Loading ...
/* Dont copy */

सप्तपदी भाग २ - मराठी भयकथा

सप्तपदी भाग २, मराठी भयकथा - [Saptapadi Part 2, Marathi Bhaykatha] आनंद अस्मिताला वशीकरणाद्वारे आपल्या जाळ्यात ओढतो आणि...

सप्तपदी भाग २ - मराठी भयकथा | Saptapadi Part 2 - Marathi Bhaykatha

“आनंद अस्मिताला वशीकरणाद्वारे आपल्या जाळ्यात ओढतो आणि तिच्याशी देवळात लग्न करतो. पैशासाठी तो आणि त्याचे कुटुंब तिचा अनन्वित छळ करतात. आनंदने अस्मिताला भुलवून कसे वश केले ते महादेव, आनंदकडुन हुशारीने जाणुन घेतो. तो आणि वामनराव, तांत्रिकाच्या मदतीने अस्मिताला वशीकरणातुन मुक्त करतात. नंतर अनपेक्षितरित्या आनंदचा गुंडांकडुन पैशासाठी खुन होतो. आनंदच्या खुनाची बातमी कळताच महादेव, आणि वामनराव अस्मिताची आनंदच्या त्रासातुन विना कटकट सुटका झाली असे समजुन सुटकेचा निश्वास सोडतात पण अस्मिताला मात्र खुप दुःख होते.” पुढे चालु...

आनंदचा खुन झाला त्या रात्री खुप ऊशीरा शिवलकरांच्या घराचा दरवाजा ठोठवला गेला. आनंद आला असेल असे समजुन त्याच्या आईने दरवाजा उघडला. दारात पोलिस आलेले पाहिल्यावर तिच्या छातीत धस्स झाले. आनंदने रागाच्या भरात अस्मिताचे किंवा वामनरावांचे काही बरे वाईट तर केले नाही ना? अशी शंकेची पाल तिच्या मनात चुकचुकली. तिने आकाशला हाक मारली. दारात पोलिसांना पाहुन तोही जरा घाबरलाच. “आनंद शिवलकर इथेच राहतात का?” पोलिसांचा प्रश्न. “हो. पण तो आत्ता घरात नाही. काय झाले?” आकाश आणि त्याच्या आईच्या चेहर्‍यावर काळजीचे ढग दाटले होते. “आम्हाला एक बॉडी मिळाली आहे, ती आनंद शिवलकर यांची असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बॉडीची ओळख पटवण्यासाठी तुम्हाला आमच्याबरोबर यावे लागेल.” पोलिसांच्या या वाक्याने त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. आनंदच्या आईने तिथेच ऊर बडवुन घ्यायला सुरवात केली. त्या आवाजाने सुमन पण बाहेर आली. “आई तु जरा शांत हो गं! आधी मी जाऊन बघुन येतो. तो आनंदच असेल कशावरून? सुमन तु आईला घेऊन आत जा. मी आलोच थोड्या वेळात.” असे म्हणुन आकाश जीपमध्ये बसला. “मी सुद्धा सोबत येते, माझा जीव राहणार नाही” असे म्हणत त्याची आई सुद्धा जीपमध्ये चढली.

गोंधळलेल्या सुमनला काहीच न सांगता आकाश व त्याची आई पोलिसांच्या जीप मधुन सरकारी रुग्णालयात गेले. तिथे शवागारात एका मृतदेहावर पांढरी चादर घातलेली त्यांना दिसली. डोक्यात दगड घालुन खुन केल्यामुळे चेहरा ओळखण्याच्या पलीकडे गेला आहे, तेव्हा अंगावरचे कपडे आणि शरीरावरील खुणांवरून मृतदेह ओळखा असे पोलिसांनी त्यांना सांगितले. थरथरत्या हातांनी त्यांनी चादर मृतदेहावरून दूर केली. मृतदेहाच्या अंगावरील कपडे त्यांनी ओळखले आणि दोघेही आनंदच्या नावाने रडु लागले. त्यांचा भर ओसरल्यावर शरीरावरील इतर काही खुणा माहित असल्यास त्या पण बघुन घ्या म्हणजे खात्री पटायला मदत होईल असे पोलिसांनी सांगितले, तसे आनंदच्या उजव्या दंडावरील लहानपणी भाजल्यामुळे झालेल्या जखमेच्या खुणेला ओळखुन आनंदच्या आईने तो मृतदेह आनंदचाच असल्याचे सांगितले आणि ती मटकन खालीच बसली. आकाश तिला सावरायला गेला आणि दोघेही एकमेकाला मिठी मारून रडु लागले. “मृतदेहाची ओळख पटल्यावर, पोस्टमॉर्टेम झाली की उत्तरक्रियेसाठी मृतदेह ताब्यात देण्यात येईल, उद्या सकाळी जबानीसाठी पोलिस स्टेशनला या” असे पोलिसांनी सांगितले. रडुन रडुन सुजलेल्या डोळ्यांनी ते दोघे जीप मधुन उतरले. आनंदचा खुन झाल्याचे कळताच सुमन आणि आनंदचे वडिल त्या दोघांसोबत विलाप करू लागले.

“आनंदच्या मृत्यूमुळे घरातील एक कमावता सदस्य गेला, त्याचबरोबर त्याच्या पाठोपाठ अस्मिताच्या वडिलांकडुन मिळणारे पैसेही गेले. दुःख आणि सुड भावनेने पेटलेल्या शिवलकर कुटुंबीयांनी कुलकर्णी कुटुंबाला त्रास देण्यासाठी काय केले ते आता पुढे वाचा.”

[next]आनंदच्या खुनामागे वामनरावांचा हात असावा, असा शिवलकर कुटुंबीयांचा पक्का ग्रह झाला होता. सुडभावनेने आकाशचे रक्त उकळत होते. काही झाले तरी अस्मिता आणि वामनरावांना सुखा-सुखी जगु द्यायचे नाही असे त्याने ठरवले. दुसर्‍या दिवशी जबानीसाठी तो पोलिस स्टेशन मध्ये गेला. पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली. आनंदच्या खुनाच्यावेळी तो नेमका कुठे होता? आनंदशी त्याचे संबंध कसे होते? आनंद कुठे नोकरी करायचा? आनंदची कोणाशी दुश्मनी होती का? असे अनेक प्रश्न त्याला विचारण्यास पोलिसांनी सुरवात केली. या सर्व प्रश्नांची उत्तरे त्याने दिली. पण तुझा कुणावर संशय आहे का? असा प्रश्न पोलिसांनी विचारल्यावर मात्र तो मनातल्या मनात आनंदित झाला कारण तो याच प्रश्नांची आतुरतेने वाट बघत होता. आपला संशय आनंदच्या सासऱ्यांवर म्हणजेच वामनरावांवर असल्याचे त्याने सांगितले. कारण विचारताच त्याने सांगितले की, “आनंद आणि अस्मिताच्या लग्नाला वामनरावांचा विरोध होता, त्यांनी अस्मिताला आपल्या इस्टेटीतुन बेदखल केले होते आणि आनंदला जीवे मारण्याची धमकीही दिली होती” असेही खोटेच सांगितले. पोलिसांच्या तपासाला आता दिशा मिळाली होती. वामनराव त्यांच्या रडारवर आले होते, पण ते काही साधारण व्यक्ती नव्हते तर एक बडी आसामी होते. पोलिसांना त्यांच्यावर हात टाकण्यापुर्वी भरपुर तयारी करावी लागणार होती, भक्कम पुरावे गोळा करावे लागणार होते. केवळ आकाशच्या जबानीवर ते त्यांची साधी चौकशीही करू शकणार नव्हते मग अटक करणे तर खुप लांबची गोष्ट राहिली.

पोलिसांनी बार मधील सी.सी.टी.व्ही फुटेज पुन्हा एकदा काळजीपुर्वक बघायला सुरवात केली. आनंदने वेटरशी वाद घालुन सगळ्यांसमोर त्याच्या कानाखाली वाजवली असल्यामुळे त्याने बदला घेण्यासाठी आनंदचा खुन केला असु शकतो ही शक्यता, सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये आनंदच्या खुनाच्या वेळी तो वेटर बार मध्येच सर्व्हिस देत असल्याचे दिसल्यावर निकालात निघाली. आणखी एक गोष्ट पोलिसांच्या ध्यानात आली ती म्हणजे बारमध्ये आनंदचे वेटरशी भांडण सुरु असताना जे लोक त्यांच्याकडे बघत होते त्यात चार सराईत गुंडही होते. त्यातील एक तर तडीपार होता. आनंद पैशाची गड्डी नाचवत असताना त्या चौघांची नजर त्याच्या गड्डीवरच होती, त्यांच्यात काही चर्चा झाली आणि आनंद बाहेर पडताच तेही त्याच्या मागोमाग निघाले. पोलिसांनी अंदाज बांधला की कदाचित या गुंडानीच आनंदचा पैशासाठी खुन केला असावा वामनरावांनी त्या गुंडाना सुपारी दिली असल्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. थोडी अजुन चौकशी करताना त्यांना समजले की आदल्या दिवशी पैसे नसल्यामुळे आनंदला बारमधुन हाकलुन देताना, कोणा एका माणसाने त्याला हवे ते द्यायला सांगुन त्याचे बिल स्वतःच्या खिशातुन भरले होते. तो माणुस आणि आनंद बराच वेळ गप्पा मारत होते आणि बिल दिल्यावर आनंदच्या पाठोपाठ तो माणुसही बारमधुन बाहेर पडला होता. त्या दिवशीचे सी.सी.टी.व्ही फुटेज तपासल्यावर आनंदसोबत बारमध्ये बसलेला महादेव पोलिसांना दिसला. इन्स्पेक्टर माने सब इन्स्पेक्टर जाधवांना म्हणाले, “त्या दिवशी आनंदकडे दारू प्यायला पैसे नव्हते आणि त्या माणसाने त्याची ओळख नसताना त्याचे बिल भरले होते आणि दुसऱ्या दिवशी आनंदाकडे अमाप पैसेही आले होते. त्या माणसाने तर ते त्याला दिले नव्हते? पण तो का देईल त्याला इतके पैसे? आनंद एखादे गुपित जाणत होता का? की जे जाणण्यासाठी त्याला दारू पाजली गेली आणि भरपुर पैसेही दिले गेले. हा गुंता अधिकाधीक वाढतच चाललाय. या सर्वांची उकल त्या माणसाला आणि त्या गुंडाना पकडल्यावरच होईल असे मला वाटते.”

“आकाशने आनंदच्या खुनामागे वामनराव कुलकर्ण्यांचा हात असावा असा संशय व्यक्त केला. वामनरावांना त्रास देणे हाच त्याचा एकमेव हेतु होता. वामनराव गजाआड होतात का? पोलिसांच्या तपासाला कोणते वळण लागले हे जाणुन घेण्यासाठी पुढे वाचा.”

[next]सी.सी.टी.व्ही फुटेज मधुन मिळालेला महादेवचा फोटो इन्स्पेक्टर माने बराच वेळ न्याहाळत होते. “याला कुठे तरी बघीतले आहे, पण नक्की आठवत नाही. अरे हा! आत्ता आठवले. हा तर महादेव काळे. काळे बिल्डरचा छोकरा. परवाच काळे बिल्डरच्या एका प्रोजेक्टच्या उद्घाटन प्रसंगी आमदार साहेब आले होते, आणि याचा छोकराच सगळी व्यवस्था बघत होता. पण याचा आनंदच्या खुनाशी काय संबंध? या खुनात बडी धेंडं सामील असावीत हे नक्की. ओ सावंत! त्या आनंद शिवलकर खुन प्रकरणातील चार गुंडांची फाईल काढा जरा.” इन्स्पेक्टर मानेंनी खुनाची पाळेमुळे खणुन काढण्यासाठी आपली कंबर कसली. पक्या, उमेश, इक्बाल आणि सलीम हे चौघेही सराईत गुंड होते. मारामारी, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बलात्कार, जबरी चोरी अशा वेगवेगळ्या गुन्हांमध्ये वेळोवेळी शिक्षा भोगुन आलेले रेकॉर्ड वरील गुन्हेगार होते. त्यातला सलीम तर तडीपार होता. तो राजरोस शहरात फिरतोय आणि आपल्याला खबरही नाही ही गोष्ट इन्स्पेक्टर मानेंना चांगलीच खटकली होती. खबऱ्यांना बोलावण्यात आले. “सलीम शहरात आलाय याची खबर का नाही दिली गेली?” इन्स्पेक्टर माने गरजले. पण कोणाकडुनही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे इन्स्पेक्टर माने आणखीनच चिडले. “चौवीस तासाच्या आत मला या चौघांची खबर पाहिजे. जा कामाला लागा.” त्यांनी ऑर्डर सोडली. खबरे जाताच इन्स्पेक्टर मानेंनी आपले लक्ष महादेवकडे वळवले. वामनरावांपेक्षा त्याची चौकशी करणे तुलनेने सोपे होते. पण काळे बिल्डरही काही सामान्य माणुस नव्हता. मोठमोठ्या राजकारण्यांशी त्याची उठबस होती. पण कुठुन तरी सुरवात करणे गरजेचे होते.

