चतुर सुना
जपानमधील एका गावात राहणाऱ्या फ़ांग फ़ू नावाच्या शेतकऱ्याला दोन मुलगे होते. दोघांचीही लग्न झाली होती. एकदा त्याच्या दोन्ही सुना माहेरी जायला निघाल्या असता, त्यांनी त्याला विचारलं, 'मामंजे ! आम्ही तुमच्यासाठी काय आणू?'तो शेतकरी मोठया सुनेला म्हणाला, ' तु कागदातून अग्नी आण.' तिन होकार देताच. तो धाकट्या सुनेकडे वळून म्हणाला, ' तु कागदातून वारा आण.' धाकटया सुनेनंही त्याप्रमाणे करण्याचे त्याला आश्वासन दिले.
त्या दोन्ही सुना माहेरी गेल्या. पंधराएक माहेरी राहून त्या घरी आल्यावर शेतकऱ्यांन मोठया सुनेला विचारलं, 'चिंगची ! आणलास का तू कागदातून अग्नी ?'
यावर ती सून आतल्या खोलीत गेली, आणि थोड्याच वेळात, आतून पणती लावलेला कागदाचा कंदील घेऊन बाहेर आली. मोठया सुनेनं मोठया युक्तीनं आश्वासन पुर्ण केल्याचा त्याला आनंद झाला.
त्यानंतर त्या शेतकऱ्यानं धाकटया सुनेला विचारलं, 'मिंगजी ! कागदातून वारा आणलास का?'
कोनाडयात ठेवलेला कागदाचा पंखा बाहेर काढून व तो सासऱ्याच्या हाती देऊन ती, त्याला म्हणाली, मांमजी ! हा पंखा हाती घेऊन हलवीत रहा. मी त्याच्याबरोबर वाराही आणला आहे या गोष्टीची तुम्हाला प्रचीती येइल.'
दिलेलं आश्वासन धाकटया सुनेनही अशा तऱ्हेनं पूर्ण केल्याचे पाहून तो शेतकरी अंतरी संतुष्ट झाला आणि आपल्या दोन्ही सुना चतुर असल्याचा त्याला अभिमान वाटला.
|