जशी स्थिती तुझी, तशीच माझी
एक तरुण बागेत काम करीत होता. सुर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहिसे पाहून त्याची आई घरातून ओरडली, 'अरे गोविंदा ! ऊनं कोण रणरणतं आहे ! घरात ये ना ? वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर.'
दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असं पाहून त्या बाईने आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला-म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं.
आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर भडकून म्हणाला, 'आई ! अगं ऊन कोण तापलयं ! आणि चंदूला तू इथे उन्हात आणून ठेवलसं ? त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार?'
त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली, 'ऊन लागलं तर लागलं; त्यात विशेष काय आहे?'
तो तरुण म्हणाला, 'आई ! तो माझा मुलगा आहे. त्याल ऊन लागतयं म्हणून नुसता त्यालाचा त्रास होत नाही, तर त्याला होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जिवाची तगमग होऊ लागली आहे.'
यावर आई म्हणाली, 'मग गोविंदा, तू अस विचार कर की, तुझ्या या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जिवाची तगमग सुरु झाली, तशीच तगमग तू मघापासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जिवाची तगमग होत नसेल का ?'
वृध्द व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तीवाद ऎकून गोविंदा निमूटप्ने कुदळ, कोयती उचलून, बागेतून हसत हसत घरात गेला.
|