मोठ्या पाठपुराव्यानंतर वरिष्ठांकडुन महादेव काळेच्या चौकशीची परवानगी मिळवुन इन्स्पेक्टर माने, काळे बिल्डर्सच्या ऑफिसला पोहोचले. महादेव काळेने इन्स्पेक्टर मानेंना ओळखले व त्यांचे स्वागत केले आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे काबुल केले. पोलीस स्टेशनला महादेव काळेची जवळ जवळ तीन तास चौकशी झाली. त्यामध्ये महादेव काळेने सी.ए. च्या ऑफिसमध्ये अस्मिताला पाहिल्यापासुन ते आनंदने तिला कसे फसवले हे बारमध्ये त्याच्याकडुन काढुन घेण्यापर्यंत; त्यानंतर तांत्रिकाच्या मदतीने अस्मिताची वशीकरणातुन मुक्तता करेपर्यंतची सगळी माहिती इन्स्पेक्टर मानेंना सांगितली. आनंदच्या खुनाबद्दल मात्र आपणास काहीही माहित नसल्याचे त्याने सांगितले. महादेव खरे बोलत असल्याचे इन्स्पेक्टर मानेंनी ओळखले पण अजुनही आनंदचे खरे खुनी कोण? हा प्रश्न अनिर्णयीतच होता. आता मोठे आव्हान होते ते म्हणजे वामनरावांनी चौकशी करणे. महादेवला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते हे वामनरावांना त्याच्याकडुन कळले आणि त्यांनी मोर्चे बांधणी सुरु केली. महादेव काळेच्या जबाबाच्या आधारावर इन्स्पेक्टर मानेंनी त्यांच्या वरिष्ठांकडुन वामनराव कुलकर्ण्यांची चौकशी करण्याचीही परवानगी मिळवली. वामनरावांनी अस्मिताला कदाचित तिचीही चौकशी होईल याची जाणीव करून दिली. “अस्मि! बाळा मला ठाऊक आहे, तु अजुन सावरली नाहीस पण यातुन तुझे बाहेर पडणे तुझ्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठीही खुप गरजेचे आहे. पोलिस चौकशीसाठी येतील तेव्हा जे खरे आहे ते न घाबरता सांग. तुझा बाप इथे खंबीर उभा आहे. तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. मुळात आपण कोणताच गुन्हा केला नसल्यामुळे आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही.”

“महादेवच्या चौकशीतुन आनंदच्या खुनाशी वामनरावांचा संबंध असावा या आकाशने व्यक्त केलेल्या संशयाला बळ मिळते आणि वामनरावांच्या मागे पोलिसी चौकशीचे शुक्लकाष्ट लागते. इन्स्पेक्टर मानेंचा वामनरावांच्या व अस्मिताच्या जबानीवर विश्वास बसतो का? की वामनरावांना संशयाच्या बळावर अटक होते. ते जाणण्यासाठी पुढे वाचा.”

[next]सकाळी ठीक ९ वाजता वामनरावांच्या चौकशीचे आदेश घेऊन इन्स्पेक्टर माने त्यांच्या घरी पोहोचले. त्यांचे सवाल जबाब त्यांच्याच शब्दात.

इन्स्पेक्टर माने: आपण मयत आनंद शिवलकर यांना ओळखता?
वामनराव: हो. दुर्दैवाने तो माझ्या मुलीचा नवरा होता.
इन्स्पेक्टर माने: आपणाला आनंद आणि आपल्या मुलीच्या प्रेमाबद्दल त्यांच्या लग्नाआधीपासुन माहिती होती?
वामनराव: हो.
इन्स्पेक्टर माने: मग त्यावर आपली प्रतिक्रिया काय होती?
वामनराव: मला ते अजिबात आवडले नव्हते. कारण तो कोणत्याच बाजुने माझ्या मुलीच्या लायक नव्हता. त्याने माझ्या मुलीला आपल्या जाळ्यात ओढले होते. प्रेमाला माझा विरोध नाही पण माझा जावई सुशिक्षित, सुसंस्कृत, सभ्य, स्वबळावर स्वतःच्या पायावर उभा असलेला आणि माझ्या मुलीच्या योग्यतेचा हवा अशी माझी माफक अपेक्षा होती.
इन्स्पेक्टर माने: आपल्याविरोधात जाऊन जेव्हा आपल्या मुलीने आनंदशी लग्न केले तेव्हा आपल्याला कसे वाटले?
वामनराव: स्वतःच्या हाताने जेव्हा एखादी मुलगी आपल्या आयुष्याचे वाटोळे करून घेते तेव्हा तिच्या बापाला जसे वाटेल तसेच वाटले होते.
इन्स्पेक्टर माने: आपण आनंदला ठार मारण्याची धमकी दिली होती काय?
वामनराव: नाही. उलट जर माझी मुलगी जीवंत राहावी असे वाटत असेल, तर तो मागेल तेव्हा आणि मागेल तितके पैसे मी त्याला देत राहण्यास त्यानेच मला धमकावले होते.
इन्स्पेक्टर माने: तुम्ही आत्तापर्यंत आनंदला किती पैसे दिलेत?
वामनराव: आनंदला पाच लाख आणि त्याच्या आईला एक लाख असे एकुन सहा लाख रुपये दिले.
इन्स्पेक्टर माने: तुम्ही रागातुन आनंदचा खुन करण्यासाठी सुपारी दिलीत का?
वामनराव: नाही. पण ज्या कोणी त्याला मारले त्याला मी धन्यवादच देईन. त्याच्यामुळेच माझ्या मुलीची त्या नराधमाकडुन सुटका झाली.
इन्स्पेक्टर माने: तुम्हाला आनंदच्या मृत्यूबाबत कधी समजले?
वामनराव: तो मेल्याचे पेपर मध्ये वाचले तेव्हा.
इन्स्पेक्टर माने: ठीक आहे. तुर्तास तरी माझे प्रश्न संपले आहेत. गरज पडली तर मी तुमच्याशी पुन्हा संपर्क साधेन. तसदीबद्दल माफ करा पण चौकशी करणे हा आमच्या कामाचा भाग आहे.
वामनराव: काही हरकत नाही. तुम्हाला जी मदत लागेल ती मी अवश्य करेन.

वामनरावांची जबानी घेतल्यावर इन्स्पे. माने विचारात बुडाले. महादेव आणि वामनरावांनी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शांतपणे आणि न चाचरता दिले होते. ते खरे बोलत होते यात शंका नव्हती. पण त्यांचा या खुनाशी खरंच काही संबंध होता की ते फक्त ओघाने त्याच्याशी जोडले गेले होते यावर इन्स्पे. माने आणि सब इन्स्पे. जाधवांचे एकमत होत नव्हते. वामनरावांनी आनंदला एकुण सहा लाख रुपये दिले होते त्यामुळे त्याच्याकडे अचानक आलेल्या पैशांमागचे रहस्य उलगडले. मग केवळ त्या पैशांसाठीच त्याचा खुन झाला असावा का? कारण महादेव किंवा वामनरावांचा आनंदच्या खुनामध्ये काही सहभाग असावा याला अजुनही त्यांच्याकडे भक्कम पुरावा नव्हता. त्यासाठी ते गुंड पकडले जाणे गरजेचे होते. महादेवप्रमाणे वामनरावांकडुनही संपुर्ण घटनाक्रम जाणुन घेण्याचे माने साहेबांनी ठरवले. त्यांनी वामनरावांशी फोनवर संपर्क केला आणि त्यांना पोलिस स्टेशनला येण्याची विनंती केली. वामनरावांनी अस्मिता व आनंदचे प्रेम प्रकरण कळल्यापासुन ते तांत्रिकाच्या मदतीने अस्मिताची आनंदच्या वशीकरणातुन मुक्तता करेपर्यंतची सगळी माहिती इन्स्पेक्टर मानेंना सांगितली. महादेव व वामनराव दोघांच्याही बोलण्यात एकवाक्यता आहे हे इन्स्पेक्टर मानेंनी ओळखले. दोघांच्या बोलण्यात तांत्रिकाचा उल्लेख आल्यामुळे इन्स्पेक्टर मानेंचे लक्ष तांत्रिकाकडे वेधणे स्वाभाविक होते पण त्याने फक्त अस्मिताला वश करण्यासाठी आनंदला मदत केली होती. खुनाशी त्याच्या प्रत्यक्ष संबंध कुठेच येत नव्हता. तरीही काही माहिती मिळते का ते पाहावे असा विचार करून नंतर अस्मिताचीही जबानी घेण्याचे त्यांनी मनोमन ठरवले.

महादेव कडून इन्स्पेक्टर मानेंनी त्या तंत्रिकांचा पत्ता घेतला आणि त्याच्या झोपडीपाशी येऊन धडकले. तांत्रिक त्यावेळी आपल्या साधनेत ध्यानमग्न होता. आधी इन्स्पेक्टर मानेंना वाटले की जाऊन त्या तांत्रिकाची गचांडी धरीन आणि त्याला पोपटासारखा बोलता करेन, पण तांत्रिकाच्या चेहेऱ्यावरचे तेज आणि झळकत असलेली सात्विकता पाहुन नकळत त्यांनी तांत्रिकाचे ध्यान संपेपर्यंत झोपडी बाहेरच थांबायचे ठरवले. पण तेवढ्यात तांत्रिकाने डोळे उघडले आणि म्हणाला, "या इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही येणार याची मला खात्री होतीच. बोला मी आपली काय सेवा करू शकतो?" "अस्मिताला वश करण्यासाठी आनंदला तुम्हीच मदत केली होती ना? आता त्या आनंदचाच खुन झालाय. मी त्याबाबतीत तुमच्याकडे चौकशीसाठी आलो होतो. तुम्हाला या बाबतीत काय काय माहीत आहे?" इन्स्पेक्टर मानेंनी आवाजात जरब आणत विचारले. "मी आनंदच्या दिखाव्याला खरे प्रेम समजुन त्या मुलीचे मन वश करण्यासाठी त्याची मदत केली एवढेच. तसेही मी नियतीच्या कार्यात ढवळाढवळ होऊ नये म्हणुन माणसांपासुन दूर राहून आपल्या साधनेत मग्न असतो पण ती नियतीच होती त्यामुळे माझ्याकडून आनंदला मदत केली गेली. अन्यथा एवढी मोठी चुक घडली नसती. त्या मुलीचा मी अपराधी आहे." तांत्रिक म्हणाला. "हो का? मग आता खुन कोणी केला हे ही नियतीला विचारून सांगायची कृपा करावी महाराज!" इन्स्पेक्टर माने कुत्सितपणे म्हणाले. "माझा आनंदच्या खुनाशी काहीही संबंध नाही. मी एवढेच सांगेन की तुमचा तपास अगदी योग्य दिशेत सुरु आहे. महादेव आणि वामनराव हे पुर्णपणे निर्दोष आहेत आणि लवकरच तुमच्या हातात खरे खुनी सापडतील." इन्स्पेक्टर मानेंना हवे होते ते मिळाले होते त्यामुळे ते जाता जाता त्या तांत्रिकाला म्हणाले, "पुन्हा कोणाला असल्या कामात मदत करत जाऊ नका नाहीतर लॉकप मध्ये टाकावे लागेल, कळले का लव्हगुरू?" आणि ते तिथुन निघाले त्यावर तांत्रिक मनातल्या मनात हसला आणि पुन्हा डोळे बंद करून आपल्या साधनेत मग्न झाला.

