शुक्रवारची जिवतीची कहाणी (Jivatichi Kahani): श्रावणी व्रतकथेचे शुद्ध रूप, अर्थ, प्रतीकात्मकता आणि सखोल संपादकीय विश्लेषण.
श्रावण महिन्यातील जिवती पूजनाची महात्म्यकथा सांगणारी, मातृवात्सल्याचा महिमा आणि दैवी रक्षणाचा प्रत्यय देणारी ही एक सुप्रसिद्ध पारंपरिक श्रावणी लोककथा आहे…
शुक्रवारची जिवतीची कहाणी
मराठी लोकसंस्कृतीत श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व लाभले आहे. श्रावणी शुक्रवारी केली जाणारी ‘जिवतीची पूजा’ ही मुख्यत्वे अपत्यरक्षणासाठी आणि बालकांच्या उदंड आयुष्यासाठी केली जाते. ‘शुक्रवारची जिवतीची कहाणी’ ही केवळ एक धार्मिक कथा नसून, ती आईचे निस्सीम प्रेम, निष्पाप बालकांवरील दैवी छत्र आणि कपट-कारस्थानांवर निसर्गाने व ईश्वराने मिळवलेला विजय याचे दर्शन घडवणारी भावपूर्ण लोककथा आहे.
राणीचे कपट, सुईणीची प्रतारणा आणि ब्राह्मणीच्या नशिबी आलेला वरवंटा या नाट्यात्मक वळणांवरून प्रवास करणारी ही कथा आईच्या वात्सल्याची आणि जिवती मातेच्या रक्षणाची ताकद अधोरेखित करते. लोककथेचा मूळ ओघ, तिचा पारंपरिक बाज आणि प्रादेशिक बोलीची लय कायम ठेवून केलेले हे संपादकीय संस्करण कहाणीचे साहित्यिक सौंदर्य अधिक स्पष्ट करते.
ऐका शुक्रवारा, तुमची कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीने काय केले? एका सुईणीला बोलावून आणले. “अगं अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन.” सुईणीने गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ही सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली, “बाई बाई, तू गरीब आहेस. तुझे बाळंतपणाचे पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव, मी तुझे बाळंतपण फुकट करीन.” तिने होय म्हणून सांगितले. नंतर ती सुईण राणीकडे आली आणि म्हणाली, “बाईसाहेब बाईसाहेब, आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे.
तिला नुकताच दुसरा महिना लागला आहे. लक्षणे सर्व मुलाचीच दिसताहेत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणाला काही कळणार नाही असे एक गुप्त भुयार तयार करावे. आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन.” असे ऐकल्यावर राणीला मोठा आनंद झाला. जसजसे दिवस होत गेले, त्याप्रमाणे तिने डोहाळ्यांचे ढोंग केले. पोट मोठे दिसण्यासाठी त्यावर लुगड्यांच्या घड्या बांधल्या आणि भुयार तयार केले. नऊ मास भरताच बाळंतपणाची तयारी केली.
इकडे ब्राह्मणबाईचे पोट दुखू लागले. सुईणीला बोलावणे आले, त्याबरोबर “तुम्ही पुढे व्हा, मी येते,” असे तिने सांगितले. ती धावत धावत राणीकडे आली आणि पोट दुखण्याचे ढोंग करायला सांगितले. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. “बाई बाई, तुझी पहिलीच खेप आहे. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल,” असे सांगून तिने तिचे डोळे बांधले. ती बाळंतीण झाली, मुलगा झाला. सुईणीने एका दासीकडून भुयाराच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला व तिने एक वरवंटा घेऊन त्याला कुंचा बांधला आणि तिच्यापुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. “तुला वरवंटाच झाला,” असे ती सांगू लागली. तिने नशिबाला बोट लावले आणि मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली आणि मुलाचे कोडकौतुक होऊ लागले.
इकडे ब्राह्मणबाईने नियम धरला. श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावे, “जय जिवतीआई माते! जिथे माझे बाळ असेल, तिथे खुशाल असो.” असे म्हणून तिने तांदूळ उडवावेत; ते या मुलाच्या डोक्यावर पडावेत. हिरवे लुगडे नेसणे, हिरव्या बांगड्या लेणे तिने वर्ज्य केले. कारल्याच्या मांडवाखालून जाणे वर्ज्य केले आणि तांदुळाचे धुण ओलांडणे बंद केले. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली.
इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी तो बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ही न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखत बसली होती. तेव्हा त्याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची असा त्याने निश्चय केला. रात्री तो तिच्या घरी आला. दारात गाय-वासरू बांधले होते. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणाले, “कोण्या पाप्याने माझ्या शेपटीवर पाय दिला?” तेव्हा ती म्हणाली, “जो आपल्या आईकडे जाण्यास भिात नाही, तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भिईल काय?” हे ऐकून राजा मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईकडून काशीस जाण्याची परवानगी घेतली. तो काशीस जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाकडे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुले होत होती; पण ती पाचव्या-सहाव्या दिवशी जात असत. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला; तो पाचवीचा दिवस होता.
राजा दारात निजला होता. सटवी रात्री आली आणि म्हणू लागली, “कोण ग मेलं वाटेत पसरले आहे?” जिवती उत्तर करते, “अगं अगं, माझे ते नवसाचे बाळ निजले आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही.” मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आई-बाप चिंता करत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तररात्र झाल्यावर सटवी आणि जिवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले, “तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला, आजचा दिवस मुक्काम करा,” अशी विनंती केली. राजाने ती मान्य केली. त्याही रात्री याचप्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला.
इकडे हा मुलगा वाढता झाला. पुढे काशीत गेल्यावर त्याने यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला दोन हात वर आले. असे होण्याचे कारण त्याने ब्राह्मणांना विचारले. ते म्हणाले, “घरी जा. साऱ्या गावातल्या बायका-पुरुषांना जेवायला बोलाव, म्हणजे याचे कारण समजेल.” मनाला मोठी चुटपुट लागली; तो घरी आला. मोठ्या थाटाने आमंत्रण दिले. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, “घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावे.” ब्राह्मणीवर मोठे संकट पडले. तिने राजाला निरोप धाडला, “मला जिवतीचे व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत, ते पाळाल तर जेवायला येईन.” राजाने ते कबूल केले. जिथे तांदुळाचे धुण होते ते काढून तिथे सारवून त्यावरून ती आली. तिने हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून ती गेली नाही. दरवेळेस “जिथे माझे बाळ असेल तिथे खुशाल असो,” असे ती म्हणे.
पुढे पाने वाढली, मोठा थाट जमला. राजाने तूप वाढायला घेतले. वाढता वाढता तो ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला; बाईला प्रेम सुटून पान्हा फुटला. तिच्या स्तनांतून दुधाच्या धारा फुटल्या आणि त्या याच्या तोंडात उडाल्या. तो हातची तपेली ठेवून रुसून निजला, काही केल्या उठेना. तेव्हा त्याची आई गेली आणि त्याची समजूत काढू लागली. तो म्हणाला, “असे होण्याचे कारण काय?” तिने सांगितले, “ती तुझी खरी आई, मी तुझी मानलेली आई,” असे सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे त्याने आपल्या आई-बापांना राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून दिला आणि त्यांच्याबरोबर तो राज्य करू लागला.
तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हा-आम्हा सर्वांना होवो. ही साठां उत्तराची शुक्रवारची जिवतीची कहाणी, पाचां उत्तरी सुफळ संपूर्ण.























अभिप्राय