साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरिता शिवरायांनी जे किल्ले घेतले त्यापैकीच एक महिमानगड
महिमानगड किल्ला - [Mahimangad Fort] ३००० फूट उंचीचा महिमानगड किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा - फलटण डोंगररांगेतील महिमानगड किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो. किल्ला मान तालुक्यात दहिवडी नावाच्या खेड्याच्या पश्चिमेला ५.५० मैलांवर शिद्रिबुद्रुक खेड्यात येतो. सातारा जिल्ह्यातील माण तालुका हा कमी पावसाचा त्यामुळे दुर्भिक्ष याच्या पाचवीला पुजलेलं.महिमानगड किल्ल्याचा इतिहास
साताराच्या पूर्वेकडील प्रांताचे संरक्षण करण्याकरिता शिवरायांनी जे किल्ले घेतले त्यापैकीच एक महिमानगड. पूर्वी किल्ल्याच्या रक्षणाकरिता महार रामोशी मिळून ७५ इसम ठेवलेले होते. किल्ल्याचा हवालदार आणि सबनीस यांची इनामे अद्यापही वंशज पाटील व कुळकर्णी यांच्याकडे चालू आहे.
महिमानगड किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे
गडाच्या प्रवेशद्वाराच्या चौकटीतच हत्तीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. प्रवेशवद्वारातून आत शिरल्यावर समोरच हनुमानाचे बिनछप्पराचे देऊळ दिसते. त्याच्या समोरच बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या पायऱ्या दिसतात. येथून थोडे पुढे गेल्यावर समोरच पाण्याचे सुंदर तलाव आहे. तलाव बऱ्यापैकी खोल आहे. या तलावाला बारमाही पाणी असते. त्याच्याच बाजूला वाड्यांचे भग्नावशेष दिसतात.
येथून संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते. गडाच्या ईशान्येस गडाची एक सोंड लांबवर गेलेली दिसते. या सोंडेला पकडून एक डोंगररांग पुढे गेलेली आहे. या सोंडेवर थोडेफार वाड्याचे अवशेष दिसतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजूला असणारी तटबंदी चांगल्या स्थितीत शाबूत आहे. गड फिरण्यास साधारण अर्धातास पुरतो. किल्ल्यावरून वर्धनगड, ईशान्येकडे असणारा मोळ घाट असा सर्व परिसर दिसतो.
महिमानगड गडावर जाण्याच्या वाटा
महिमानगड गाव मार्गे: किल्ल्यावर जाण्याचा मार्ग हा सातारा - पंढरपूर मार्गावर पुसेगावच्या पुढे १२ कि. मी. अंतरावर असणाऱ्या महिमानगड फाट्यावरून पुढे जातो. दहिवडी कडून साताऱ्याकडे येणाऱ्या रस्त्यावरून सुद्धा महिमानगड फाट्यावर उतरता येते. महिमानगड फाट्यावरून महिमानगड गावात जाण्यास वीस मिनिटे लागतात. फलटण-दहिवडी मार्गे सातारा गाडी किंवा सातारा पुसेगाव मार्गे पंढरपूर जाणारी गाडी देखील महिमानगड फाट्यापाशी थांबते.
महिमानगड गावातूनच किल्ल्यावर एक पायवाट जाते. या वाटेने गड गाठण्यास २५ मिनिटे पुरतात. गडावर चढतांना त्याच्या अभेद्यपणा प्रत्येक क्षणोक्षणी जाणवत असतो. गावाच्या जिल्हा परिषदेच्या कार्यालया समोरूनच एक वाटा गडावर जाते. वाट थेट प्रवेशद्वारातच घेऊन जाते. प्रवेशद्वाराचे बुरूज आजही चांगल्या अवस्थेत आहेत.
राहण्याची सोय किल्ल्यावर नाही. किल्ल्यावर जेवणाची सोय आपणच करावी. किल्ल्यावर जाण्यासाठी महिमानगड गावातून अर्धातास लागतो. येथे सर्व ऋतुत जाता येते.