"महादेव आणि वामनरावांची जबानी घेतल्यावर त्यांचा आनंदच्या खुनात सहभाग नाही हे इन्स्पे. मानेंच्या लक्षात आले होतेच तांत्रिकांशी बोलल्यावर ते अधिकच स्पष्ट झाले तरीही खात्रीसाठी त्यांनी अस्मिताची पण जबानी घेण्याचे ठरवले. आनंदचे खरे खुनी पकडले जातात का? त्यांना शिक्षा होते का? शिवलकर कुटुंबीयांचा वामनरावांवरचा रोष कमी होतो का? या प्रश्नांची उत्तरे जाणण्यासाठी पुढे वाचा."

[next]इन्स्पेक्टर मानेंनी अस्मिताला जबानीसाठी पोलिस स्टेशनला बोलावुन घेतले. पोलिस स्टेशनला आल्यावर अस्मिताने आनंदशी झालेली पहिली भेट, पळुन जाऊन त्याच्याशी देवळात केलेले लग्न, त्यानंतर त्याने तिचा केलेला छळ, वामनरावांनी आनंदच्या घरी येऊन त्याला दिलेले पैसे, नंतर तिला डॉक्टरला दाखवण्याचे कारण सांगुन त्यांचे आपल्या घरी घेऊन जाणे, तिथे महादेवने येऊन तिला तांत्रिकाने दिलेले फुल हुंगवणे आणि मंत्र म्हणणे, नंतर ती बेशुद्ध होणे, शुद्धीत आल्यावर तिला सर्व वस्तुस्थिती कळणे आणि दुसऱ्या दिवशी आनंदच्या खुनाची बातमी तिने पेपरात वाचणे इथपर्यंत सर्व काही मुसमुसत सांगुन टाकले. महादेव, वामनराव आणि तांत्रिक या तिघांव्यतिरिक्त अस्मिताचीही जबानी ऐकल्यावर इन्स्पेक्टर मानेंची खात्री पटली की आनंदच्या खुनात या चौघांपैकी कुणाचाही हात नाही. आता फक्त ते चार गुंड सापडणे बाकी राहिले होते मग या खुनामागचे रहस्य उलगडणार होते. इन्स्पेक्टर माने नव्या जोमाने कामाला लागले. नाकाबंदी केली गेली. गाड्यांची तपासणी होऊ लागली. संशयितांची चौकशी केली जाऊ लागली. यात जवळ जवळ सात दिवस गेले आणि एके दिवशी संध्याकाळी खबऱ्यांनी टीप दिली. भुताटकीच्या अफवेमुळे मोकळ्या असलेल्या, शहराबाहेरच्या एका जुन्या वाड्यात ते चौघे लपुन बसल्याची खबर मिळायचा अवकाश इन्स्पेक्टर मानेंनी ज्यादा कुमक मागवली. मध्यरात्री त्यांनी वीस शस्त्र सज्ज पोलिस सोबत घेऊन त्या वाड्याला वेढा दिला. आपण घेरले गेल्याचे कळताच आधी त्या गुंडानी प्रतिकार केला पण पोलिसांच्या पथकापुढे त्यांना शरण यावेच लागले. त्यांच्या मुसक्या आवळुन इन्स्पेक्टर माने विजयी मुद्रेने परतले.

लॉकअप मध्ये थर्ड डिग्री दाखवल्यावर चारही गुंड पोपटासारखे बोलु लागले. आपण केवळ आनंदकडील पैसे घेऊन पळणार होतो पण त्याने प्रतिकार केल्यामुळे नाईलाजाने त्याला मारावे लागले हे त्यांनी काबुल केले. आपल्याला कोणीही सुपारी दिली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्याकडुन जो चाकु आनंदच्या छातीत आणि गळ्यात घुसवला गेला होता तोही जप्त केला गेला. कोर्टात केस उभी राहिली तेव्हा पक्या आणि उमेश माफीचे साक्षीदार झाले आणि पैशाच्या लोभाने त्या चौघांनी आनंदचा खुन केल्याचे मान्य केले. आनंदच्या डोक्यात दगड घालणाऱ्या सलीमला मुख्य आरोपी ठरवले गेले व फाशीची शिक्षा सुनावली गेली. इक्बालने आनंदच्या छातीत आणि गळ्यात रामपुरी चाकु खुपसला होता, खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवत त्याला आजन्म सक्त मजुरीची शिक्षा सुनावली गेली. पक्या आणि उमेशला गुन्ह्यात सहभाग असल्याबद्दल पाच वर्षांची शिक्षा झाली. पण माफीचे साक्षीदार बनल्यामुळे ती कमी होऊन त्यांना नाम मात्र शिक्षा झाली. आनंदचा त्रास अनपेक्षितरित्या दूर झाला आणि त्याचे खुनी पकडले गेल्यामुळे महादेव, वामनराव आणि अस्मिताच्या डोक्यावरची टांगती तलवार दूर झाली. पोलिसांची कटकटही शांत झाली होती. पण वामनरावांचा सुड घेण्यासाठी व्याकुळ झालेला आकाश आणि त्याचे कुटुंबीय मात्र आतल्या आत धगधगत होते.

“महादेव आणि वामनरावांविरुद्ध पुरावे न मिळाल्यामुळे निराश झालेल्या इन्स्पेक्टर मान्यांनी खबऱ्यांमुळे आनंदच्या खऱ्या खुन्यांना मोठ्या शिताफीने पकडले. आनंदचे खरे खुनी पकडले गेल्यावर वामनरावांच्या कुटुंबाला त्रास देण्याचे मनसुबे उध्वस्त झाल्यामुळे शिवलकर कुटुंबीय निराश झाले होते. आणि अचानक काही तरी अनपेक्षित घडते कोणीतरी परत येते, ते कोण आणि ते आल्यावर काय काय गोष्टी घडतात ते पुढे वाचा.”

[next] आकाशने आनंदच्या छिन्न विच्छिन्न देहाला भडाग्नी दिला खरा पण त्याचा आणि शिवलकर कुटुंबीयांचा आत्मा आतल्या आत सुडाग्नीत जळत होता. आनंदच्या देहाची राख, त्याच्या मृत्यूचा बदला घेईपर्यंत विसर्जित करणार नाही असा आकाशने प्रण केला. त्याने त्या राखेचा कलश घरामध्येच दडवुन ठेवला. वामनरावांचा बदला घेण्यासाठी तो योग्य संधीची वाट पाहत होता. एका रात्री घरातील सगळे झोपले असताना किचनमध्ये भांडे पडल्याचा आवाज आल्यामुळे आकाशच्या आईची झोपमोड झाली. आधी तिने मांजर असेल असे समजुन दुर्लक्ष केले पण जेव्हा एका पाठोपाठ धडाधड भांडी पडु लागली तशी ती उठली आणि नक्की काय झाले ते बघण्यासाठी किचनमध्ये जाऊन तिने लाईट लावला आणि तिचा श्वास तिच्या गळ्यातच अडकला. तिने आकाशला हाक मारायचा प्रयत्न केला पण तिच्या तोंडुन आवाजच फुटेना. भीतीने तिची बोबडी वळली होती. "कोण आहे गं आई?" आकाशने पडल्या पडल्याच विचारले. आपल्या आईकडुन उत्तर येत नाही हे पाहुन आकाश किचनकडे गेला. एका जागेवर थिजलेली त्याची आई त्याला दिसली. काहीतरी भयानक पहिल्यासारखी भितीने ती थरथरत होती. जवळ जाऊन त्याने तिला हात लावला पण तिच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. तिची विस्फारलेली नजर समोर रोखली होती. तोंड उघडे पडले होते. आकाशने तिच्या नजरेच्या रोखाने पहिले तिथे काहीच नव्हते.

“आई तु एवढी घाबरलेली का दिसतेस?” असे म्हणत आकाशने आईच्या दिशेने पहिले तर ती जागेवर नव्हती. तो हळू हळू मागे सरकु लागला आणि कशाला तरी अडकुन धडपडला. तो कशामुळे धडपडला हे पाहण्यासाठी खाली झुकला तर त्याची आई जमीनीवर पडली होती जी केव्हाच बेशुद्ध झाली होती. इतक्यात त्याच्या खांद्यावर पाठीमागुन एक हात पडला आणि तो कमालीचा घाबरला. त्याने सावकाश वळुन बघितले तर मागे सुमन उभी होती. “काय सुमन! केवढा घाबरलो मी? अशी न सांगता मागे येऊन थांबत जाऊ नको म्हणुन तुला हजार वेळा सांगीतलय पण तुझ्या मडक्यात काही शिरतच नाही.” तो सुमन वर डाफरू लागला. त्याला आई बेशुद्ध पडली आहे याचा क्षणभर विसर पडला होता “आईंना काय झाले?” या तिच्या प्रश्नाने तो भानावर आला. त्याची नजर आपल्या आईकडे गेली. “माहित नाही पण कशाला तरी घाबरली आणि बेशुद्ध पडली.” असे म्हणत त्याने सुमनकडे बघितले तर तिही जमीनीवर बेशुद्ध होऊन पडली होती. त्याला कळेना या दोघींना झाले तरी काय? तेवढ्यात त्याच्या खांद्यावर पाठीमागुन एक हात पडला, आता कोण? म्हणुन त्याने मागे वळुन पहिले आणि मोठ्याने किंचाळुन तोही बेशुद्ध पडला. त्याच्या समोर डोक्याचा पार चेंदा मेंदा झालेल्या अवस्थेत आनंदचे प्रेत उभे होते. बऱ्याच वेळाने जेव्हा त्या तिघांना जाग आली तेव्हा सकाळ झाली होती. आपल्याला भास झाला की आनंद खरेच आला होता हा प्रश्न त्यांना पडला. किचन मध्ये पसरलेल्या भांड्यानी मात्र त्यांची खात्री पटली की तो भास नक्कीच नव्हता. आनंदच्या प्रेताची आठवण झाल्यावर त्या तिघांच्याही मणक्यातुन भीतीची थंड शिरशिरी उठली.

“रात्री किचन मधुन आलेल्या आवाजाने जागे झालेले शिवलकर कुटुंबिय आनंदचे भयानक रूप पाहुन बेशुद्ध होऊन पडतात. सकाळी जाग आल्यावर, तो खरंच परत आलाय का? असा प्रश्न त्यांना पडतो. पण त्या चारही गुंडांचे काय होते? त्यांना कोर्टाने सुनावलेली शिक्षा होते का? की नियतीने त्यांच्यासाठी काही वेगळे ठरवले होते? हे जाणुन घेण्यासाठी पुढे वाचा.”

[next] माफीचे साक्षीदार झाल्यामुळे पक्या आणि उमेशवर सलीम आणि इक्बालचा रोष होता. बदल्याच्या भावनेने पेटलेले सलीम आणि इक्बाल आतल्या आत धुमसत होते. “साले दगाबाज! पकडे जाने पर दोस्ती भुल गये! खुदको तो बचा लिया और कानुन के हाथो हमारी कुर्बानी चढा गये!” सलीम रागाने फुरफुरत होता. पक्या आणि उमेश दोघेही बेसावध होते. चमच्याच्या दांड्यांना घासुन टोकदार बनवुन त्यांनी जेलमध्ये त्या दोघांवर जीवघेणा हल्ला केला. कोणाला काही कळायच्या आतच सलीम आणि इक्बालने अस्तनीत लपवलेले टोकदार चमचे सपासप पक्या आणि उमेशचा गळ्यात घुसवले. सात आठ वेळा वार झाल्यामुळे पक्या आणि उमेशचा गळ्यातुन रक्ताच्या चिळकांड्या उडु लागल्या. त्यांनी घातलेले कैद्यांचे युनिफॉर्म त्यांच्याच रक्ताने लाल झाले. पुढच्याच क्षणाला ते दोघे आपापला गळा दोन्ही हातांनी दाबुन धरत खाली कोसळले आणि त्यांनी प्राण सोडला. सुरक्षा रक्षक तिथे पोहोचायच्या आत सलीम आणि इक्बाल तिथुन गायब झाले होते. जेलमध्ये नेहेमीचे येणे जाणे असल्यामुळे त्यांनी आधीच फिल्डिंग लावली होती. काही अधिकाऱ्यांशी त्यांचे लागेबांधे होते. अंधाराचा फायदा घेऊन सांडपाणी वाहुन नेणाऱ्या वाहिन्यांमधुन ते दोघे जेलमधुन सुखरूप बाहेर पडले. पक्या आणि उमेशचा खुन करून सलीम व इक्बाल पळाल्यामुळे जेलमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यांना शोधण्यासाठी जेलरने जंग जंग पछाडले पण त्याच्याच माणसांच्या मदतीमुळे सलीम आणि इक्बाल सारखे अट्टल गुन्हेगार त्याच्या जेलमध्ये खुन करून त्याच्याच हातावर तुरी देऊन फरार झाले होते. जेलमधुन कैदी फरार होणे ही कोणत्याही जेलरसाठी अत्यंत लाजीरवाणी गोष्ट असते. जेलरच्या साम्राज्यात (जेलमध्ये) ही घटना घडल्यामुळे कोणीतरी भर रस्त्यात आपले कपडे उतरवल्यासारखेच त्या जेलरला वाटत होते. त्याने चवताळुन सलीम आणि इक्बालला शोधण्यासाठी शोधपथके सगळीकडे रवाना केली.

