घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ‘जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता
जीवधन किल्ला - (Jivdhan Fort) ३७५४ उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील जीवधन किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने कठीण समजला जातो. घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला ‘जीवधन’ किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. जीवधन किल्ला नाणेघाटापासून अगदी सादेच्या अंतरावर आहे.
जीवधन किल्ल्याचा इतिहास
शिवजन्माच्या वेळी निजामशाही अस्ताला जात होती. पण याची साक्ष देणारा एकमेव किल्ला म्हणजे जीवधन होय. १७ जून १६३६ रोजी निजामशाही बुडाली. शहाजीराजांनी निजामशाहीचा शेवटचा वंशज ‘मूर्तिजा निजाम’ याला जीवधन या गडावर कैदेत असताना त्याला सोडवून संगनेरजवळ असणाऱ्या पेमगिरी किल्ल्यावर घेऊन गेले. त्याला निजामशहा म्हणून घोषित केले आणि स्वतः वजीर बनले. घाटघर हे जीवधनच्या पायथ्याचे गाव. येथील जमिनीचे वैशिष्ट्य म्हणजे बांबूची बने. सारे जंगले हे बांबूच्या बनांचे आहे. गोरक्षगडाप्रमाणे या गडांचा दरवाजादेखील कातळकड्यामध्ये कोरलेला आहे.
जीवधन किल्ल्यावर पहाण्यासारखी ठिकाणे
पश्चिम दरवाज्याने वर गडावर पोहोचल्यावर समोरच गजलक्ष्मीचं शिल्प आहे. गावकरी याला ‘कोठी’ असे संबोधितात. जवळच पाण्याची टाके आहेत. दक्षिणेस जीवाईदेवीचे पडझड झालेले मंदिर आहे. तसेच गडावर अंतर्भागात एकात एक अशी पाच धान्यकोठारं आहेत. आत कमलपुष्पे कोरलेली आहेत. शेवटच्या इंग्रज-मराठे युद्धात १८१८ मध्ये या कोठारांना आग लागली होती. ती राख आजही या कोठड्यांमध्ये आढळते. गडाच्या एका टोकाला गेल्यावर समोरच दोन हजार फूटांचा वांदरलिंगी सुळका लक्ष वेधून घेतो. गडाचा आकार आयताकृती आहे. वांदरलिंगीच्या कड्यापासून कोकणचे निसर्गरम्य दर्शन होते. समोरच नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड, कुकडेश्वराचे मंदिर, धसईचे छोटेसे धरण, माळशेज घाटातील काळे तुकतुकीत रस्ते न्याहाळता येतात. अशाप्रकारे हा जीवधन किल्ला चार ते पाच तासांत पाहून होतो.
जीवधन गडावर जाण्याच्या वाटा
कल्याण-नगर मार्गात नाणेघाट चढून गेल्यावर पठार लागते. या पठारावरून उजवीकडे जंगलात एक वाट जाते. या वाटेने दोन ओढे लागतात. हे ओढे पार केल्यावर एक कातळभिंत लागते. या भिंतीला चिकटून उजवीकडे जाणारी वाट वांदरलिंगी सुळक्यापाशी घेऊन जाते. तर डावीकडे जाणारी वाट एका किंडीपाशी पोहोचते. जीव मुठीत धरून त्या उभ्या कातळभिंती पार केल्यावर पुन्हा कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. सन १८१८ नंतर सुरुंग लावून इंग्रजांनी हा मारग चिणून काढला व पश्चिम दरवाज्याची वाट बुजवून टाकली. या दरवाज्याने वर जाण्यास अनेक वानरयुक्त्या योजाव्या लागतात. वाट जरा अवघडच असल्याने जपूनच जावे.
गडावर जाणारी दुसरी वाट जुन्नर-घाटघर मार्गे राजदरवाज्याची आहे. ही वाट घाटघरहून सरळ गडावर जाते. वाट अत्यंत सोपी आहे.
गडावर रहाण्याची सोय नाही. येथे जेवणाची सोय आपण स्वतःच करावी. गडावर बारमाही पाण्याची टाकी आहेत त्यामुळे पाण्याचा काही प्रश्न नाही. गडावर जाण्यासाठी २ तास लागतात.