मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा १६ जून २०१०
Me Maharashtracha Maharashtra Maza 16 June 2010 edition
संपादकीय
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा
शिरीष पारकर
maharashtramaza[AT]hotmail.com
कसाबला एक न्याय मग अजुर्नसिंग व अँडरसन मोकळे कसे?
तब्बल २५ वर्षांनी भोपाळ गॅस पीडितांच्या खटल्याचा निकाल हाती आला आहे. १९८४ चा उत्तरार्ध आठवला तर आठवते ते म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी इंदिराजींची शीख मारेकर्यांनी निर्घृण हत्या केली. अवघा भारत देश दुःखात बुडाला होता. काँग्रेसपुरस्कृत शीख हत्याकांडाने दिल्लीच्या रस्त्यांवरून रक्ताचे ओघळ वहात होते. हे रक्त सुकते न सुकते तोच डिसेंबरच्या तिसर्या आठवडयात भारताच्या औ'द्यगिक इतिहासातील ही सर्वात भीषण दुर्घटना घडली. सुमारे १५,००० वर माणसे मृत्युमुखी पडली. लाखो लोक या युनियन कार्बाइडच्या वायुगळतीचे आयुष्यभराचे शिकार झाले. अनेकांच्या पुढच्या पिढया प्रभावित, विकृत झाल्या. पण आलेला निकाल मात्र या पीडितांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. पाकिस्तानी कसाबला एक न्याय आणि फिरंगी अँडरसनला दुसरा न्याय हे कसे काय? त्यातच या अँडरसनला भारतातून पलायन करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी मदत केल्याच्या बोंबाही न्यूज चॅनेलवाले व्ही. पी. सिंग यांच्या पुस्तकाचा हवाला देत मारत आहेत. ते जर खरे असेल तर आईच्या हत्येची जखम ताजी भळभळती असताना सुपुत्र राजीव गांधी इतके असंवेदनशील कसे वागू शकले? एवढे प्रेम फिरंग्याशी? विकसित देशातले सगळे रासायनिक कारखाने तिथून बंद करून भारतात आणले जात आहेत. ठाणे-बेलापूर पट्टयासारखे अने खूनी पट्टे भारतभर पसरले आहेत. आपल्या राजकारण्याचं गारुड इतकं भारी की सर्वसामान्य माणूस त्याकडे नोकरीच्या संधी म्हणून बघतोय. भारताचा वापर विकसित देश डम्पिंग ग्राऊंड म्हणून करताहेत हे कुणाच्या लक्षात येतच नाही. १५,००० मेले, लाखोंची आयुष्ये उद्ध्वस्त झाली पण एक फिरंगी आपण वाचवला या समाधानात सरकार असेलही पण ज्यांना आपल्या पुढच्या पिढया वेडयावाकडया, विकृत होताना दिसत आहेत, ज्यांनी २६ वर्षे या निकालाकडे डोळे लावून काढली, त्यांच्या प्रश्नांना उत्तर 'द्यायला कोण बांधील आहे? युनियन कार्बाईडविरुद्धचा खटला भारतात न चालवण्यामागेही षडयंत्र होते. हा खटला जर आंतरराष्ठ्रीय न्यायालयात अथवा अमेरिकेत चालवला असता तर भारतातल्या निकालामुळे मिळालेल्या १५०० कोटी रुपये नुकसान भरपाईऐवजी किमान १० पट रक्कम मिळाली असती. म्हणजे तेलही गेले तूपही गेले आणि हाती धुपाटणे आले.
दिल्लीचा ठग की बारामतीचा महाठग?
आय.पी.एल.चे भूत काही शरद पवारांचा पिच्छा सोडायला तयार नाही. भूखंडांचे श्रीखंड (१९८६), गुंडाबरोबरचा विमान प्रवास (१९९३), गोवारींचे हत्याकांड (१९९४) या व अशा अनेक बदनामीकारक प्रसंगांना तोंड देता देता या सह्याधीचा हिमालय सोडाच पर्वतीचे टेकाड होताना महाराष्ठ्राने पाहिले. राजकीय गुरु, यशवंतरावांनी समाजवादाचा पाळणा महाराष्ठ्रात हलवला, त्यांच्या या शिष्याने तर भांडवलशाहीचे साम्राज्य उभे केले. बेरकीपणा, बिलंदरपणा, धूर्तपणा या गुणांची जागा बनेलपणा व बदमाशीने कधी घेतली हे कळलेच नाही. आत्ता पण काळ आला होता व वेळ कधी येईल हे सांगता येत नाही. आयुष्याच्या उतारवयात पुण्य पाठीशी जोडावे हे आपला धर्म सांगतो. शरद पवार हे धर्म मानत नसल्यामुळे त्यांच्यावर तेही बंधन नाही. ३५० वर्षापूर्वी पन्हाळ्याच्या वेढयात बाजीप्रभु देशपांडेंनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून महाराजांचे प्राण वाचवले आणि आत्ता तर पुण्यातीलच अनिरुद्ध देशपांडेंनी आय.पी.एल.च्या वेढयात शरद पवारांना राजकीय जीवदान दिले आह़े तरी ही मराठी माणूस शरद पवारांना विचारत आहे की, 'कोण होतास तू? काय झालास तू?
गिरे तो भी टांग ऊपर
नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणेच शिवसेनेचा दुसरा उमेदवार पडला. तीन म्हणी आठवल्या, १) बेडकी कितीही फुगली तरी तिचा बैल होऊ शकत नाही. २) नाचता येईना अंगण वाकडे. ३) मोर नाचला म्हणून लांडोरही नाचली. तात्पर्य, यावेळी पुरेशी आमदार संख्या नसल्यामुळे अनिल परब पडणे क्रमप्राप्त होते. (शिवसेना आमदारांना भगवे टिळे लावले असते तर एकवेळ अनिल परब जिंकले असते.) पण मनसे हा पक्ष स्वतःच्या मालकीचा असल्यासारखे शिवसेनेने सामनामध्ये जे एकेक तारे तोडले आहेत त्यामुळे लोक मूर्ख आहेत असा यांचा समज झाला असावा. राज ठाकरेंनी अत्यंत स्पष्ठ शब्दात १९९३ पासूनची विधानपरिषद व राज्यसभेसाठीची तोडबाजी पत्रपरिषदेत उघड केली आहे. त्याचे उत्तर शिवसेना काय देणार? अंबरनाथ व बदलापूरला केलेली मदत शिवसेना विसरली असेल पण एक म्हण आहे की 'दान सत्पात्री असावे लागते', ती कुवत शिवसेनेने गमावली आहे. मराठीच्या अंतिम हितासाठी घेतलेल्या थेट भूमिकेकरिता व वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे अभिनंदन व अभिष्ठचिंतन!
जय महाराष्ट्र !!!