जेलमधुन बाहेर पडल्यावर सलीम आणि इक्बाल मुख्य रस्ता सोडुन गावाच्या दिशेने पळत होते. त्यांना लवकरात लवकर जेलपासुन दूर जायचे होते. एकदा का ते गाव पार करून जंगलात घुसले की मग ते कोणाच्याही हाती लागु शकत नव्हते. दोघांच्या अंगावर जेलचे कपडे होते आणि अंगाला दुर्गंधीही येत होती. ते बऱ्यापैकी दूर आले होते आणि पळुन पळुन त्यांना धापही लागली होती. विश्रांतीसाठी ते एका घराच्या आडोशाला थांबले. खिडकीतुन त्यांनी आत डोकावून पहिले तर घर रिकामे होते. मालक कदाचित कुठे बाहेरगावी गेला असावा. पण हे त्यांच्या पथ्थ्यावर पडले. त्या रात्रीपुरते लपण्यासाठी त्यांनी त्या घराची निवड केली. घराभोवती चक्कर मारून आत शिरण्याचा सोपा रस्ता कुठून आहे याचा त्यांनी शोध घेतला. दरवाजा आणि कडीकोयंडा भक्कम होता आणि त्यांच्याकडे कोणतेच हत्यार नसल्यामुळे दरवाजातुन आत शिरणे अशक्य होते. त्यामुळे खिडकीवाटे आत शिरणे जास्त सोयीचे आहे हे त्यांच्या लक्षात आले. खिडकीची कडी उचकटुन त्या दोघांनी घरात प्रवेश केला. घरात शिरल्यावर सर्वप्रथम त्यांनी खिडकी लावली आणि शांतपणे बाहेरचा कानोसा घेतला. शिपायांचा किंवा इतर कोणाचाही आवाज येत नसल्याची खात्री केली आणि घरात कुठे काय आहे याचा अंदाज घेतला. मग त्यांनी आपले कपडे काढुन आंघोळ केली आणि कपाटात ठेवलेले घराच्या मालकाचे कपडे घातले. पहाटे घरातील चिज वस्तुंसकट जंगलाच्या दिशेने पोबारा करायचा प्लॅन त्यांनी आखला. या सगळ्यात बराच वेळ गेला होता त्यामुळे त्यांच्या पोटात भुकेचा डोंब उसळला होता. घरात जे काही खायला मिळाले त्याचा फडशा पाडुन ते झोपी गेले.

“माफीचे साक्षीदार होणे पक्या आणि उमेशच्या चांगलेच अंगलट आले. ज्यांच्यासोबत आजपर्यंत त्यांनी गुन्हे केले होते, लोकांना लुबाडून मिळवलेले पैसे उधळले होते त्या त्यांच्या साथीदारांनीच त्यांना यमसदनी पाठवले होते. इतरांचे वाईट करणाऱ्याचे कधीच चांगले होत नाही हेच खरे. पण मग सलीम आणि इक्बाल कसे काय मोकळे सुटले? त्यांना शिक्षा मिळणार की नाही? कोण देणार त्यांना शिक्षा? हे जाणुन घेण्यासाठी पुढे वाचा.”

[next] रात्रीचे दोन वाजले असतील, सावध झोप असलेल्या इक्बालच्या कानांनी जमीनीवर काहीतरी घसपटत चालल्याचा आवाज टिपला होता. त्याचबरोबर एखादी लोखंडी वस्तु फरशींवरून घासत नेल्यासारखाही आवाज येत होता. ज्या कशाचा तो आवाज येत होता ते त्याच्या भोवती फिरत असल्याचे त्याला जाणवले. डोळे किलकिले करून त्याने आजुबाजुला पहिले पण त्याला कोणीच दिसले नाही. त्याने सलीमला ढोसळले तसा तोही सावध झाला. काहीतरी घासपटत आपल्याभोवती गोल चक्कर मारतंय असे त्याने दबक्या आवाजात सलीमला सांगितले. सलीमच्या कानांनी पण तो आवाज ऐकला. खिडकीच्या दिशेने जाण्यासाठी त्यांनी गादीवरून जमीनीवर पाय टाकला आणि दोघेही कशावरून तरी सरकुन खाली पडले. दोघांनाही चांगलाच मार लागला होता पण आवाज न करता कसेतरी खिडकीपाशी जाऊन त्यांनी बाहेर सावध नजर टाकली आणि काही दिसतंय का ते पहिले त्याचवेळी तो आवाज त्यांच्या मागे येऊन थांबला. आपल्या मागे काहीतरी आहे याची जाणीव त्या दोघांनाही झाली. त्यांच्या मानेवरचे केस ताठ झाले. हळू हळू सावधपणे ते मागे वळले आणि अंधारात डोळे ताणुन पाहण्याचा प्रयत्न करू लागले. एव्हाना अंधाराला त्यांचे डोळे सरावल्यामुळे आपल्या समोर जमीनीवर काहीतरी पडलेले असल्याचे त्यांना अंधुकसे दिसले. त्यांची नजर जमीनीकडे रोखली गेल्यावर ते जे काही जमीनीवर पडले होते त्यात आता हालचाल होऊ लागली. खुरडत खुरडत ते त्यांच्या दिशेने पुढे सरकु लागले. पुन्हा तोच घासपटल्याचा आणि लोखंडी वस्तु जमीनीवर घासत गेल्यासारखा आवाज येऊ लागला. त्याबरोबर प्रतिक्षिप्त क्रियेने ते दोघे दोन पावले मागे सरकले. त्यांच्या पायाच्या तळव्यांना कसला तरी चिकट आणि गरम स्पर्श जाणवला. इक्बालने लाईटचे बटन शोधण्यासाठी भिंत चाचपडायला सुरवात केली. थोड्याशा प्रयत्नातच त्याला भिंतीवर एक बटन सापडले. त्याने बटन दाबले आणि ती रूम प्रकाशाने उजळली. दोघांनी जमीनीवर काय घासपटत होते ते पाहण्यासाठी आपली नजर पुऱ्या रूममध्ये फिरवली पण त्यांना काहीच आढळले नाही. इतक्यात सलीमचा पाय घसरून तो खाली पडला आणि त्यांचे लक्ष जमीनीकडे गेले. जमीनीवर गरम रक्ताचे थारोळे साचले होते आणि सलीम त्यात पुरा बरबटला होता. इक्बालही त्या रक्ताच्या थारोळ्यातच उभा होता. ते पाहुन दोघेही घाबरले. रूममध्ये अचानक एवढे रक्त कुठून आले हेच त्यांना समजेना. ते ज्या गाद्यांवर झोपले होते त्यांच्या सभोवतीही रक्ताचे मंडल बनले होते. मगाशी त्याच्यावरूनच ते घसरून पडले होते. हा प्रकार काही साधा सुधा नाही हे त्यांच्या लक्षात आले.

अंगाला लागलेले रक्त साफ करून इथुन लगेच निघावे असे ठरवुन ते गडबडीने बाथरूमकडे गेले. इक्बाल जास्त बरबटला नसल्यामुळे त्याने फक्त हात पाय धुतले व कपडे बदलण्यासाठी तो बाथरूमच्या बाहेर आला व सलीम बाथरूममध्ये शिरला. भितीने त्याने बाथरूमचा दरवाजा उघडाच ठेवला. गर्मीमुळे सलीमने थंड पाण्याचा शॉवर सुरु केला आणि आपले अंग चोळु लागला. इक्बाल कपडे बदलत असतानाच त्याला सलीमचे वेदनेने किंचाळणे ऐकु आले. तो धावतच बाथरूमकडे गेला. दरवाजा उघडुन त्याने आत पहिले तर त्याच्या अंगावर एकदम खुप सारी गरम वाफ आली. पुर्ण बाथरूम त्या वाफेने भरले होते आणि सलीम मात्र कुठेच दिसत नव्हता फक्त त्याचा विव्हळण्याचा आवाज ऐकु येत होता. बाथरूममध्ये आत गेल्यावर जमीनीवर एका कोपऱ्यात अस्ताव्यस्त पडलेला सलीम इक्बालला दिसला. "अरे क्या हुवा तुझे?" म्हणत इक्बाल सलीमला उठवायचा प्रयत्न करू लागला तसा सलीम त्याच्या हातातुन निसटुन खाली पडला आणि प्राणांतिक वेदनेने या अल्लाह! असे किंचाळला. इक्बालचे लक्ष स्वतःच्या हातांकडे गेले, सलीमची त्वचा त्याच्या हातावर चिकटली होती. उकळत्या पाण्यात बुडवून काढल्यासारखी सलीमची अवस्था झाली होती. “अरे तुने इतना उबलता हुवा पाणी अपने बदन पे क्यु डाला? तेरी तो खाल ही निकल गयी” असे म्हणुन इक्बाल सलीमवर थंड पाणी टाकु लागला. वेदना थोड्या कमी झाल्यावर सलीम कण्हत म्हणाला, “मैंने तो थंडा पानीही बदन पर लिया था। अचानक उबला हुवा पानी शॉवरसे बरसने लगा और मेरी ये हालत हो गयी। जैसेही गरम पानी आना शुरु हुवा मैंने शॉवर बंद करने की बहोत कोशीश की पर नल जैसे जॅम हो गया था। मैं बचने के लिये कोनोमें भी गया पर शॉवर अपने आप मेरी तरफ मुडता गया और उबले हुवे आलु जैसी मेरी खाल निकल गयी, बहोत दर्द हो रहा है यारऽऽऽ” असे म्हणत सलीम हळू हळू इक्बालच्या मदतीने बाथरूमच्या बाहेर आला.

असे कसे होऊ शकते? याचा विचार करत असतानाच इक्बालची नजर समोर रोखली गेली, त्याचे शरीर थरथरू लागले, घशाला कोरड पडली आणि त्याचा आ वासाला गेला. तो पुतळ्यासारखा जागीच थबकला. तो का थांबला म्हणुन सलीमने तो पाहत असलेल्या दिशेने पहिले आणि त्याचीही अवस्था इक्बाल सारखीच झाली. समोर आनंदचे दगडाने डोके ठेचलेले प्रेत पडले होते. त्यातुन वाहणारे रक्त संपुर्ण रूममध्ये पसरले होते. त्या दोघांची नजर त्या प्रेतावर खिळली होती आणि अचानक त्या प्रेतामध्ये हालचाल होऊ लागली. ते प्रेत खुरडत त्यांच्या दिशेने पुढे सरकु लागले आणि त्याच्या गळ्यात घुसलेला रामपुरी चाकु जमीनीवर घासला जाऊ लागला. ते पाहुन दोघेही मागे मागे सरकु लागले. अचानक ते प्रेत हवेत उसळले आणि त्यांच्यासमोर उभे राहिले. काही कळायच्या आतच त्या प्रेताने स्वतःच्या गळ्यात घुसलेला रामपुरी काढला आणि सलीमच्या गळ्यात घुसवला. त्याबरोबर सलीमच्या गळ्यातुन रक्ताच्या चिळकांड्या उडु लागल्या. उकळत्या पाण्याने भाजलेल्या सलीमसाठी तो हल्ला जीवघेणा ठरला. आपला प्राण सोडत तो जमिनीवर कोसळला त्याला तिथेच सोडुन इक्बाल दरवाजाकडे पळाला. पण दरवाजाला बाहेरून कुलुप असल्याचे लक्षात येताच तो खिडकीच्या दिशेने वळला. पाठीमागुन आपल्या मानेत काही तरी धार धार घुसल्याचे त्याला जाणवले आणि पुढच्याच क्षणाला त्याचा कंठ चिरत रामपुरीचे पाते त्याच्या गळ्यातुन बाहेर आले. जमीनीवर सांडलेल्या स्वतःच्याच रक्तावरून त्याचा पाय सरकला आणि तो खिडकीसकट घराच्या बाहेर फेकला गेला. डोक्यावर पडल्यामुळे त्याचे डोके फुटले व मानेचे मणके तुटले. मानेत घुसलेल्या रामपुरीच्या पात्याने त्याचे शीर अलगद धडावेगळे केले. इक्बालच्या सताड उघड्या पडलेल्या डोळ्यात मुर्तिमंत भीती दाटली होती. आपल्या खुनाचा बदला आनंदच्या आत्म्याने सलीम आणि इक्बालला भयानक मृत्यू देऊन घेतला आणि त्याच्या अमंगळ भेसुर अश्या सैतानी हास्याने ते निर्जीव घरही शहारले. “म्हणजे आनंद, आपल्या मारेकऱ्यांचा बदला घेण्यासाठी परत आला होता तर! पक्या आणि उमेशला सलीम आणि इक्बालने संपवले. त्या दोघांना आनंदच्या आत्म्याने संपवले. खेळ खल्लास! पर पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! वामनराव कुलकर्णी आनंदच्या हिट लिस्टवर होते हे आपल्याला विसरून चालणार नाही. आता आनंदचा आत्मा अजुन काय काय गोंधळ घालतो ते पुढे वाचा.”

