काळदुर्ग किल्ला हे एक टेहेळणीचे स्थान असावे असे वाटते
काळदुर्ग किल्ला - [Kaldurg Fort] १५०० फुट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील पालघर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. ठाणे जिल्ह्यातील पालघर विभागात अनेक डोंगरी किल्ले आहे. शहरी भागापासुन फारसे लांब नसल्यामुळे मुंबईकरांना एका दिवसात आरामात पाहता येतात. हे सर्व किल्ले ठाणे आणि जव्हारच्या सीमेवर आहेत. जंगल खूप असल्याने येथे आदिवासी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सर्व परिसर आजही मागसलेल्या अवस्थेत आहे.काळदुर्ग किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे
खरे पाहिले तर काळदुर्गला गड म्हणणे योग्य नाही. गड असल्याची कोणतीही खूण यावर नाही. हे एक टेहेळणीचे स्थान असावे असे वाटते. गडमाथा म्हणजे चौकोनी आकाराचा कातळकडाच होय. या कातळामुळे हा गड लांबूनही नजरेत येतो. गडाचे क्षेत्रफळ साधारण अर्धा एकर असावे. गडमाथ्याच्या खालच्या पठारावर पाण्याचे मोठे टाके आहे. एक कुंडदेखील आढळते. (किल्लादोन स्तरांत विभागला आहे.) (एक गडमाथा आणि खालचे पठार) पठारावरून गडमाथ्यावर जाण्यास २ ते ३ पायऱ्या आहेत. पठारावर पाण्याचे एक टाके आहे. किल्ल्यावरून संपूर्ण घाटमाथ्यावर नजर ठेवता येते.
काळदुर्ग गडावर जाण्याच्या वाटा
वाघोबा खिंड मार्गे: मुंबईहून विरारमार्गे पालघर गाठावे. अथवा कल्याणहून एस.टीने पालघरहून मनोरेला जाणारी बस पकडावी. ‘वाघोबा’ नावाच्या देवळाच्या थांब्यावर उतरावे. येथूनच गडावर जाण्याची वाट फुटते. या देवळाच्या उजवीकडे जाणाऱ्या वाटेने आपण गडावर पोहोचू शकतो. ‘हातपंप’ ही खूण लक्षात ठेवणे. हातपंपाच्या समोरून वर जाणारी वाट पकडावी. ही वाट पुढे तीन भागात विभागली जाते. डाव्या व उजव्या बाजूची वाट सोडून द्यावी. सरळ वर जाणाऱ्या वाटेने काळदुर्ग गाठता येते.
गडावर राहण्याची सोय नाही. जेवणाची सोय आपण स्वतःच करावी लागते. बारमाही पाण्याची सोय आहे. गडावर जाण्यासाठी वाघोबा खिंडीतून दोन तास लागतात. गडावर सर्व ऋतुत जाता येते.