शुक्रवारची कहाणी, श्रावणातल्या कहाण्या - [Shukravarchi Kahani, Shravanatalya Kahanya] श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक कहाणी - शुक्रवारची कहाणी.
श्रावणात वाचल्या जाणाऱ्या श्रावणातल्या कहाण्यांपैकी एक - शुक्रवारची कहाणी
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण रहात असे. तो दारिद्र्यानं फार पिडला होता. त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली. आपल्या गरिबीचं गाणं गाईलं. शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, “बाई बाई, शुक्रवारचं व्रत कर. हे शुक्रवार तू श्रावणापासून धर. सारा दिवस उपास करावा, संध्याकाळी सवाष्णीला बोलवावं. तिचे पाय धुवावे. तिला हळदकुकूं द्यावं. तिची ओटी भरावी. साखर घालून दूध प्यायला द्यावं. भाजलेल्या हरभऱ्यांची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावं. याप्रमाणं वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं.” असं सांगितलं. ती घरी आली. देवीची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली.त्याच गावात तिचा भाऊ रहात असे. तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला. साऱ्या गावाला आमंत्रण केलं पण बहिणीला काही बोलावलं नाही. ती गरीब, तिला बोलावलं तर लोक हसतील. पुढं दुसरे दिवशी भावाकडे ब्राह्मणाचे मारे थवेच्या थवे येत आहेत. पोटभर जेवीत आहेत. बहिणीनं विचार केला, आपला भाऊ सहस्त्रभोजन घालतो आहे. बोलावणं करायला विसरला असेल. तर आपल्याला भावाच्या घरी जायला काही हरकत नाही. असा मनात विचार केला. सोवळे नेसली, बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पानं मांडली होती. एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानावर मुलांना बसवलं. सर्व पानं भरली. सारं वाढणं झालं. तेव्हां तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हाक मारली, “ताई ताई, तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दाग नाही, दागिना नाही, तुझ्याकडे पाहून सगळे लोक मला हसतात, ह्यामुळं मी तुला काही बोलावलं नाही. आज तू जेवायला आलीस ती आलीस. आता उद्या काही येऊ नको.” असं सांगून पुढं गेला. ही आपली तशीच जेवली, हिरमुसलेलं तोंड केलं. मुलांना घेऊन घरी आली.
दुसरे दिवशी मुलं म्हणू लागलीं, “आई आई, मामाकडं जेवायला चल.” बहिणीनं विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झालं? आपली गरीबी आहे. तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे. आजचा दिवस आपला बाहेर पडाला, तितकाच फायदा झाला, असं म्हणून त्याही दिवशी भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावानं तिला हाक मारली, “ताई ताई, भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाही. तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं, आज आपली डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस. तुला लाज कशी नाही वाटली? आज आलीस तर आलीस. उद्या आलीस तर तुला हात धरून घालवून देईन.” तिने ते मुकाट्यानं ऐकून घेतलं. जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली. भावानं पाहिलं, हात धरून घालवून दिलं. फार दुःखी झाली, देवीची प्रार्थना केली. सारा दिवस उपास पडला. देवीला तिची दया आली. दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली.
[next] असं करता करता वर्ष झालं. बाईचं दळिद्र गेले. पुढं एक दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली. भावाला जेवायला बोलावलं. भाऊ मनात ओशाळा झाला. बहिणीला म्हणू लागला, “ताई ताई, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये. नाही काही म्हणू नको. घरी काही जेवू नको. उद्या तू आलीस नाही तर मी काही तुझ्या घरी येणार नाही.” बहिणीनं बरं म्हटलं. भावाच्या मनातलं कारण जाणलं. दुसऱ्या दिवशी लवकर उठली, वेणीफणी केली. दागदागिने ल्याली, उंची पैठणी नेसली, शालजोडी घेतली आणि भावाकडे जेवायला गेली. भाऊ वाट पहातच होता. ताई आली तसा तिचा हात धरला, पाटावर बसवली, पाय धुवायला ऊन पाणी दिलं. पाय पुसायला फडकं दिलं. इतक्यात जेवायची पानं वाढली. ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं. भाऊ जेवायला बसला. ताईनं आपली शालजोडी काढून बसल्यापाटी ठेवली. भाऊ पाहू लागला. मनात कल्पना केली, शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्यापाटी ठेवू लागली. भावानं विचार केला, जड झाले, म्हणून काढीत असेल, नंतर ताईनं भात कालवला, मोठासा घास केला, तो उचलून सरीवर ठेवला, भाजी उचलून ठुशीवर ठेवली. लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्यांच्या पेंद्यावर ठेवली. भावानं विचारलं, “ताई ताई, हे काय करतेस?” ती म्हणाली, “दादा, मी करते हेच बरोबर आहे. जिला तू जेवायला बोलावलंस तिला भरवते आहे.” भाऊ काही हे समजेना. त्यानं तिला पुन्हा सांगितलं, “अग ताई, तू आता जेव तरी.” तिनं सांगितलं, “बाबा, हे माझे जेवण नाही, हे या लक्ष्मीचं जेवण आहे. माझं जेवण होतं ते मी सहस्त्रभोजनाच्या दिवशी जेवले.” इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला. तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले. झाल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीनं क्षमा केली. नंतर दोघंजणं जेवली. मनातली अढी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला.
देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं, तसं तुम्हा आम्हा करो, ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
अभिप्राय