[next]आनंदच्या मृत्यूच्या धक्क्यातुन अस्मिता आता कुठे सावरू लागली होती तोच पेपर मधील बातमीने तिला परत भुतकाळात ढकलले. “आनंद शिवलकर खुन खटल्यातील दोन कैद्यांची इतर दोन कैद्यांकडुन हत्या” लगेच जोडुन दुसरी बातमी होती, “साथीदारांचा खुन करून जेलमधुन फरार कैद्यांचे मृतदेह गावातील बंद घरात आढळले” त्या दोन्ही बातम्या आणि त्यातील मृतदेहांच्या अवस्थेचे वर्णन वाचुन तिच्या शरीरावर काटा आला. इतक्या निर्दयपणे कोणी खुन केले असतील असा विचार तिच्या मनात येतो न येतो तोच वामनराव तिच्या बेडरूम मध्ये आले. अस्मिताच्या हातातील पेपर पाहुन त्यांच्या कपाळावर आठ्या पसरल्या. तिच्या हातातील पेपर खेचुन घेत ते म्हणाले, “या असल्या बातम्या वाचणे बंद करा आणि अभ्यासात लक्ष्य द्या जरा! आम्ही तुला या सगळ्यातुन बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि तु परत परत त्यातच गुंतुन पडते आहेस. आनंद मेलाय आणि त्याच्यासोबत तुझा भुतकाळही! ज्या माणसाने तुला फसवुन तुझा विश्वासघात केला, पैशासाठी अनन्वित छळ केला, मारझोड केली, उपाशी ठेवले, तुझ्या बापाचा अपमान केला आणि पैसेही उकळले अशा माणसासाठी तुझे मन अजुनही द्रवते याचे मला आश्चर्य वाटते. आजपासुन या घरात जर त्या हरामखोराचे नावच काय पण त्याचा साधा विचार जरी तुझ्या मनात आला तर माझ्यासारखा वाईट आणखी कोणी नसेल!” असे म्हणुन वामनराव पेपर घेऊन अस्मिताच्या रूममधुन बाहेर निघुन गेले. दरवाजाबाहेर वामनराव आणि दरवाज्याच्या आत अस्मिता, दोघांचेही डोळे भरले होते. अस्मिताच्या आईने वामनरावांना सावरले. अश्रुंनी डबडबलेल्या डोळ्यांनी ते आपल्या पत्नीला म्हणाले, “मला आपल्या अस्मिची काळजी वाटते गं! माझ्या इवल्याश्या पोरीच्या नशिबी एवढ्या कमी वयात हे कसले भोग त्या विधात्याने लिहुन ठेवले आहेत, ते त्याचे त्यालाच ठाऊक.” आणि ते हमसुन हमसुन रडू लागले. वामनराव अस्मिताविषयी फारच हळवे होते हे त्यांच्या पत्नी जाणत होत्या. त्यांचे सांत्वन करताना त्या म्हणाल्या, “तुम्ही नका काळजी करू. काळ हेच यावरचे औषध आहे. आपली अस्मि पुन्हा पहिल्यासारखी होईल पण त्यासाठी आपल्यालाच थोडा संय्यम बाळगला पाहिजे. ती खुश राहील असे वातावरण ठेवले पाहिजे म्हणजे ती पुन्हा पुन्हा तिच्या भुतकाळात नाही जाणार. सगळे काही व्यवस्थित होईल तुम्ही नका त्रास करून घेऊ. कळतंय ना मी काय म्हणतेय ते” यावर मान हलवुन वामनरावांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला आणि आपले डोळे पुसत ते घराबाहेर पडले.

वामनराव अस्मिताच्या खोलीतुन निघुन गेले आणि थोड्याच वेळात अस्मिताच्या किंकाळीने त्यांचा बंगला दुमदुमला. अस्मिताची आई धावतच तिच्या रूममध्ये आली. पाहाते तर अस्मिता बेडवर उपडी पडली होती. तिचे केस तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. ड्रेस फाटला होता आणि तिच्या नाजुक, गोऱ्या, उघड्या पाठीवर उभे आडवे वळ उठले होते व त्यातुन रक्त वाहत होते. जणु काही कुणी तरी तिच्या पाठीवर चाबकाने जबरदस्त फटके दिले होते. वेदनेने ती बिचारी विव्हळत होती. अस्मिताच्या आईने तिला जवळ घेतले व काळजीने तिला विचारू लागल्या, “काय झाले अस्मि? तुझ्या पाठीवर हे वळ कसे उठले? कोणी मारले तुला?” “आई! तो परत आलाय!” अस्मिता रडत म्हणाली. "कोण परत आलाय? काय बोलतेस तु?" तिच्या आईला काहीच कळेना. आनंद परत आलाय असे अस्मिताने म्हणताच तिच्या आईच्या काळजाचा ठोकाच चुकला. "मला नीट सांग, आनंद परत आलाय म्हणजे काय? त्याचा तर खुन झाला ना? मग तो परत कसा येईल?" अस्मिताची आई पुरती घाबरली होती. "आई तो मेलाय पण त्याचा आत्मा अजुन माझ्या अवती भवती वावरतोय. तो मला त्याच्यासोबत घेऊन जाणार आहे आणि त्याने मला धमकी दिली आहे की मी जर का इतर कोणाचा विचारही केला तर तो माझा खुप छळ करेल. आत्ता बाबा बाहेर गेल्यावर मी रडत बसले होते तेव्हा अचानक रूम मधली हवा जड झाली, वातावरण अंधारून आले. मला थंडी भरून आली म्हणुन मी पांघरूण अंगावर ओढून घेतले तर कोणी तरी खसकन अंगावरून ओढून फेकावे तसे ते फेकले गेले आणि मला आनंदचा आवाज ऐकू आला. तो म्हणाला, "तुला वाटत असेल की वशीकरण नाहीसे झाल्यावर आणि माझा खुन झाल्यामुळे तुझी माझ्यापासुन सुटका झाली म्हणुन! पण तुला माझ्यापासुन फक्त एकच जण वाचवु शकतो तो म्हणजे फक्त मी. तुझा बाप माझे काहीच बिघडवु शकत नाही. मला मारणाऱ्यांचा बदला तर मी घेतला आत्ता तुझ्या बापाची पाळी आहे. तुला माझ्यापासुन घेऊन जातो काय? आत्ता बघतोच मी तो माझे काय वाकडे करतो ते!" असे म्हणुन त्याने मला मारण्यास सुरवात केली. त्याने मला खुप मारले. तो मला कधीच सोडणार नाही. माझी यातुन सुटका होणे अशक्य आहे. मी कोणाचे काय बिघडवले म्हणुन मला हे भोगावे लागतंय? मला वाचव आई!" असे म्हणुन अस्मिता मोठमोठ्याने रडु लागली. अस्मिताच्या आईला काहीच समजेना की काय बोलावे आणि काय करावे. आपल्या मुलीच्या काळजीने ती अर्धी झाली होती. शेवटी तिने अस्मिताच्या जखमांवर हळद लावली आणि वामनरावांना फोन लावला.

“अस्मिताच्या आईकडुन सगळा प्रकार कळल्यावर वामनराव नखशिखांत हादरतात. आगीतुन फुफाट्यात सापडल्यासारखी त्यांची अवस्था झाली. आनंद जीवंत असताना आपली ओळख आणि समाजातील स्थान याच्या बळावर ते त्याचा बंदोबस्त करू शकले असते पण इथे तर त्याच्या आत्म्याशी गाठ होती. आत्ता वामनराव काय शक्कल लढवतात? आनंदच्या आत्म्यापासुन ते अस्मिताचे रक्षण करू शकतात की त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात येतो हे जाणण्यासाठी पुढे वाचा.”

[next] वामनराव गडबडीने घरी पोहोचले ते डॉक्टरांना सोबत घेऊनच. अस्मिताला तपासुन डॉक्टरांनी मलमपट्टी केली व काही औषधे, गोळ्या व मलम लिहुन दिले. डॉक्टर जायला निघाले तोच त्या रूम मधील वातावरण पुर्वीसारखेच बदलुन गेले. अस्मिता भिरभिरत्या नजरेने इकडे तिकडे बघु लागली. जणु काही ती कोणाला शोधते आहे. “तो आलाय! तो मला जीवंत सोडणार नाही! मी मरणार! तो कोणालाच सोडणार नाही! बाबा मला वाचवा!” म्हणुन ती वामनरावांना बिलगु लागली. ती पुरती भेदरली होती. काही कळायच्या आतच त्या डॉक्टरच्या पोटात एक सणसणीत ठोसा बसला. त्या ठोशाने तो डॉक्टर कमरेतुन पुढे वाकला त्यासरशी एक जबरदस्त लाथ त्याच्या पार्श्व् भागावर बसली आणि तो सात आठ फुट दूर उडून तोंडावर पडला. अस्मिताच्या पाठीवर उठलेल्या वळांसारखेच वळ त्याच्या हातापायावर व पाठीवर उठु लागले. तो जोरजोरात ओरडु लागला. त्यासरशी एक भयाण अमंगळ अमानवी हास्य अस्मिताच्या रूममध्ये घुमु लागले. वामनरावांसह सर्वच जण होत असलेला प्रकार लाचारपणे पाहत उभे होते. कोणी काहीच करू शकत नव्हते आणि डॉक्टरच्या ओरडण्याबरोबर त्याला आणखीनच जोरात फटके पडत होते. एकवेळ डॉक्टरने उठून दरवाज्याकडे पळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला तर जवळच असलेले एक छोटे लाकडी स्टूल हवेत उडाले आणि डॉक्टरच्या पायांवर आदळले त्यासरशी तो डॉक्टर कोलांटी उडी मारून जमीनीवर आदळला. तसा हसण्याचा आवाज अधिकच भेसूर झाला. एखाद्या उंदराला मांजर जसे खेळवते तसा आनंदचा आत्मा त्या डॉक्टरला खेळवत होता. त्याला वामनरावांना दाखवुन द्यायचे होते की तो काय करू शकत होता. त्याचे समाधान झाल्यावर तो त्या डॉक्टरला उद्देशून म्हणाला, "डॉक्टर परत जर का या घरात आलास तर येशील आपल्या पायावर पण जाशील चार खांद्यांवर. समजलास? चल निघ. आणि बरं का सासरेबुवा! ही तर सुरवात आहे, आगे आगे देखो होता है क्या!" असे म्हणुन त्याने आपली एक झलक दाखवली आणि एक गडगडाटी हास्य करून तो गायब झाला. सगळेजण थिजल्यासारखे जागेवर उभे होते. आनंदच्या आत्म्याने आपले अस्तित्व दाखवुन दिले होते. त्याचे ते भयानक रूप पाहुन वामनरावांसकट सर्वांचाच घसा सुकला. कोणाच्याही तोंडुन शब्दच फुटेना. पुर्ण घरात भयाण शांतता पसरली होती. इतक्यात वामनरावांचा मोबाईल फोन खणखणला आणि सगळेचजण दचकले. वामनरावांना सावरायला काही वेळ गेला. फोनवर महादेव होता.

