुर्ला ५ या काजूच्या अधिक उत्पन्न देणाऱ्या जातीही प्रसारित केल्या आहेत.
रेडी: हे राज्यातील एक महत्त्वाचे बंदर असून ते वेंगुर्ले तालुक्यात आहे. रेडीच्या परिसरात लोह खनिजाच्या खाणी आहेत. महाराष्ट्रातून निर्यात होणारे लोहखनिज मुख्यत्त्वे या बंदरातून निर्यात केले जाते. १९३० सालच्या मिठाच्या सत्याग्रहामुळे प्रकाशझोतात आलेले ‘शिरोडे’ हे गाव जवळच आहे.
सावंतवाडी: सह्याद्रीच्या कुशीत विसावलेल्या सावंतवाडी तालुक्याचे मुख्य ठिकाण. हस्तकला उद्योगाचे केंद्र. लाकडी रंगीत खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे.
शिवकानीन सुप्रसिद्ध असा ‘रांगणा’ किल्ला कुडाळ तालुक्यात कोल्हापूरच्या नैऋत्येस सुमारे ७८ कि.मी. अंतरावर सह्यपर्वतराजीत विसावलेला आहे.
देवगड: देवगड तालुक्याचे मुख्य ठिकाण. कारवार ते जयगड दरम्यानचे पश्चिम किनाऱ्यावरील एकमेव सुरक्षित बंदर. किल्ला व दीपगृह.
याशिवाय कुणकेश्वर (देवगड तालुक्यात. यादवकालीन शिवमंदिर.) ; ओरोस बुद्रुक (जिल्ह्याचे मुख्य ठिकाण.); विजयदुर्ग (देवगड तालुक्यात. शिवरायांनी बांधलेला जलदुर्ग.) ; फोंडा (तालुका कणकवली. सह्याद्रीतील घाट. मध प्रसिद्ध.); सैतवडे (तालुका देवगड. धबधबा प्रसिद्ध.); कुडाळ (तालुक्याचे मुख्य ठिकाण ओरोसबुद्रुक हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण याच तालुक्यात येते.); वैभववाडी (तालुक्याचे मुख्य ठिकाण.) ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची स्थळे होत.
[next]सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहतूक
पनवेल-मंगलोर (गोवामार्गे) हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरा (ज्याला आपण सामान्यतः मुंबई-गोवा महामार्ग म्हणून ओळखतो.) जिल्ह्यातून गेला आहे. खारेपाटण, नांदगाव, कणकवली , कुडाळ, सावंतवाडी, वंदे आदी या मार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थळे होत. याशिवाय वेंगुर्ले-बेळगाव (सावंतवाडीमार्गे आंबोली घाटातून.); मालवण-कोल्हापूर (कणकवलीमार्गे फोंडा घाटातून.) देवगड-कोल्हापूर (नांदगावमार्गे फोंडा घाटातून); विजयदुर्ग-कोल्हापूर (वाघोटन, कासार्डेमार्गे फोंडा घाटातून.); आचरे-कोल्हापूर (कणकवलीमार्गे) हे जिल्ह्यातील प्रमुख मार्ग होत.
आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे ‘सागरीय उद्यान’ मालवण परिसरात सिंधुदुर्गाच्या सभोवताली साकारले गेले आहे. ‘राजा शिवछत्रपती सागरी उद्यान’ या नावाने ओळखले जाणारे हे उद्यान राज्यातील ‘पहिले व एकमेव’ सागरी उद्यान आहे.
अभिप्राय