वामनरावांचा खोल गेलेला आवाज ऐकुन महादेव सावध झाला आणि काही तरी गंभीर समस्या उद्भवली आहे हे त्याने ताडले. फोनवर बोलणेही वामनरावांना कष्टप्रद वाटत होते. त्यामुळे फोनवर बोलणे शक्य नसल्यास प्रत्यक्ष भेटुन बोलुया असे सुचवुन वामनरावांना भेटण्यासाठी तो त्यांच्या घरी येत आहे असे त्याने सांगितले. तेव्हा घरी नको ऑफिसला ये! असे सांगुन वामनरावांनी फोन ठेवला. पुढच्या अर्ध्या तासात महादेवची कार वामनरावांच्या ऑफिस समोर थांबली. चौथ्या मजल्यावरील आपल्या ए.सी केबिन मध्ये घामाघुम झालेले वामनराव शुंन्यात नजर लावुन बसले होते. महादेव आल्याचे त्यांच्या ध्यानातही आले नाही एवढे ते अंतर्बाह्य हादरले होते. “काय झाले काका? तुम्ही एवढे घाबरलेले का दिसत आहात? anything serious?”, महादेवच्या प्रश्नाने भानावर आलेल्या वामनरावांनी त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग शांतपणे महादेवाला सांगितला व म्हणाले, "मला वाटले होते तो चांडाळ मेला आणि माझी अस्मि त्याच्या तावडीतुन सुटली पण नाही. तो माझा भ्रम होता. जीवंतपणी त्याने माझ्या काळजाच्या तुकड्याला एवढा त्रास दिला. आता तर तो भुत बनला आहे. माझ्या पोरींचे काय हाल करेल याचा विचार करूनही मला कापरे भरतय. माझा राग तो माझ्या पोरीवर काढतोय. तो जीवंत असता तर मी त्याचा काही तरी बंदोबस्त केला असता पण आता तर मी असहाय आणि लाचार झालोय. माझं डोकंच काम करेनासे झालय. महादेवा माझ्या पोरीला वाचव रे!" असे म्हणुन वामनरावांनी महादेव समोर हात जोडले. "अहो काका असे हातपाय गाळुन कसे चालेल? या आधीही आपण आलेल्या संकटांवर उपाय शोधुन काढला होताच ना? मग याही संकटावर उपाय सापडेलच की! फक्त तुम्ही हताश होऊ नका. मला थोडा विचार करू दे. मी काही ना काही मार्ग शोधुन काढेनच." असे म्हणुन महादेव ऑफिस मधुन बाहेर पडला. वामनरावांना जरी त्याने सांगितले असले की तो काही ना काही मार्ग शोधुन काढेल तरी त्यावेळेस त्याला स्वतःलाच कळत नव्हते की काय करावे. भुतापुढे सामान्य माणसांचे काय चालणार? तो विचारात पडला. त्याला काहीच सुचेना तेव्हा त्याने आपल्या वडिलांशी या विषयावर बोलायचे ठरवले. आतापर्यंत जेव्हा जेव्हा त्याला एखाद्या अडचणीतुन बाहेर पडण्याचा मार्ग सापडला नव्हता तेव्हा तेव्हा त्याला त्याच्या वडिलांच्या मार्गदर्शनाचा खुप फायदा झाला होता.

खचलेले वामनराव महादेवला भेटायला बोलावतात. महादेव त्यांना धीर देतो आणि आलेल्या समस्येवर उपाय शोधण्याचे आश्वासन देतो. अस्मिताच्या काळजीने चिंताग्रस्त असलेला महादेव आपल्या वडिलांचा सल्ला घ्यायचे ठरवतो. त्याचे वडील त्याची मदत करतात का? महादेवाला अस्मिताला वाचवण्यासाठी उपाय सापडतो का? हे जाणुन घेण्यासाठी पुढे वाचा.

[next] सयाजीराव काळे हे बिल्डर लॉबीतले नावाजलेले प्रस्थ होते. सुरुवातीपासुनच त्यांनी महादेवला मित्रवत वागवले होते त्यामुळे महादेव कधीच त्यांच्यापासुन काही लपवत नसे. महादेवचा चिंताक्रांत चेहरा पाहुन ते मनातुन समजले की काही तरी प्रॉब्लेम आहे. त्यांनी महादेवला प्रेमाने विचारले, "काय चिरंजीव! कसले एवढे टेन्शन आलंय आपल्याला? माझ्याशी शेयर केले तर चालेल." त्यावर आतापर्यंत घडलेली हकीकत महादेवने आपल्या वडिलांना न संकोच करता सांगितली. "आता या सगळ्यातुन अस्मिताला कसे वाचवावे तेच मला कळत नाही", महादेवच्या आवाजातील चिंता स्पष्टपणे व्यक्त होत होती. अच्छा! म्हणजे इथे मामला दिलका आहे तर! सयाजीराव महादेवची टेर उडवत म्हणाले. यावर महादेव थोडा वैतागत म्हणाला, "काय हो बाबा! मी इथे टेन्शनमध्ये आहे आणि तुम्हाला चेष्टा सुचतेय." सयाजीराव हसत हसत म्हणाले, “बरं बरं! या आधी वशीकरणातुन त्या मुलीची सुटका करण्यासाठी त्या तांत्रिकाने मदत केली होती म्हणालास ना? मग यावेळीही तो मदत करेलच की!”, “बाबा, यु आर ग्रेट! हे माझ्या लक्षातच आले नाही! मी आत्ता वामन काकांना फोन करतो” महादेव आनंदुन म्हणाला. त्याने तडक वामनरावांना फोन लावला आणि त्याला उपाय सापडल्याचे सांगितले. वामनरावांच्या उतरलेल्या चेहऱ्यावर आशेचे किरण चमकु लागले. महादेवाला भेटण्यासाठी ते तातडीने निघाले. दरवाज्यात त्यांचा लाडका कुत्रा टायगर त्यांची वाट अडवुन उभा होता. ते त्याला चुचकारून पुढे जायचा प्रयत्न करू लागले तर तो त्याच्या आडवा आडवा जाऊन त्यांच्यावर भुंकू लागला. गडबडीत वामनरावांच्या लक्षात आले नाही की टायगर त्यांना काहीतरी सांगु पाहतोय, वैतागुन त्यांनी त्याच्यावर कोपऱ्यातील काठी उगारली तरीही तो त्यांना जाऊ देईना. शेवटी टायगरला ढकलून ते कारच्या दिशेने गेले तर टायगर परत त्यांना आडवा गेला व कारकडे पाहत जोरजोरात भुंकू लागला. तसे वामनरावांचे लक्ष कारच्या मागच्या सीटकडे गेले. तिथे सीटवर एक काळी आकृती बसलेली त्यांना दिसली.

क्षणात त्यांना टायगरच्या विचित्र वागण्यामागचे कारण लक्षात आले. ते समजले की आनंद त्यांना दगाफटका करायची वाटच बघतोय. त्यांना आपल्या इमानी कुत्र्याचे खुप कौतुक वाटले. आपल्या काहीच लक्षात आलेले नाही असे दाखवत ते टायगरवर ओरडत परत घरात गेले. अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचा अंगारा त्यांनी अस्मिताच्या, आपल्या पत्नीच्या आणि स्वतःच्या कपाळावर लावला आणि थोडा पुडीतही बांधुन घेतला. तोंडाने श्री स्वामी समर्थ म्हणत ते कारच्या दिशेने निघाले. अचानक कारचा मागचा दरवाजा धाडकन उघडला गेला आणि एक काळी आकृती त्यातुन वेगाने बाहेर निघुन जाताना त्यांना दिसली. आपली आयडिया उपयोगी ठरल्याचे त्यांना समाधान वाटले. स्वामी समर्थांचे आभार मानत ते पटकन कारमध्ये बसले आणि त्यांनी कार महादेवच्या ऑफिसच्या दिशेने दामटली. "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" हे कारच्या मागच्या काचेवर लिहिलेले वाक्य जणु आनंदला वाकुल्या दाखवत होते. तो खुप चिडला होता, रागाच्या भरात त्याने लोखंडी गेट वाकवुन टाकले. रागाने धुसफुसत तो अस्मिताच्या रूममध्ये गेला पण त्याला अस्मिताच्या जवळही जाता आले नाही. अंगाऱ्याने आपले काम चोख बजावले होते. रागाने बेभान होत तो वामनरावांच्या मागे गेला. वामनरावांना किंवा त्यांच्या गाडीला तो स्पर्शही करू शकत नव्हता हे लक्षात आल्यावर त्याने समोरून येणाऱ्या कारच्या चालकाला आपले हिडीस रूप दाखवले त्यामुळे घाबरून त्याने कारचे स्टेरिंग वळवले आणि त्याची कार थेट वामनरावांच्या कारला जाऊन भिडली. टक्कर जबरदस्त होती पण वामनरावांच्या सुदैवाने त्यांना खरचटण्यापलीकडे फारसे काही लागले नाही. गर्दी जमली. वामनरावांना पाहुन अनेकजण मदतीला आले. वामनरावांनी फोन करून महादेवला आणि आपल्या ड्रायव्हरला तिथे बोलावुन घेतले. ते दोघे तिथे येताच ड्रायव्हरला पुढचे निस्तरायला सांगुन महादेवसह ते पुढे निघाले.

आपल्या इमानी कुत्र्यामुळे आणि स्वामी समर्थांच्या कृपेमुळे जीवघेण्या संकटातुन वामनराव थोडक्यात बचावले होते. महादेवसह ते त्या तांत्रिकापर्यंत सुखरूप पोहोचतात का? तो त्यांची मदत करायला तयार होतो का? हे जाणण्यासाठी पुढे वाचा.

[next] "काका, हा ऍक्सीडन्ट कसा काय झाला? तुम्हाला काही लागले तर नाही ना?" या महादेवच्या प्रश्नावर "आनंदमुळे ऍक्सीडेन्ट झाला पण स्वामींची कृपा म्हणुन वाचलो" असे म्हणत वामनरावांनी स्वामी समर्थांचा अंगारा महादेवच्या कपाळावर आणि गाडीच्या डॅशबोर्डवरही लावला. "हा! आत्ता बोल. तुला कोणता उपाय सापडलाय?" वामनरावांनी उत्सुकतेने महादेवला विचारले. ज्या तांत्रिकाने अस्मितावरील वशीकरण दूर करण्यासाठी आपल्याला मदत केली होती आपण त्याच्याकडेच जात आहोत. तुम्हाला आठवते? तो आपल्याला म्हणाला होता की कधी गरज वाटली तर माझ्याकडे बिनधास्त या म्हणुन. आज ती वेळ आली आहे. आणि माझी खात्री आहे या संकटातुनही तोच आपल्याला वाचवेल." महादेव उत्साहाने म्हणाला. "अरे हो! हे तर माझ्या लक्षातच आले नाही. तु भारी डोकं चालवलंस." वामनराव लहान मुलासारखे उसळत म्हणाले. "हे माझे नाही माझ्या वडिलांचे डोके आहे. इतक्या सहजपणे ते बोलुन गेले की मलाही तुमच्याच सारखे वाटले की अरे हे माझ्या का लक्षात आहे नाही? त्या तांत्रिकाला तर मी विसरूनच गेलो होतो.." महादेव उत्तरला. "कोण सयाजीराव! त्यांना हा सगळा विषय माहित आहे?" या वामनरावांच्या प्रश्नावर महादेवने हसत होकारार्थी मान डोलावली. तुमच्या कुटुंबाचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत." वामनराव कृतज्ञतेने म्हणाले.

गाडी वेगाने तांत्रिकाची झोपडी जवळ करत होती. तासभर गाडी चालवल्यावर ते दोघे त्या वडाच्या झाडाजवळ पोहोचले. तिथे कार पार्क करून पायवाटेने चालत ते तळ्याच्या बाजुने पुढे गेल्यावर पिंपळाच्या झाडाजवळ आले. झोपडीच्या बाहेर उभे राहुन त्यांनी तांत्रिकाला आवाज दिला. पण पुर्वीप्रमाणेच त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. कण्हण्याचा आवाज ऐकुन त्यांनी आत डोकावुन पहिले तर तांत्रिक अर्धमेल्या अवस्थेत जखमी होऊन जमिनीवर पडला होता. तो शेवटचे श्वास घेत होता. ते पाहुन दोघेही त्याच्या मदतीला धावले. त्याला उठवुन बसते केले आणि महादेवने जवळच्याच मातीच्या गेळ्यातील पाणी त्याला पाजले. मोठ्या कष्टाने तो तांत्रिक बोलु लागला. तुम्हाला घाई करावी लागेल. वेळ थोडा आहे. आनंदचा आत्मा खुप शक्तिशाली झाला आहे. तो तुमच्या मुलीला आपल्या सोबत घेऊन जायच्या प्रयत्नात आहे. त्याच्या भावाने त्याचे शरीर तर जाळले पण त्याच्या अस्थी विसर्जित केल्या नाहीत त्यामुळे आनंदच्या आत्म्याला मुक्ती मिळाली नाही. त्यात मरताना त्याच्या मारेकऱ्यांचा आणि तुमचा सुड घेण्याची त्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे ती इच्छाच त्याचे सामर्थ्य बनले आहे. तुमच्या मुलीला वशीकरणातुन मुक्त करण्याचा उपाय सुचवल्यामुळे आधीच तो नाराज होता त्यात तुम्ही त्याच्यापासुन आपल्या मुलीची सुटका करून घेण्यासाठी माझ्याकडे येत आहात हे कळल्यावर त्याने मला ठार मारायचा प्रयत्न केला. माझ्या जप सामर्थ्याने मी त्याचा प्रतिकार केला पण तो मला वरचढ ठरला. तुम्ही लवकरात लवकर आनंदच्या अस्थी विसर्जित करा म्हणजे त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळेल आणि तेव्हाच तुमची मुलगी त्याच्या त्रासातुन कायमची मुक्त होईल. एवढे बोलुन त्या तांत्रिकाने प्राण सोडले.

"ज्याच्या भरवशावर महादेव आणि वामनराव आनंदच्या आत्म्याविरुद्ध लढाई पुकारू पाहात होते तोच अचानक त्यांना अर्ध्यावर सोडुन गेला. एकीकडे आनंदचा आत्मा अधिकाधीक शक्तिशाली होत चालला होता तर दुसरीकडे तांत्रिकाचा मृत्यू झाल्यामुळे महादेव आणि वामनराव एकदम कमकुवत झाले होते. काय होणार पुढे? आनंदच्या आत्म्याला महादेव आपल्या बुद्धीसामर्थ्यावर मात देऊ शकेल का? अस्मिताची या दुष्टचक्रातुन सुटका होते का? जाणण्यासाठी पुढे वाचा."

[next] आपण काय विचार करत होतो आणि काय होऊन बसले. वामनरावांच्या पायातील त्राणच निघुन गेले आणि ते मटकन खालीच बसले. त्यावेळी महादेवने त्यांना सावरले. तो म्हणाला, "काका, हीच तर खरी परीक्षेची वेळ आहे, आत्ता हात पाय गाळुन कसे चालेल? आपल्याला उपाय तर समजला आहे, आत्ता फक्त गरज आहे ती तो अमलात आणण्याची. आपण नक्की यशस्वी होऊ. पण तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे वेळ थोडा राहिला आहे, घाई केली पाहिजे. चला उठा." असे म्हणत महादेव वामनरावांना धीर देत उठवु लागला. वामनराव भानावर आले. काही झाले तरी अस्मिताला आनंदपासून कायमची मुक्ती मिळवुन द्यायचीच, त्यासाठी आपला जीव गेला तरी बेहत्तर असा पक्का इरादा त्यांनी केला. तिथेच एक चिता रचुन त्या दोघांनी तांत्रिकाच्या मृतदेहाला भडाग्नी दिला. तांत्रिकांचे मन:पूर्वक आभार मानुन आणि त्याच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी प्रार्थना करून महादेवने आपली कार आनंदच्या घराच्या दिशेने भरधाव सोडली. तासाभरातच ते आनंदच्या घराजवळ पोहोचले पण महादेवने आपली कार आनंदच्या घरापासुन थोडी दूरच उभी केली. वामनरावांना तिथेच थांबण्यास सांगुन महादेव एकटाच आनंदच्या घराकडे गेला. साधारण अर्ध्या तासाने तो परत आला. वामनराव चिंतातुर झाले होते. "कुठं गेला होतास? आपल्याला अस्थी कलश ताब्यात घ्यायचा आहे ना?" असे त्यांनी विचारताच "थोडा धीर धरा. योग्य वेळ आली की आपण आत जाणारच आहोत." दोघेही कार मध्ये बसुन आनंदच्या घराकडे लक्ष ठेऊन होते. पुढच्याच क्षणाला आनंदची आई आणि वाहिनी घरातुन बाहेर पडले. त्या दोघी दूर जाताच महादेवने आपली कार आनंदच्या घराच्या समोर उभी केली. निर्णायक वेळ जवळ आली होती. आनंदच्या आत्म्याकडुन विरोध होणार हे तर स्पष्टच होते, पण त्यांनी हिम्मत गोळा केली आणि दरवाजा ठोठवला. पण आतुन काहीच प्रतिसाद मिळाला नाही. वामनरावांनी पुन्हा दरवाजा ठोठवण्यासाठी हात उचलला पण दरवाजा उघडच होता त्यामुळे तो आत ढकलला गेला. वामनराव आणि महादेव दोघांनी एकमेकांकडे पहिले. महादेवने खुणेनेच वामनरावांना आश्वस्त केले आणि आत चालण्यास सांगितले. दोघेही उघड्या दरवाज्यातून आत शिरले. घरात अर्धांगवात झालेले आनंदचे वडील कोपऱ्यात एका कॉटवर पडून होते. बाकी सर्वजण आपापल्या कामावर गेले होते. वामनराव हॉलमध्ये, आणि महादेव किचनमध्ये आनंदच्या अस्थी शोधु लागले. अचानक दरवाजा धाडकन बंद झाला. त्या आवाजाने दोघेही दचकले पण एकमेकाला धीर देत त्यांनी शोध सुरुच ठेवला. शोधता शोधता ते दोघे आनंदच्या वडिलांच्या कॉट समोरील भिंतीवर असलेल्या फडताळामध्ये अस्थी शोधु लागले आणि अचानक त्यांच्या खांद्यावर दोन हात पडले. काही कळायच्या आत वामनराव आणि महादेव मागच्या मागे फेकले गेले. दोघेही चांगलेच आपटले. महादेव तरुण असल्यामुळे त्याने तो दणका झेपवला पण वामनरावांसाठी मात्र तो दणका जबरदस्त ठरला. त्यांची कंबर, कोपरं आणि डोके सणकुन आपटले. पडल्या पडल्या दोघांनी समोर पहिले तर तिथे आनंदचे वडिल पाठमोरे उभे होते.

स्वामी समर्थांचा अंगारा लावला असल्यामुळे आनंद त्या दोघांना स्पर्श करू शकत नव्हता त्यासाठी त्याला मानवी शरीराचे माध्यम हवे होते आणि तिथे एकमेव माध्यम होते ते म्हणजे त्याचे वडिल. अर्धांगवाताने अंथरुणाला खिळलेला माणुस उभा कसा राहील? आणि एकावेळी दोन पुरुषांना उचलुन कसा काय फेकु शकेल? हा विचार मनात येतो न येतो तोच आनंदचे वडिल त्यांच्या समोर उभे ठाकले. त्यांनी महादेवाला उचलुन आपल्या कॉटवर फेकले. महादेव कॉटवर आदळताच कॉटला लागुन असलेल्या भिंतीतील कपाटावर त्याची लाथ बसली आणि जर्जर झालेले खिडकीचे तावदान खाडकन तुटले. आत ठेवलेला अस्थी कलश महादेवला दिसला. त्याने खुणेनेच वामनरावांचे लक्ष तिकडे वेधले. आणि त्यांना नजरेने खुणावले की मी अस्थी विसर्जनाचे बघतो तुम्ही आनंदला रोखा. त्याचा इशारा लक्षात येताच वामनरावांनी आनंदच्या वडिलांच्या अंगावर झेप घेतली आणि त्यांना खाली पाडले. त्याचवेळी महादेवने चपळाईने कलश हस्तगत केला आणि दरवाज्याकडे धावला. आनंदच्या हे लक्षात येताच त्याने आपल्या वडिलांचे शरीर सोडले आणि महादेवच्या पाठीमागे गेला. महादेवने कलश गाडीत टाकला आणि गाडी सरळ नदीच्या दिशेने सुसाट सोडली. आनंदचा आत्मा पाठोपाठ होताच. वामनराव सावरून दरवाज्यातुन बाहेर पडणार इतक्यात आकाश घरात शिरला. त्याच्या घरातुन बाहेर पडलेल्या महादेवला कार वेगाने घेऊन जाताना पाहून त्याला संशय आला म्हणुन तो पटकन घरात शिरला तर समोर वामनरावांना पाहुन त्याचा संशय अजुनच बळावला. त्याची नजर भिंतीमधील कपाटाकडे गेली. त्याचे तुटलेले तावदान आणि गायब झालेला अस्थी कलश पाहताच तो प्रचंड भडकला. त्याने वामनरावांनी कॉलर पकडली आणि त्यांच्यावर हात उगारला. त्याच्या हात, घरात शिरणाऱ्या त्याच्या आईने वरच्यावर पकडला. त्यामुळे आकाश आश्चर्यचकित झाला. तो रागाने आपल्या आईवर ओरडला, तसे त्याच्या आईने त्याच्या मुस्काटात ठेऊन दिली. सुरु असलेला प्रकार आकलनाच्या बाहेर असल्यामुळे वामनराव शांतपणे काय घडतंय ते समजुन घ्यायचा प्रयत्न करत होते.

"हे तर अजबच घडले. आकाशच्या आईने त्याच्या कानाखाली वाजवली तिही वामनरावांसाठी! हे काय नवीन प्रकरण आहे? महादेव आनंदच्या अस्थी सोबत तर घेऊन गेला पण तो त्या विसर्जित करू शकतो का? की या प्रकरणाला अजुन काही वेगळीच कलाटणी मिळते? ते जाणण्यासाठी पुढे वाचा."

[next] आकाशाची आई त्यांच्या समोर आली आणि हात जोडुन म्हणाली, "वामनराव आम्हाला माफ करा. आई म्हणून कर्तव्यात मी चुकले आणि शिक्षा मात्र तुम्हाला भोगावी लागली. कसाही असला तरी आनंद माझा मुलगा होता, माझ्या काळजाचा तुकडा होता. पैशाच्या लोभाने त्याच्या सोबत मीच काय सगळे कुटुंब आंधळे झाले होते. त्या हव्यासापायी मी माझा मुलगा गमावला. आणि तुम्ही तुमची मुलगी गमावण्याच्या आत मला माझी चुक सुधारायची आहे कारण आता जो परत आलाय तो माझा मुलगा नक्कीच नाही." "आई तु शुद्धीवर आहेस का? काय बोलतेस ते तुझे तुला तरी कळते का?" आकाश गुरगुरला. तेव्हा आकाशाची आई त्याच्याकडे पाहात म्हणाली, "शुद्धीत तर मी आता आले आहे. सोन्यासारखी मुलगी घरात सुन बनुन आली आणि मी तिला आपल्या मुलीप्रमाणे वागवायचे सोडुन तिचा सासुरवास केला, तिला उपाशी ठेवले. कामे करून घेतली. नाही नाही ते बोलले. माझी चुक झाली, पण आता मला ती सुधारायची आहे. आकाश, आपल्याला आनंदला मुक्त केले पाहिजे बाळा! नाहीतर तो होत्याचे नव्हते करून टाकेल. रागाच्या भरात तो आपल्या कुटुंबालाही देशोधडीला लावेल. महादेव आम्हाला भेटायला आला होता, त्याने आमचे डोळे उघडले. आपण आनंदला तर गमावले पण आता वामनरावांनी तरी त्यांची मुलगी गमावता काम नये. माझे ऐक आकाश, आनंदला मुक्त कर. त्यातच सगळ्यांचे भले आहे. कष्टाची भाकरीच चांगली. हरामाच्या पैशानी मिळालेले अन्न विषासारखेच असते? अस्मिताला काही झाले तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. जा. तिला वाचवायला वामनरावांना मदत कर." सुमननेही आपल्या सासुची बाजु घेतली आणि अस्मिताला वाचवण्यासाठी आकाशला गळ घालु लागली. क्षणभर विचार केल्यावर आकाशलाही ते पटले. परिस्थिती आपल्या बाजुने वळतेय हे लक्षात येताच वामनरावांनी आपल्याला आता घाई केली पाहिजे असे आकाशला सुचवले. त्यावर आकाश त्यांना म्हणाला, "वामनराव माझ्या आईने माझे डोळे उघडले, आम्हाला सगळ्यांनाच माफ करा." अस्मिताच्या काळजीने चिंताक्रांत झालेले वामनराव काकुळतीला येत म्हणाले, "ते सगळे ठीक आहे पण आनंदने महादेवला गाठायचा आत तो कलश त्याब्यात घेऊन अस्थी विसर्जित करणे अत्यावश्यक आहे. लवकर चल."

यावर आकाशची आई म्हणाली, "कुठेही जायची गरज नाही. महादेव जो कलश घेऊन गेला आहे तो रिकामा होता, अस्थी असलेला कलश कपाटात मागे ठेवला आहे." ते ऐकुन वामनरावांचा जीव भांड्यात पडला. "काळोख बराच झालाय पण मला एक शॉर्टकट माहित आहे, त्याने आपण नदीवर लवकर पोहोचु आणि आनंदच्या अस्थींचे विसर्जन करू." असे म्हणत आकाशने आनंदच्या अस्थी असलेला कलश बाहेर काढला आणि सर्वजण नदीच्या दिशेने निघाले. इकडे महादेव नदीकाठी पोहोचणार इतक्यात वळणावर समोर आलेल्या ट्रकपासुन वाचण्याच्या प्रयत्नात महादेवची कार रस्ता सोडुन खाली उतरली. खड्ड्यात चाक गेल्यामुळे एका बाजुला कलंडली आणि उलटी झाली. सिटबेल्ट लावलेला असल्यामुळे आनंदला खुप मोठी दुखापत झाली नसली तरी जोराच्या झटक्याने त्याची मान मात्र चांगलीच दुखावली. काळोख झाल्यामुळे घाटावर चिटपाखरूही नव्हते त्यामुळे ऍक्सिडंट झालेला कोणाच्या लक्षातही आले नाही. कोणी मदतीला येण्याची वाट न पाहता महादेव गाडीतुन कसाबसा बाहेर आला आणि सोबत कलश घेऊन घाटाच्या दिशेने जाऊ लागला. आनंदचा आत्मा त्याच्या पाठोपाठ होताच. कारमधुन बाहेर पडण्याच्या कसरतीत महादेवच्या कपाळावरील स्वामी समर्थांचा अंगारा पुसून गेला होता आणि त्याचा फायदा उचलत आनंदने महादेवाला अलगद उचलले आणि लांब फेकून दिले. महादेव वेडावाकडा जमीनीवर आदळला. त्याला चांगलाच मार लागला. त्याच्या हातातील कलशही बाजुला पडला, तो घेण्यासाठी महादेव खुरडत खुरडत पुढे सरकत होता. तो कलशापर्यंत जाऊन पोहोचतो तोच त्याला आपल्यामागे कोणीतरी उभे असल्याची जाणीव झाली. त्याने कष्टाने मागे वळुन पाहिले. आनंद आपल्या हातात भलामोठा दगड उचलुन त्याच्या डोक्यात घालण्याच्या तयारीत त्याला दिसला. हातातील कलाशावरील कापड महादेवने दूर केले आणि कलश आनंदसमोर उलटा केला. त्यातुन अस्थी बाहेर न पडल्यामुळे आनंदचा आत्मा संभ्रमात पडला. ते पाहुन महादेव कुत्सितपणे हसु लागला त्यामुळे आनंदचा आत्मा आणखीनच गोंधळला.

"आत्तापर्यंत असे वाटत होते की महादेव अस्थी विसर्जित करेल आणि आनंदला मुक्ती मिळेल पण अस्थींचा कलश तर शिवलकर कुटुंबीयांकडे आहे. दुर्दैवाने महादेवचा ऍक्सिडंट झाला, त्यात अस्थी कलशात नाहीत हे पाहुन खवळलेला आनंदचा आत्मा पुढे काय करेल? आता महादेवला आनंदच्या आत्म्यापासुन एखादा चमत्कारच वाचवु शकेल. महादेव या संकटाचा बळी ठरेल की तोच आनंद सारख्या चोरावर मोर होईल? जाणुन घेण्यासाठी पुढे वाचा!

[next] महादेव त्याला म्हणाला, "तुला जेवढा त्रास द्यायचा होतास तेवढा तु देऊन झाला, आता तुझा खेळ संपलाय. तुझ्या घरच्यांना मी आधीच विश्वासात घेतले होते की तु त्यांचा आनंद नाहीस. तुला मुक्ती दिली गेली नाही तर तु उद्या त्यांनाही दगा फटका करायला कमी करणार नाहीस इतका तु उलट्या काळजाचा आहेस. काय विचार करतोयस? तुझ्या अस्थी कुठे गेल्या म्हणुन? या कलशात तुझ्या अस्थी नव्हत्याच, वामनराव त्या दुसऱ्या घाटावर विसर्जित करत आहेत. तुला मुर्ख बनवण्यासाठी तुझ्या घरात अस्थी शोधायचे मी नाटक करत होतो, तुझ्या आईनेच अस्थी असलेला कलश कपाटात मागील बाजुस आणि हा रिकामा कलश पुढे ठेवला होता. तु अस्थींसाठी माझ्या मागे यावस आणि वामनरावांना अस्थी विसर्जित करण्यासाठी वेळ मिळावा म्हणुन मी हा रिकामा कलश घेऊन पळालो कारण तु मला गाठणार याची मला जाणीव होतीच. मी वामनरावांना या सगळ्यापासुन अनभिद्न्य ठेवले कारण मला त्याच्याकडुन कोणतीही चुक व्हायला नको होती. तुझ्या आईला हे सगळे माहित होते. एव्हाना तुझा भाऊही त्यांना सामील झाला असेल." महादेवाचे बोलणे ऐकुन आनंद प्रचंड चिडला, तो महादेवच्या डोक्यात दगड घालणार इतक्यात तिथे एक दिव्य प्रकाश अवतीर्ण झाला आणि आनंद मोठ्याने किंचाळला "नाहीऽऽऽ" आनंदचा आत्मा त्या दिव्य प्रकाशात ओढला जाऊ लागला. काय घडतंय हे कळायच्या आतच आनंदचा आत्मा अनंतात विलीन झाला. दुसऱ्या घाटावर आकाशने आपल्या भावाच्या अस्थी अगदी योग्य वेळी विसर्जित केल्या होत्या. आनंदचा आत्मा पुढच्या प्रवासाला लागला आणि त्याने उचललेला दगड धाडकन महादेवच्या पुढ्यात पडला. महादेव वेळीच बाजुला झाल्यामुळे वाचला नाहीतर त्याचा कपाळमोक्षच व्हायचा. वामनराव आणि महादेवच्या प्रयत्नांनी अस्मिताची त्या दुष्टचक्रातुन कायमची सुटका झाली. पुन्हा एकदा आपल्या अक्कलहुशारीने महादेवने परिस्थितीवर मात केली होती आणि त्या जीवघेण्या संकटातुन सर्वानाच मुक्ती मिळवून दिली होती.

आकाश आणि सुमनला वामनरावांनी आपल्या ऑफिसमध्ये नोकरी दिली, आणि त्याची आर्थिक घडी व्यवस्थित लावुन दिली. ते दोघेही इमाने इतबारे त्यांच्याकडे नोकरी करू लागले. आकाशच्या वडिलांचा इलाजही त्यांनी स्वखर्चाने करवला. पुढे शिवलकर कुटुंबाला सुखाचे दिवस आले. ग्रॅज्युएशन मध्ये डिस्टिंक्शन मिळाल्यावर अस्मिताने पुढे सी.ए ची परीक्षाही चांगल्या मार्कांनी पास होऊन स्वतःची फर्म टाकली. शेवटी महादेव अस्मिताचे मन जिंकण्यात यशस्वी झालाच. योग्य वेळ आल्यावर दोन्ही कुटुंबांच्या शुभाशीर्वादाने महादेव आणि अस्मिताचे लग्न मोठ्या थाटा-माटात पार पडले. वामनरावांना त्यांच्या लाडक्या अस्मिसाठी जसा अनुरूप जावई हवा होता, महादेव अगदी तसाच होता. आपली अस्मि सुखात आहे हे पाहुन वामनराव आणि त्यांच्या पत्नीची काळजी मिटली. आपल्या लेकीचा हात आपण योग्य मुलाच्या हातात दिल्याचे समाधान वामनराव व त्यांच्या पत्नीच्या मुखावर विलसत होते.आनंद बाप बनण्यास असमर्थ असल्यामुळे अस्मिताला दिवस गेले नव्हते हे उत्तमच झाले. महादेवच्या आई वडिलांनी आपल्या मुलाच्या सुखासाठी या लग्नाला कोणताच आक्षेप घेतला नाही. पुढे आपल्या वागणुकीने अस्मिताने त्यांचे मन जिंकुन घेतल्यामुळे तेही तिला आपल्या मुलीप्रमाणे वागवु लागले. अशा रीतीने आनंद नावाचं ग्रहण आयुष्यातुन दूर झाल्यावर सगळ्यांच्याच आयुष्यात सुख आणि समाधान उदयास आले.

“आपला पाल्य कुठे जातो? त्याचे मित्र कोण आहेत? कोणाशी त्याची उठबस आहे याची माहिती प्रत्येक आई वडिलांनी ठेवणे गरजेचे आहे. मुलांवर कडक बंधने न घालता प्रेमाने योग्य अयोग्य गोष्टींची जाणीव करून दिली पाहिजे म्हणजे ते आपसुकच शिस्तीत वागतील. ठराविक वयानंतर मुलांशी मित्रत्वाचे नाते ठेवले तर ते कोणतीच गोष्ट आपल्या आई वडिलांपासुन लपवुन ठेवणार नाहीत आणि निकोप नात्यामुळे कोणत्याही वाईट प्रवृत्तीचा बळी जाणार नाहीत किंवा व्यसनाधीनतेकडेही वळणार नाहीत. अस्मिता सुदैवी ठरली जी यातुन वाचली. प्रत्येक मुल असे सुदैवी असेलच असे नाही त्यामुळे सतर्क राहा! सुरक्षित राहा! आपल्या सावधानतेतच आपल्या कुटुंबाची सुरक्षा आहे.”

सप्तपदी




केदार कुबडे | Kedar Kubade
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कथा, मराठी भयकथा, मराठी कविता या आणि अशा विविध विभागांत लेखन.

अभिप्राय

अभिप्राय
नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,2,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1347,अभिषेक कातकडे,4,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,3,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1087,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,14,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,25,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,220,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,13,करण विधाते,1,करमणूक,71,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,279,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,19,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,13,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,75,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,69,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,11,निवडक,7,निसर्ग कविता,33,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,36,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,3,पुडिंग,10,पुणे,13,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,10,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,8,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,8,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,18,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1130,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,27,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,18,मराठी टिव्ही,52,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,19,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,47,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,286,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,147,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,304,महाराष्ट्र फोटो,10,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,7,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,24,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,55,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,7,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,112,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,20,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,2,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,1,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: सप्तपदी भाग २ - मराठी भयकथा
सप्तपदी भाग २ - मराठी भयकथा
सप्तपदी भाग २, मराठी भयकथा - [Saptapadi Part 2, Marathi Bhaykatha] आनंद अस्मिताला वशीकरणाद्वारे आपल्या जाळ्यात ओढतो आणि...
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgsEbPqBew6ExUMkTn1FAjggfNpPqD46t9qZqxDSaB97J_foP4mG0j_dC7-u5qpvZeykhtq2ofrVCXP9KNM-BCtJGHCj-XkrGBGuILk4iCngI_Tp0rLBRivjhlroQrN5pXa9IGwXStyn4FY/s1600/saptapadi-part-2-710x360.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgsEbPqBew6ExUMkTn1FAjggfNpPqD46t9qZqxDSaB97J_foP4mG0j_dC7-u5qpvZeykhtq2ofrVCXP9KNM-BCtJGHCj-XkrGBGuILk4iCngI_Tp0rLBRivjhlroQrN5pXa9IGwXStyn4FY/s72-c/saptapadi-part-2-710x360.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2016/08/saptapadi-marathi-bhaykatha-part-2.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2016/08/saptapadi-marathi-bhaykatha-part-2.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची