marathi calendar marathi dinadarshika

चला मित्रांना बोलावुया महाराष्ट्राच्या विलोभनीय सफरीवर..

Travel Maharashtra State - Join MarathiMati.com

HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER   

Marathi eMail - Send eMail in Marathi Language Marathi Greetings - Send Marathi Greeting Card For Free AksharMancha - Open Stage For Marathi Poet Writer Artist Bhagyavedh - Astrology in Marathi Marathi Websites & Useful Links, Directory of Marathi Websites Maharashtra Art - Art (Kala) of Maharashtra State MarathiMatitale Kohinoor - the Legends of Maharashtra State
Marathi Lekh - Marathi Articles Marathi Dinadarshika Marathi Calendar Maharashtra State Resource - Travel, Culture, Art, Letrature and more... Shatayushi - 100 Years of Fitness Marathi Tarun - Maharashtra Youth Guide Marathi Sahitya - Marathi Language Literature Aapali Marathi - All about Marathi Language
Samwad - World of Words Maharashtra, Marathi Related News & Events in Marathi Language Mazha Balmitra - Special Section for Marathi Kids Karamnuk - Entertainment Section for Marathi Film Marathi Drama Marathi Jokes Marathi Vinod Maharashtra Travels - Maharashtra State Travel Information Marathi Culture - Maharashtra State Culture Information Marathiche Mandand - Legends of Marathi Language
MarathiMati - Home

मराठीमाती डॉट कॉम / महाराष्ट्र राज्य संदर्भ कोष

BACK | MAHARASHTRA HOME

Maharashtra State Information about Travel, Literature, Culture, Art, Sports

Print this page Print this Information | Send to your friends Send to Friends

 

पाषाणगुहातील देवळेप्राचीन बांधकामेमध्ययुगीन स्मारक

पाषाणगुहातील देवळे - कार्ल खंडाळावाला

महाराष्ट्रातील पाषाणगुहातील देवळे आणि भिक्षुनिवास हे भारतीय वास्तुशास्त्र आणि शिल्पकला यांचे काही सर्वोत्कृष्ट नमुने आहेत. इतक्या मोठ्या संख्येने ते भारताच्या अन्य कोणत्याही भागात आढळत नाहीत. लहान-मोठी, पुरी-अपुरी अशी पाषाणातून कोरलेली हजाराहून अधिक स्थाने महाराष्ट्रात आहेत. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकापासून तो ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापर्यन्तच्या काळात खोदलेल्या या बौद्ध ,ब्राह्मणी आणि जैन देवळांतून अनेक उत्कृष्ट शिल्पे क्वचित चित्रेसुद्धा आढळतात. अजिंठ्याची जगप्रसिद्ध भित्तिचित्रे ख्रिस्तोत्तर पाचव्या शतकाच्या अखेरच्या दशकांमध्ये आणि सहाव्या शतकाच्या प्रथमार्धात रंगवेली आहेत.
प्राचीन परंपरा
बिहार राज्यातील, गयेजवळच्या बारावर टेकड्यात भारतातील अगदी आरंभीच्या काळातील पाषाणगुहा निवास आहेत. या टेकड्या सम्राट अशोकाने आजीविक साधक आंना देणगी म्हणून दिल्या होत्या. गुहांतील भिंतीचा पृष्ठभाग घासून आरशासारखा गुळगुळीत-चकचकीत केलेला आहे. मौर्य वास्तुकला आणि शिल्पकला यांचे हे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. त्याचे मूळ नाते इ, स, ३३० मधील पर्शियन साम्राज्याच्या विघटनानंतरच्या आणि कुशल पर्शियन आणि पर्शियन-ग्रीक कारागीर इतस्ततः विखुरल्यानंतरच्या काळातल्या अकामिनिड कलेशी आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की महाराष्ट्रातील पाषाणगुहांच्या भिंतीच्या पृष्ठभागात जे मौर्य काळानंतर त्याचा लोप झालेला दिसतो.
वास्तुकलानिष्ठ आराखड्याचे अविभाज्य अंग झालेल्या शिल्पकलाकृतीचे मौर्य काळातील एकमेव उदाहरण बाराबर टेकड्यातील लोमश ऋषि-गुंफेच्या प्रवशेद्वाराच्या शिरोभागी आढळते. येथे एक स्तूप असून त्याच्या उभय बाजूंना चैत्याला प्रणाम करणारे हत्ती आहेत. हे खास बौद्ध प्रतीक असे सुचवते की चकचकीत पृष्ठभाग असलेल्या भिंतीची ही लोमश ऋषींची गुंफादेखील सम्राट अशोकानेच बौद्धधर्मियांना दिलेली देणगी असावी. महाराष्ट्रात शतकानुशतके पाषाणगुहातून खोदल्या गेलेल्या चैत्यांची आणि विहारांची निर्मिती अणि तांचा विकास केवळ कोकणातच नव्हे तर दख्खनच्या पठारासुद्धा त्यांचा झालेला विस्तार, यांना अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.
ख्रिस्तपूर्व सहावे शतक हा असा काळ होता की ज्यावेळी गौतम बुद्ध, महावीर, मख्खलीपुत्त गोशाल यांच्यासरखे श्रेष्ठ चिंतक अस्तित्वाचे गूढ, आपापल्या परीने स्वतंत्रपणे उकलण्याचा प्रयत्न करत होते. महावीराने मुक्तीचा मार्ग तपाचरणाएन शोधला; बुद्धाला तो सदाचाराने सापडला; आणि आजीविक उद्‌गारला "खरोखर आपल्याला कितीसे ज्ञान होऊ शकते?" वैदिक ऋचा आणि उपनिषदातील तत्वप्रतिपादन हाच भारतीय धर्मश्रद्धेचा गाभा राहिला असला तरीसुद्धा येथे बुद्धमताचा प्रसार झाला. त्याचे एक कारण त्यातील सोपेपणा, आणि दुसरे म्हणजे भटा-पुजाऱ्यांची मध्यस्थी आणि यज्ञयाग यांच्याच द्वारा ईश्वरभक्ती करण्याची सक्ती बौद्धधर्माने मोडून काढली. आपल्या शिकवणुकीच्या प्रसारासाठी बुद्धाने संघ निर्माण केले. संघ म्हणजे भिक्षूंची बिरादरी. संघ स्थाप्नेचे उद्दिष्ट, धर्मप्रसारापेक्षाही मानवमात्राला शांती प्राप्त करून देणे आणि सदाचाराचा उदात्त मार्ग दाखवणे, हे होते. बुद्धमताचा प्रसार करत भिक्षूंचे तांडे जरी जवळजवळ वर्षभर सर्वदूर संचार करत असेल तरी पावसाळ्याच्या काळात त्यांच्या हालचाली साहजिकच थंडावत असत. या काळात बुद्धभिक्षू देशाच्या विविध भागातल्या विश्रामिकां मध्ये मुक्काम करीत असत. या पद्धतीमुळे सामुदायिक चर्चा, ध्यान-धारणा सहज शक्य होई. यातूनच, भिक्षू आणि सामान्य अनुयायी यांना राहाण्यासाठी विहार म्हणजे निवास-कक्ष आणि त्यांच्या सामुदायिक पूजा-प्रार्थनेसाठी विहारा शेजारीच चैत्य बांधायची कल्पना निघाली.
ख्रिस्तपूर्व ४८३ साली बुद्ध निर्वाण पावले. त्यानंत्रच्या दोन-अडिचशे वर्षात बौद्ध धर्माने काही प्रगती केली असली तरी त्याचा देशव्यापी प्रसार शक्य झाला तो त्याला सम्राट अशोकाने दिलेल्या आश्रयामुळे. असे म्हणतात की सम्राट अशोकाच्या पुरस्काराने, मौर्याची राजधानी पाटलीपुत्र इथे तिस्स मोग्गलीपुत्त यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या तिसऱ्या बौद्धधर्म-परिषदेत अपरान्त (उत्तरकोकण) आणि दख्खन भागासह देशाच्या विविध विभागात प्रचारक पाठवावे असे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे बुद्धमतप्रचारासाठी अपरान्तात धर्मरक्षित आणि दख्खन भागात महाधर्मरक्षित या यवन (परदेशीय) भिक्षूंना पाठवण्यात आले. महाराष्ट्रातील बौद्धधर्माची सुरुवात ही अशी झाली.
ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात उत्तर भारतात शुंग राजांची तर दख्खन आणि कोकण प्रांतात आंध्रांची राजवट होती. याच काळात, पावसाळ्यासाठीच्या पाषाणगुहा निवासांतून आणि सामुदायिक पूजाप्रार्थनेसाठी मठांतून विश्रामिका उपलब्ध करून देण्याची कल्पना निघाली. सह्याद्री पर्वतराजीतील कमी उंचीच्या डोंगर-टेकड्यांमधला काळवथरी प्रस्तर यासाठी अत्यंत सोयिस्कर होता. महाराष्ट्रातील आरंभीच्या बुद्धभिक्षूंना डोंगरात गुहा खोदून काढण्याचे तंत्र माहित असले पाहिजे. कारण बाराबर गुहांमधले अशा खोदाईचे उत्तम नमुने त्यांच्या समोर होते. शिवाय असे की मौर्य आणि पुढच्या शुंग काळापर्यन्त पाषाणात शिल्पाकृती कोरण्याची कला प्रचलित झाली होती. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शत्तकातच भारहूत आणि सांची येथील शिल्पाकृतींनी सुशोभित प्रवेशद्वारे अणि कठडे असएलेले बौद्धस्तूप बांधण्यात आले होते. सुरुवातीच्या काळात, पाषाणातील वास्तू-शिल्पकलेसाठी लाकूड कोरण्याचे तंत्रच उपयोजनात आले. कारण तोपर्यन्त पाषाणात कोरीव काम करण्याचे कसब भारतीय कारागीरांच्या अंगवळणी पडले नव्हते.
पश्चिम भारतातील गुंफा
भाजे
पाषाणगुहा-निवासाचा सर्वात अगोदरचा नमुना भाजे इथे पाहायला मिळतो. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात निर्माण झालेल्या या लेण्यात वास्तू आणि शिल्पकलेतील संकल्पनांचा संयोग झालेला दिसतो. या निवासस्थानी एक चैत्य आणि एक विहार आहे. त्याच्या खोदकामावर उत्तर भारतातून आलेल्या भिक्षूंची देखरेख होती. लाकडी घुमटाकार चैत्य, त्याचप्रमाणे पाषाणातून कोरलेले प्रतिमांकित आणि कथाशिल्पाकृतीमंडित स्तूप, कठडे आणि प्रवेशद्वारे निर्माण करण्याचा अनुभव या भिक्षूंकडे असणारच. भाज्याची लेणी भारहूतच्या लेण्यांनंतरच्या काळातील आहेत हे उघड आहे. पाषाणगुंफातर्गत विश्रामिका बांधण्यासाठी पश्चिम भारतात पाठवण्यात आलेल्या बुद्धभिक्षूंबरोबर उत्तर भारतातील नवकर्मिक नावाच्या भिक्षू-वास्तूशिल्पीपैकी एक कारागीर पाठवला गेला असला पाहिजे यात शंका नाही. पाषाणाची प्रत्यक्ष खोदाई करणे, खांबांना आकार देणे, अर्धवर्तुळाकार घुमटासारख्या चैत्याचे छत बांधणे, ही कामे बव्हंशी स्थानिक कारागीरांनी केली असली पाहिजेत; कारण फार मोठ्या संख्येने पाथरवट उत्तरेतून दक्षिणेत आणणे जमण्यासारखे नव्हते. लाकडी कोरीव कामातील संकल्पनाच वास्तूशिल्पींनी दगडी कोरीव कामासाठी वापरल्या असल्या पाहिजेत हे उतरत्या पाषाणस्तंभावरून स्पष्ट होते. हे पाषाणस्तंभ लाकडी छतांना आधार देणाऱ्या लाकडी खांबांच्याच जणू प्रतिकृती आहेत. लाकडी छताचे वजन आणि प्रसरण पेलण्यासाठीच उतरत्या लाकडी खांबाची योजना असते. ही तांत्रिक बाब जरी केवळ लाकडी वास्तुकलेशीच निगडित असली तरी दगडी वास्तुकलेत तिचे अनुकरण केले गेले. कारण त्या वास्तूशिल्पींना नवे माध्यम अपरिचित होते. पाषाणाशिल्पामध्ये प्रसरण आणि आकुंचन या गोष्टींचा प्रश्नच उद्‌भवत नाही, याची जाणीव त्यांना झाली नाही. परिणामी, दगडी खांबाचा उतार ही वास्तूच्या काळाची निदर्शक अशी खूण बनली. स्तंभ जितका अधिक उतरता तितका त्याचा काळ पूर्वीचा. अखेर पुढे उतरत्या आकाराच्या खांबांची पद्धत लोप पावली. याचे प्रत्यंतर ख्रिस्तोत्तर पहिल्या शतकातील कार्ले येथील विशाल देऊळ-गुंफेत पाहायला मिळते. पाषाणात खोदलेल्या घुमटावर चैत्याच्या बांधणीला उतार असलेल्या खांबाची आवश्यकता नाही याचे भान त्या भिक्षू-वास्तूशिल्पीला आले असावे असे दिसत. सुरुवातीच्या काळात नवकर्मिकांनी आपल्या बरोबर काही पाथरवट आणले असावेत. आणि त्यांच्या सान्निध्यात आतापर्यन्त ज्यांनी लाकडातच कोरीव काम केले होते अशा कारागीरानी सह्याद्री-पर्वतराजीच्या काळवथरी प्रस्तरात पाषाण्गुहा, खांब आणि अर्धगोलाकार छते तक्तपोशी कोरण्याचे हुन्नर शिकवून घेतले असावे उत्तरेतून पाथरवट आणण्याची गरज यथाकाल संपूर्ण नाहीशी झाली तरी उत्तरेकडील भिक्षूसंघातून बहुधा नवकर्मिक येतच राहिले असावे आणि पश्चिम भारतातील कोकण आणि दख्खन या दोन्ही भागातील विहार आणि चैत्य यांच्या उभारणीवर त्यांची देखरेख चालू राहिली असावी.
अशोकाच्या काळात बौद्ध संघातील मतभेदांमुळे भिक्षूंच्या वेगवेगळ्या श्रेणी वा वर्ग निर्माण झाले. कधी कधी हे मतभेद इतके तीव्र असत की उदाहरणार्थ महासांघिकांनी खोदलेल्या गुहानिवासात थेरवादी भिक्षूंना प्रवेश मिळण्याची कल्पना आपण करू शकत नाही. कारण थेरवादी भीक्षू महासांघिकांना पाखंडी मानत असत. सुरुवातीच्या गुहानिवासांतून हीनयान पंथाची उपासना प्रचलित असावी. कारण अशा गुहांतून बुद्धाच्या मानवदेहधारी प्रतिमा आढळत नाहित. बुद्धाच्या पादुका किंव त्याला ज्या वृक्षाखाली आत्मज्ञान झाले तो बोधिवृक्ष, अशा प्रतीकांची पूजा या गुहांमध्ये केली जाई. भाज्याची लेणी खोदणारे पाषणाशिल्पी देखरेख करणाऱ्या नवकर्मिकांबरोबर आलेले उत्तर भारतातीलकारागीर असावेत, कारण भाजे लेण्यात पश्चिम भारतातील सर्वात प्राचीन अशी जी थोडी शिल्पे आहेत त्यांची शैली "भारहूत" आणि सांची स्तूप क्रमांक दोनमधील शुंग-कलेशी स्पष्ट मिळतीजुळती आहे. लाकडातील कोरीव कामाच्या प्रभावाखाली झालेल्या काहीशा सपट शरीराकृतींवरून आणि सपाट आणि गोलाकार चेहेऱ्यांवरून हे लक्षात येते. त्याचप्रमाणे फेट्यासकट त्यांची शिरस्त्राणे, शुंग शिल्पाकृतीतील आणि मृतिका शिल्पांतील शिरस्त्राणांसारखी दिसतात. ही गोष्ट, आंध्र प्रदेशातील कृष्णा खोऱ्यातील स्तूपातून आढळणाऱ्या अगदी आरंभीच्या काळातील संख्येने कमी असलेल्या शिल्पाकृतीतूनसुद्धा पाहायला मिळते.
भाजे लेण्यात दोन लक्षणीय शिल्पे आहेत. एकान्त, ऐरावत हत्तीवर आरूढ झालेला इंद्र आहे. दुसऱ्यात अक्राळविक्राळ राक्षसांची शरिरे चिरडत जाणाऱ्या रथावर आपल्या सेवकांसह बसलेला सूर्य आहे. एक विहाराच्या ओसरीवरच्या एका बाजूच्या भिंतीवर ही शिल्पे आहेत. गुंफेच्या तोंडाशी दोन्ही बाजूंना, शुंग शिल्पांच्या पद्धतीचे कमी उठावदार द्वारपाल आहेत. सुरुवातीच्या काळात, दगडात कोरण्याचे कसब स्थानिक कारागीर उत्तरेकडच्या शिल्पींकडून शिकले हे निश्चित, पण पश्चिम भारतातील इतर पाषाणगुंफातील शिल्पे हे कसब चांगले हस्तगत केलेल्या स्थानिक कारागीरांचीच आहेत असे वाटते. मूळच्या स्थानिक कारागीरांमध्ये कदाचित काही कसबी यवन कारागीरही असू शकतील दगडात कोरीव काम करणाऱ्या कारागीरांना उत्तरेतून आणण्याची पद्धत भाजे गुंफांनंतरसुद्धा चालूच राहिली असावी असे दिसते उदाहरणार्थ, कार्ल्याच्या विशाल चैत्यात कोरलेल्या मिथुन युग्मातील देखण्या, पुष्टा आणि भरदार अंग्रप्रत्यंगांच्या स्त्रिया, मथुरेच्या छत्रपात-पूर्वकुशान काळातील शिल्पाकृतींच्या घाटणीच्या आहेत हे स्पष्टपणे जाणवते.
भाजे येथील चैत्य अत्यंत साधा आहे. त्याच्या स्तंभाच्या तळाशी नक्षी कोरलेली नाही. तसेच त्याच्या वरच्या टोकांवर शिल्पे कोरलेली नाहीत. मात्र चैत्याचा गाभाऱ्यात स्तूप ही पूजनीय वस्तू कोरलेली आहे. घुमटाकार छताला. फाकत जाणाऱ्या लाकडी फासळ्या वा दांड्या आहेत. त्या आजतागायत टिकून राहिल्या आहेत. त्याच्या उभारणीत एखाद्या काष्ठशिल्पीचा हात असला पाहिजे हे उघड दिसते. पंथातल्या निर्वाण पावलेल्या मान्यवर भिक्षूंच्या स्मरणार्थ घडवलेले अनेक छोटे स्तूप कोरलेली एक पाषाण-गुंफाही भाजे येथे आहे.
अजिंठा क्र.१०
कमीअधिक याच धर्तीचा साधा चैत्य दख्खन भागात अजिंठा इथे आढळतो. तेथील भित्तीचित्रे थोड्या नंतरच्या काळातील म्हणजे दुसऱ्या शतकातील आहेत; आणि खांबावरील चित्रे पाचव्या शतकातील आहेत.
कोंडाणे
अजिंठ्यानंतर, पश्चिम घाट भागात अनेक पाषाण गुहानिवास आणि चैत्य बांधण्यात आले. यातील विशेष महत्त्वाची स्थाने म्हणजेच कोंडाणे, भेडसे, नाशिक, जुन्नर आणि पितळखोरे, या मालिकेतील सर्वोत्कृष्ट शिल्प म्हणजे कार्ले येथील विशाल देऊळ-गुंफा. तिचा काळ जवळजवळ निश्चित करता येतो. ख्रिस्तोत्तर चाळीस ते शंभर या साठ वर्षात त्या देऊळ-गुंफेची उभारणी झाली असावी. तसा कार्ले चैत्याचा काळसुद्धा वेगवेगळा मानण्यात आला असला तरी शिलालेखी पुरावा आणि ख्रिस्तोत्तर एकाहत्तर सालापूर्वी कधी तरी संकलित केलेली द पेरिप्लस ऑफ दी एरिथ्रियनसी ही एका अज्ञात दर्यावर्दीची प्रख्यात नोंदवही यासारखी ऐतिहासिक सामग्री वर निर्देशिलेल्या काल निश्चितीला पुष्टी देतात.
कोंडाणे-शिल्पाचे वैशिष्ट्य असे की तेथील स्पष्टपणा आता बराचसा गमावून बसलेल्या शिलालेखात, चैत्य गुंफेच्या बाजूला यक्ष कोरणारा कान्हाशिष्य बलक या कलावंताचा स्पष्ट उल्लेख आहे. शिल्पी म्हणून कान्हा याचा उल्लेख, आता दिल्लीच्या राष्ट्रीय वस्तूसंग्रहालयात असलेल्या पितळखोरे यक्षावरच्या शिलालेखातही आहे. स्वतः निर्माण केलेल्या शिल्पाकृतीवर स्वतःचा नामोल्लेख कोरून ठेवण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्मिळ आहे. कोंडाणे-यक्ष कोरणाऱ्या बलकाचा गुरु कान्हा आणि पितळखोरे यक्ष कोरणारा कान्हा ही एकच व्यक्ती असेल तर त्या आधारे असे अनुमानिता येईल की एकाच शिल्पीसंघातले किंवा घरण्यातले कलाकार दूरदूरवर पसरलेल्या क्षेत्रात कार्यरत होते.
भेडसे
पशू आणि त्यांच्यावरील स्वार यांनी मंडित झालेल्या मोठमोठ्या स्तंभशीर्षासाठी भेडसे गुंफांना महत्त्व आहे. या खांबामध्ये घोडे निश्चित यवन शिल्पीच्या हातचे आहेत. कारण घोड्यांचे ते ठाणमाण भारतीय शिल्पकारांच्या धाटणीचे नाही; मात्र ते आशियाई-ग्रीक शिल्पकाराला स्वाभाविक वाटणासारखे आहे. यवन या शब्दाची अर्थकक्षा व्यापक आहे. सर्वसामान्यपणे यवन म्हणजे विदेशी. मग तो पर्शियन, सिथियन, आशियानी ग्रीक, पार्थियन, कोणीही असू शकतो. अलेक्झांड्रियासारख्या बाजारपेठेसकट पश्चिम आशियातील अनेक भागांतून विविध मालाची मोठी लाभदायक ने-आण करणाऱ्या यवन व्यापाऱ्यांच्या वसाहती भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी स्थापन झाल्या असल्या पाहिजेत. रोम आणि इतर पश्चिम आशियाई नगरात पाठवले जाणारे भारतीय मसाले आणि मोती यांची विक्री हे व्यापारी करीत. कारण पश्चिम भारतातील पाषाण-गुहा निवासांना ते भेट देत असत. कार्ले गुंफांनाच त्यांच्याकडून वेगवेगळ्या सात देणग्या मिळाल्या होत्या. वाङमयीन आणि इतर साधनांवरून आपल्याला समजते की मजबूत बांध्याच्या, बहुधा सिथियन, यवनांची नगर वा राजसम्राटरक्षक म्हणून किंवा त्यांच्या अश्वारोहण कौशल्यामुळे घोडदळ सैनिक किंवा सईस म्हणून नेमणूक करण्यात येत असे. अजिंठ्यापसून जवळच दख्खन भागात असलेल्या, ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकातील पितळखोरे येथील आरंभीच्या पाषाणगुहानिवासाचे खास वैशिष्ट्य म्हणजे तेथील शिल्पित केलेले यवन द्वारपाल. त्यांची चेहेरेपट्टी, अंगलट, पोशाख यांच्यावरून ते विदेशी आहेत यात शंका राहत नाही. या शिल्पावरून जी आणखी एक गोष्ट लक्षात येते ती ही की पश्चिम भारतातील बुद्धभिक्षूवर्गाचे यवन व्यापारी वर्गाशी आणि भारतीय व्यापारी नगरातून चाकरी करणाऱ्य यवनांशी सलोख्याचे संबंध असले पाहिजेत.
व्यापारी मार्ग
हे सगळे बौद्ध पाषणगुहानिवास डोंगराळ भागात असले तरी अशा ठिकाणी होते की नाणेघाट, थळघाट, भोरघाट हे डोंगरी व्यापारी मार्ग त्यांच्या जवळून जात, पश्चिम किनाऱ्यावर भरभराटीला आलेल्या कल्याण आणि सोपारा बंदरात येणारा परदेशी माल बैलगाड्यांतून याच डोंगरी मार्गानी अंतर्भागात पोचवला जाई. मोक्याच्या ठिकाणी वसलेल्या या पाषाणगुह्यनिवासातील बौद्धभिक्षूंना जवळच्या व्यापारी मार्गानी रहदारी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून विविध जीवनोपयोगी वस्तू सहज उपलब्ध होत असत. भिक्षूंची राहणी तशी अत्यंत साधी होती. बुद्धाच्या आदेशाप्रमाणे भिक्षा मागून आणलेल्या अन्नावरच बव्हंशी त्यांची गुजराण चाले. तरी सुद्धा पावसाळ्याच्या दिवसात भिक्षा मागणे शक्य होत नसे.
या परिस्थितीमुळे अन्नधान्य आणि तेल, औषधे यासारख्या काही महत्त्वाच्या वस्तू यांची थोडीफार बेगमी करणे आवश्यक असे. त्याशिवाय कार्ल्यासारखा काही पाषाणगुंफानिवासांना अनेक गावे मिळून शिधा पुरवठा करत असत; गावात पीक भरमाप आले तर जादा धान्याच्या बदल्यात व्यापाऱ्यांडून जीवनावश्यक वस्तू किंवा प्रसंगी पैसेसुद्धा घेतले जात असावेत.
काही काळ लोटाल्यावर या पाषाणगुंफा, अल्पकालीन विश्रामिका म्हणून नव्हे तर वर्षभरासाठी कायमची निवासस्थाने म्हणून वापरल्या जाऊ लागला. नजिकच्या परिसरातील सामान्या भक्तजन या मठांना भेट द्यावे. व्यापारासाठी मुशाफिरी करणारे अनेक व्यापारी प्रसंगी मठांत मुक्काम करायचे आणि मठाला देणग्या द्यायचे. काही बुद्धभिक्षू या गुंफातून कायम वास्तव्य करत असले पाहिजेत. या मठातून पाण्याची अनेक टाकी आढळतात. त्यावरून नियमित आणि पुरेसे पाणी (निवासींना) उपलब्ध व्हावे अशी काळजी घेतली जात होती असे दिसते. विहारातील अनेक ओवऱ्यातून पाषाणातच कोरुन/खोदून काढलेल्या शय्या वा मंच आढळतात. वरिष्ठ श्रेणीतील भिक्षूंसाठी आणि रुग्णाईतांसाठी बहुधा ही व्यवस्था असावी. कान्हेरी गुंफात एक जेवणघर सुद्धा आहे. त्याचा उपयोग प्रवचनस्थळ म्हणूनसुद्धा केला जात असावा.
कार्ले
कार्ले येथील मिथुनयुग्मे आणि स्तंभशीर्षावरील हत्ती व घोडे यावरील स्वारांची शिल्पे दोन्ही उच्च दर्जाची आहेत. कोकणातील आरंभीचा चैत्यातून सुरू झालेल्या या शिल्प परंपरेचे जतन ख्रिस्तोत्तर दुसऱ्या शतकातील उत्तरर्धापासून पुढे सुमारे तीनशे वर्षे मुंबईनजिकच्या विस्तृत कान्हेरी भिक्षू-निवासामध्ये केले गेले. त्या शैलीचे सर्वात दिमाखदार दर्शन ख्रिस्तोत्तर पाचव्या शतकाच्या मध्यास निर्मिलेल्या घारापुरी (एलिफंटा) येथील पाषाण गुंफामंदिरातील ब्राह्मणी पाषाणशिल्पात होते. घारापुरी येथील शिल्पकलेला, कोकणनिवासी मौर्य या स्वतंत्र आणि सामर्थ्यशाली राजघराण्याचा आश्रय होता. ख्रिस्तोत्तर ५३३ ते ६२० किंवा त्यानंतर काही काळपर्यन्त मौर्यांची राजवट चालू होती. बदामीचा चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने अखेर मौर्याची सत्ता बुडविली.
बौद्ध पाषाण वास्तूकलेच्या क्षेत्रात भारतातील कार्ले येथील बुद्ध-गुंफामंदिर सर्वोकृष्ट आहे. आकार आणि सौंदर्य या दोन्ही दृष्टींनी ते अजिंठ्याच्या विशाल चैत्यांपेक्षा आणि वेरूळच्या विश्वकर्मा चैत्यापेक्षा भव्य आहे.
कान्हेरी
मुंबईच्या नजिकच्या कान्हेरी येथील विस्तृत गुंफा वसाहतीतील चैत्य काही प्रमाणात कार्ले चैत्याची प्रतिकृती आहे. शिलालेखातील पुराव्यावरून ही निर्मिती ख्रिस्तोत्तर दुसऱ्या शतकाच्या उत्तरर्धात झाली असे दिसते. कार्ल्याइतकी भव्यता नसली तरी कान्हेरी गुंफा एक खास रमणीय गोष्ट आहे. अणि ती म्हणजे तेथील चैत्याच्या ओसरीमध्ये उभय बाजूंच्या कोनाड्यात असलेल्या मिथुन-युग्मांच्या दोन जोड्या. ही मिथुन युग्मशिल्पे कार्ले येथे आढळणाऱ्या छत्रपालपूर्व कुशान शैलीतील असण्यापेक्षा उत्तर कुशान परंपरेतील अधिक वाटतात. परंतु मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स पुराण वस्तुसंग्रहालयाचे संचालक श्री सदाशिव गोरक्षकर यांनी सर्वप्रथम निर्देशिल्याप्रमाणे, या मिथुनयुग्म शिल्पात, विशेषतः त्यांच्या चेहरेपट्टीत आणि केशभूषेत काही परकीय, खासकरून पार्थियन धाटणीचा प्रभाव दिसतो. त्यातील सिंहमुखी कर्णभूषणांचे साम्य गांधर्व शिल्पातील कर्णभूषणांशी दिसते. कदाचित उत्तरेकडील कोण्या पाषाणशिल्पीने या मिथुनशिल्पांची निर्मिती केली असेल. कान्हेरी येथे शंभरहून अधिक गुंफा आहेत. श्रीमती शोभना गोखले यांनी सुचविल्याप्रमाणे त्या ठिकाणी भिक्षुंसाठी चैत्यासहवर्तमान, विस्तृत पाषाण गुंफानिवास व्यवस्था आणि बौद्ध धर्मतत्वांच्या अध्यापनासाठी विद्यालयही असावे असे दिसते. अकराव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात इरानमधील पारशांनी कान्हेरीला १००९ मध्ये दोनदा व १०२१ मध्ये एकदा अशी तीन वेळा भेट दिली व प्रत्येक वेळी आपली नावे व भेटीच्या तारखा तेथे एकाच गुंफेत पेहेलवी लिपीत कोरून ठेवल्या आहेत. यावरून अकराव्या शतकातही कान्हेरी बौद्धविहार परकीयांना आकर्षित करण्याइतका महशूर असला पाहिजे
कान्हेरीतील मिथुनयुग्म शिल्पात कुशान प्रभाव दिसतो. पण त्याखेरीज पाचव्या शतकात गुप्तशिल्पाच्या सकृद्‌दर्शनी सारनाथी शिल्पाचा प्रभावही आढळतो. त्यावरून असे वाटते की त्या सुमारास सारनाथ पीठाचा एखादा नवकर्मिक अथवा शिल्पकार कान्हेरी येथे कार्यरत असावा.
पाचव्या शतकाच्या अखेरीस कान्हेरी येथील चैत्याच्या ओसरीत कोरण्यात आलेल्या दोन विशाल बुद्धाकृती हा नवा शिल्पप्रयोग मानला पाहिजे. प्रत्येक बुद्धाकृती बावीस फुट उंच आहे. आणि घारापुरी येथील ब्राह्मणी गुंफा-मंदिरातील विशाल शिल्पकृती या कान्हेरीतील बुद्धमूर्तीच्या अनुकरणातून निर्माण झाल्या असाव्या. या संदर्भात, परळ येथील, महाकाय परंतु अपूर्ण शिवमूर्ती, श्रीयुत सदाशिव गोरक्षकर यांनी अलीकडेच शोध लावलेल्या परळ परिसरातील शिवडी येथील काहीशा अपूर्ण अवस्थेतील छोट्या आकाराची शिवमूर्ती आणि मातृकामूर्ती यांची दखल घेतली पाहिजे. याचा अर्थ असा की परळ येथे एखादी शिल्पकलेची कार्यशाळा असली पाहिजे. आणि आता मुंबईच्या प्रिन्स ऑफ वेल्स पुराणवस्तुसंग्रहालयात दाखल असलेल्या व मुळात घारापुरी येथे सापडलेल्या फुटकळ शिल्पाकृती या कार्यशाळा तयार झाल्या असाव्या. घारापुरी गुंफा-मंदिरातील शिल्पे आणि परळ येथील महाकाय शिवमूर्ती यांचे जन्मस्थान परळची कार्यशाळा असले पाहिजे, असे आपण दीर्घकाळ मानत होतोच. श्रीयुत सदाशिव गोरक्षकर यांनी शोधलेल्या परळ परिसरातील शिवडी कार्यशाळेमुळे आपल्या उपनिर्दिष्ट सिद्धान्ताला मोठाच आधार लाभला आहे.

घारापुरी
बौद्ध पाषाणगुहा निवास आणि चैत्य यांच्या ख्रिस्तपूर्व दोनशे वर्षापासूनच्या अखंड परंपरेमुळे पश्चिम भारतातील इतर धर्ममतानुयायांना सुद्धा अशी स्थाने निर्माण करावी अशी प्रेरणा मिळाली असावी: उदाहरणार्थ (१) ख्रिस्तोत्तर सहाव्या शतकाच्या मध्यास घारापुरी येथे पाषाणात खोदलेले भव्य शैव मंदिर, (२) काही काळानंतर खोदलेले मंडपेश्वराचे शैवमंदिर आणि तेथील सुबक नटराजमूर्ती, आणि (३) जोगेश्वरी येथील सहज ओळखता येणारे एक लाकुलिश भितिशिल्प अंतर्भूत असणारी शैव लेणी. खरे म्हणजे ही तीनही शैव-मंदिरे. त्या काळात भारतभर आणि विशेषतः पश्चिम भारतात अस्तिवात असलेल्या पाशुपत उपासना पंथाची आहेत. या तीनही शैव मंदिरांना निष्ठावंत पाशुपतपंथीय असलेल्या कोकण मौर्याचा उदार आश्रय होता. यात संशय नाही या मताला पुढील कोरीव लेखातील भक्कम आधार सापडतो. १) ख्रिस्तोत्तर ४९४ मधील कान्हेरी येथील त्रैकूटक ताम्रपट २) ख्रिस्तोत्तर ५०४ मधील त्रैकूटक राजा मध्येसेनाचे मातवण येथील कोरीव लेख; ३) ख्रिस्तोत्तर ५३३ मधील अपरान्ताधिपती (अपरान्तादी देशपती) असे ज्याचे वर्णन केले जाते त्या त्रैकूटक राजा विक्रमसेनाचे मातवण कोरीव लेख या लेखात त्रैकूटनाम या ऐवजी कलचुरीनाम असा केलेला बदल हा कै. डॉ. वा. वि. मिराशि यांनी निर्णायकपणे दाखवल्याप्रमाणे उघड‍उघड प्रक्षिप्त वाटतो. कारण कोणत्याही मांडलिकाचा उल्लेख महाराजा असा होणार नाही. आणि तो जर कलचुरींचा मांडलिक (महासामंत) असेल तर त्याचे वर्णन अपरान्ताधिपती असे केले जाणार नाही. ४) ख्रिस्तोत्तर ५९७ मधील कलचुरी राजा शंकरगण याच्या आभोणा कोरीव लेखात एक गौरवपर शब्दप्रयोग आढळतो. काही राजांच्या कोरीव लेखात आणि प्रशस्ती लेखात असे गौरवपर उल्लेख सर्रास दिसतात. आभोणा कोरीव लेखातील तो शब्दप्रयोग गर्वाने असे उद्‌घोषित करतो की कलचुरी साम्राज्य पूर्व समुद्रापासून पश्चिम समुद्रापर्यन्त आणि इतरही प्रदेशात विस्तृतपणे पसरले आहे. प्रत्यक्षात ते अस्तित्वात नव्हते. या पूर्णपणे निराधार घोषणेचा आधार घेऊनच उत्तर कोकण मौर्यावरील कलचुरी घराण्याच्या आधिपत्याचा सिद्धान्त मांडण्यात आला आहे. पुढे जाऊन असेही प्रतिपादन केले जाते की कोकण मौर्य राजे हे कलचुरीचे मांडलिक होते. आणि त्यामुळे त्यांच्यापाशी घारापुरीसारखे भव्य मंदिर-शिल्प उभारण्यासाठी लागू शकणारी साधनसामग्री तशीच राजनैतिक पदप्रतिष्ठाही नव्हती. यावरून घारापुरी-शिल्प कलचुरींनीच उभारले असले पाहिजे; किंवा कदाचित ते मौर्यानी उभारले असले तरीसुद्धा त्यासाठी पशूपती शिवाची भक्ती करणाऱ्या कलचुरींचे कोषागार, पुरस्कार आणि कल्पकता यांचे सहाय्य लाभले असले पाहिजे.
घारापुरी मंदिराशिल्प ही कलचुरींची निर्मिती आहे हे मत मुळीच पटण्यासारखे नाही. कारण स्वतः शंकरगण किंवा कृष्णराजा या सारखे त्याचे कोणी पूर्वज अपरान्ताचे म्हणजे उत्तर कोकणाचे कधीतरी अधिपती होते हे गृहीतकृत्यच निराधार आहे. खरे म्हणजे ख्रिस्तोत्तर ४९४ मधील कान्हेरी येथील कोरीव लेख आणि मातवण येथील कोरीव लेख यांच्यावरून असे दिसते की निदान ख्रिस्तोत्तर ५३३ पर्यन्त तरी त्रैकूटकांची सत्ता, वर्चस्व, अमल जारी होता. त्यानंतर,ख्रिस्तोत्तर ६३४ मधील दुसऱ्या पुलकेशीच्या मेगुती कोरीव लेखात अशी माहिती मिळते की दुसऱ्या पुलकेशीचा पिता कीर्तिवर्मा (ख्रिस्तोत्तर ५६६ ते५९८) याचा कोकण मौर्याशी संग्राम झाला. तथापि उत्तर कोकणात त्याला पाय रोवता आला नाही, आणि मौर्यसत्तेचे अधिराज्य त्या प्रदेशात अबाधित राहिले. त्यानंतर दिर्घ काळाने दुसऱ्या पुलकेशीने आपले सर्व सैन्यबळ आणि शेकडो जहाजांचे प्रचंड आरमार यांच्या साहाय्याने उत्तर कोकणच्या मौर्य राजांचा पराभव केला आणि त्यांची पश्चिम समुद्राची भाग्यदेवता अशी ख्याती असलेली पुरी ही राजधानी काबीज केली. पुरी म्हणजेच आजची घारापुरी. त्यामुळे आभोणा कोरीव लेखातील शंकरगणांच्या राजाचा दावा हा अत्युक्तीचाच प्रकार मानला पाहिजे. एखाद्या काल्पनिकचक्रवर्ती राजाला पराभूत करून मिळवलेला काल्पनिक दिग्विजय उल्लेखणारी अशी अत्युक्ती प्रशस्तोपर कोरीव लिखातून सर्रास आढळते. खरे म्हणजे, ख्रिस्तोत्तर ५९७ मध्ये शंकरगणाने उत्तर कोकणावर आपले अधिराज्य स्थापन केले असण्याची शक्यताच नाही. कारण मौर्याचा पराभव करण्यात महाप्रतापी चालुक्य सम्राट कीर्तिवर्मा यालाही यश आलेले नव्हते. आणखी असे की शंकरगणामागून गादीवर आलेला कलचुरी राजा बुद्धसेन याचा, कीर्तिवर्माचा भाऊ मंगलेश्वर याने ख्रिस्तोत्तर ६०२ मध्ये पूर्णपणे मोड केला होता. कलचुरींनी उत्तर कोकणात एक सुद्धा देणगी दिल्याचा उल्लेख कोरीव लेखांमध्ये आढळत नाही. डॉ. स्पिंकचा उत्तर कोकणावरच्या कुलचुरी आधिसत्तेचा प्रसिद्ध सिद्धान्त, निराधार गृहीतकृत्ये आणि कोरीव लेखातील पुराव्याचे चुकीचे विश्लेषण यावरच उभा आहे. ख्रिस्तोत्तर ५३३ नंतरच्या नजीकच्या काळापासून तो मौर्याची राजधानी आणि शासनपीठ अशी पुरी म्हणजे घारापुरी. दुसऱ्या पुलकेशीने काबीज करेपर्यन्त म्हणजे सुमारे ख्रिस्तोत्तर ६२०-६२५ पर्यन्त उत्तर कोकणावर मौर्याचेच सार्वभौमत्व होते. हे कोरीव लेखांतर्गत पुराव्यावरून सिद्ध होते. पुलकेशी राज्यावर आला तो ख्रिस्तोत्तर ६१०-६११ या काळात.
ख्रिस्तोत्तर ५३०ते ५६६ या काळात घारापुरी एलिफंटा येथील भव्य गुंफामंदिर उभारण्यात आले यात संशय असण्याचे कारण नाही. या मंदिराच्या उभारणीमुळे मौर्याची कीर्ती विस्तार पावली यामुळेच कीर्तिवर्माची नजर मौर्याकडे वळली मात्र, मौर्याचे गर्वहरण करण्याचा, त्यांचा प्रदेश बळकवण्याचा कीर्तिवर्माचा प्रयत्न असफल झाला. मेगुती कोरीव लेखात निर्देशिल्पाप्रमाणे कीर्तिवर्माने कादंबांचा निःपात जरूर केला; परंतु लेखातील अत्युक्तीत नळ-मौर्य- आणि कदंब यांची जणू काळरात्रच असा कीर्तीवर्म्याचा उल्लेख केला असला तरी मौर्याचा पराभव तो करू शकला नव्हता. कोरीव लेखात, कदंबाचा निःपात केला एवढेच म्हटले आहे. (त्यातून) मौर्याचे दमन झाले नाही, असा अर्थ काढणे अवघड जाऊ नये. कीर्तिवर्मानेच मौर्याचा निःपात केला असता तर, ख्रिस्तोतर ६२०-६२५ च्या सुमारास आपल्या सामर्थ्याच्या शिखरावर असलेल्या मौर्याचा पराभव आणि पुरीवर आक्रमण करण्यासाठी आपले संपूर्ण सैन्यबळ आणि आरमार वापरण्याचा प्रसंगच मुळी पुलकेशीवर आलाच नसता.
मेगुती कोरीव लेखांत कलचुरींचा निर्देश नाही; आणि कलचुरी राजे कधी काळी मौर्याचे खरोखरच सम्राटा असते तर दुसऱ्या पुलकेशीन सर्वप्रथम गर्विष्ठ पणे उद्‌घोषित केले असते की प्रथम कीर्तिवर्म्याला आणि नंतर आपल्याला आव्हान देण्याची हिंमत मौर्याच्या सम्राटांना झाली नाही. इतकेच नव्हे तर मांडलिक मौर्याच्या चालुकांविरुद्धच्या युद्धात समूळ उच्छेद होत असताना मौर्याधिपती कलचुरी तो प्रकार अगतिकपणे पहात बसले. मौर्यांचे सम्राट असूनही कीर्तिवर्म्याविरुद्ध आक्रमणात मौर्याचे रक्षण करायला कलचुरींनी बोटही उचलू नये. हे खरोखरच विचित्र मानले पाहिजे. कोकण मौर्यांचे सामर्थ्य मोठेच असले पाहिजे. एरवी पुरी (किंवा घारापुरी) सारखी बेटा-राजधानी काबीज करण्यासाठी दुसऱ्या पुलकेशिला, शेकडो जहाजांची गरज भासली नसती. घारापुरी शिल्पे ही कलचुरींची निर्मिती आहे हा मिराशी-स्पिंक सिद्धान्त, ऐतिहासिक साधनसामग्री आणि शक्यता आणि योग्य तऱ्हेने विश्लेषीलेला कोरीव लेखातील पुरावा यांना विरोधी अशा अप्रस्तुत गृहीत कृत्यातून उद्‌भवलेला आहे. खरे म्हणजे या संदर्भात कलचुरींना काहीच स्थान नाही. परंतु डॉ. मिराशींनी प्रथम तसे चुकून मानले. मग, ख्रिस्तोत्तर ५३३ मधल्या दुसऱ्या मातवण कोरीव लेखांच्या अचूक विश्लेषणान्ती त्यांनी आपल्या मतात पुष्कळ सुधारणा केली. डॉ. वॉल्टर स्पिंक यांनि डॉ.मिराशींचे पहिलेच मत विस्ताराने मांडले; आणि अधिकतर निराधार गृहीतकृत्यांच्या आधारे त्यांनी दुसऱ्या मातवण कोरीव लेखांचे चुकीचे विश्लेषण केले. उत्तर कोकणात काही ठिकाणी कलचुरी राजा कृष्णराजा (ख्रिस्तोत्तर५५०-५७५) याची काही नाणी सापडली एवढ्यावरून कलचुरींचे आधिपत्य सिद्ध होण्यासारखे नाही, या गोष्टीकडे पुष्कळ वेळा दुर्लक्ष केले जाते. पुष्कळ वेळा फिरस्ते व्यापारी, यात्रेकरू यांच्यामुळे नाणी स्थलांतर करतात. या स्थलांतरित नाण्यांवरून त्या ठिकाणचे त्या राजाचे स्वामित्व निर्णायकपणे सिद्ध होत नाही. शिवाय असे की सह्याद्री पर्वतराजी पठारांवर नाशिक वा अन्य काही ठिकाणी कलचुरी स्थिरपद झाले होते असे मानले तरी त्यावरून सह्याद्री पर्वतराजी आणि अरबी समुद्र यांच्यामधील उत्तर कोकणावर त्यांची सत्ता होती. असा निष्कर्ष अटळपणे मुळीच निघत नाही. ख्रिस्तोत्तर ५३३ते६२०-६२५ पर्यन्तच्या काळात कोकण मौर्यांच्या स्वाधीन असलेला हा भूप्रदेश, ख्रिस्तोत्तर ६२०-६२५ मध्ये पुलकेशीने पुरी काबीज करीपर्यन्त कोणत्याही राजाने जिंकलेला नव्हता. घारापुरी येथील प्रमुख गुंफेच्या उत्तरेकडच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला असलेली शिल्पाकृती लाकुलिश नसून महायोगी शिवाची आहे. समजा, ती लाकुलीश असती तरी तेवढ्यावरून घारापुरी येथील शिल्पे कलचुरींच्या आश्रयाखाली, त्यांचे तथाकथित मांडलिक असलेल्या कोकण मौर्यांनी खोदली आहेत असा निष्कर्ष काढता येणार नाही. कलचुरी राजे पशुपती शिवाचे मोठे भक्त होते. या कोरीव लेखातील पुराव्यावरून घारापुरीच्या संदर्भात, काहीच निष्कर्ष निष्पन्न होऊ शकत नाही. मौर्य आणि इतरही अनेक घराणी पशुपती शिवाची निःसंशय तितकीच मोठी भक्त होती. त्या काळात पशुपती शिवोपासनेचा पंथ, विशेषतः पश्चिम भारतात, विस्तृतपणे प्रसार पावला होता.
एलिफंटा अजून घारापुरी या नावाने ओळखली जाते. तेथे सापडलेल्या ख्रिस्तोत्तर बाराव्या शतकातील एका ताम्रपत्रावर त्याचा श्रीपुरी असा उल्लेख केलेला आहे. दुसऱ्या पुलकेशीच्या मेगुती कोरीव लेखात निदेशिलेली किकण मौर्याची राजधानी आणि शासनपीठ असलेली पुरी म्हणजेच घारापुरी होय. या बाबत थोडीसुद्धा शंका बाळगायला नको. घारापुरीच्या एका उतारू धक्क्याला आज सुद्धा मोरा(मौर्य) बंदर म्हणतात, ही गोष्ट अत्यंत अर्थपूर्ण आहे.

घारापुरीवर कान्हेरीचा काही प्रभाव स्पष्टच दिसतो. हा प्रभाव कान्हेरीच्या दोन उभ्या भव्य बुद्धमूर्तीचे अनुकरण करणाऱ्या शिल्पाकृतींच्या आकारमानातच दिसतो असे नव्हे तर तो शिवाच्या मूर्तिकारीमध्येही दिसतो. दोन नागांनी उभवलेल्या कमळावर आसनस्थ झालेली महायोगी शिवाची प्रतिमा शैव नव्हे तर बौद्ध मूर्तीकारीतून सिद्ध झाली आहे. अशी प्रतिमा कान्हेरी येथेही आढळते. तेथे नंद आणि उपनंद या नागराजांनी उभवलेल्या सुवर्ण कमळावर बुद्ध श्रावस्तीच्या चमत्कारानंतर आसनस्थ झाले असून ते प्रवचन करत आहेत. शिव-पुराणाच्या शैव मूर्तिकारमध्ये नागांची उपस्थिती असली तरी तेथे शिव कमळावर आसनस्थ बसतो. तेव्हा घारापुरीतील ही गोष्ट उघडच खिरस्तोत्तर पाचव्या शतकाच्या अखेरच्या काळातील कान्हेरी येथील बौद्ध शिल्पकलेकडून उसनी घेतलेली आहे. घारापुरी येथे कलचुरी राजा कृष्णराजा याच्या नावाची शेकडो नाणी सापडली आहेत. खरे म्हणजे ही कृष्णराजाची नेहमीची नाणी नाहीत. हीनाणी घारापुरी येथे पाडण्यात आली असून तेथील तथाकथित कलचुरी प्रणीत गुंफामंदिर खोदणाऱ्या कारागीरांचे वेतन म्हणून देण्यात येई असे सुचवले जाते. यासंदर्भात एवढेच म्हणता येईल की या कल्पनेत काहीही तथ्य नाही. आश्चर्याची गोष्ट अशी की ही सगळी नाणि समुद्रकिनाऱ्यावर सापडली आहेत. काही कारणाने बंदरात आसरा घ्यावा लागलेल्या अथवा यात्रेकरूंच्या जहाजावरून ही नाणी तेथे आली असतील. कारण देशाच्या विविध भागातून घारापुरीला भेट देण्यासाठि मोठ्या संख्येने यात्रेकरू येत असले पाहिजेत. उदाहरणार्थ, छत्रपांची ही काही नाणी घारापुरी येथे सापडली आहेत पण त्यातून काही खास निष्कर्ष काढता येत नाही.
एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती अशी की घारापुरी, जोगेश्वरी, आणी मंडापेश्वर हा वादग्रस्त गुंफासमूह वगळता उत्तर कोकणाबाहेरच्या ज्या क्षेत्रात कलचुरींची सत्ता निर्विवादपणे होती तेथील सर्वमान्य कलचुरी शैलीतील एकही मंदिर उत्तर कोकणात आढळत नाही. उलटपक्षी, वास्तुशास्त्रीय वा शिल्पशास्त्रीय भव्यपणात घारापुरी, किंवा मंडपेश्वर किंवा जोगेश्वरी येथील कलेशी थोडीसुद्धा बरोबरी करू शकेल असे एकही मंदिर या शिल्प कलचुरींच्या आधिपत्यखालील प्रदेशात नाही.
या वस्तुस्थितीवरून असे दिसते की घारापुरी येथील विशाल मंदिर आणि त्याहूनकमी आकारमानाची मंडेपेश्वर आणि जोगेशेश्वरी येथील मंदिरे ही स्थानिक वास्तुशास्त्रज्ञ आणि शिल्पकार यांची निर्मिती असली पाहिजे. आणि विशेष कलादृष्टी असलेल्या उत्तर कोकणच्या मौर्य राजांच्या अत्यंत मतवादी आश्रयाखाली जोपासलेल्या प्रतिभेतून ती साकारली असली पाहिजेत. महाराष्ट्रातील उत्तर कोकणच्या स्थानिक, परंतु सामर्थ्यशाली राजघराण्याला घारापुरीच्या कलावैभवाचे श्रेय द्यायला हवे.
घारापुरीबाबत आणखी एकमत असे आहे की ती वाकाटकांची निर्मिती आहे. हे मत प्रथम मांडले कै. डॉ. शिवराममूर्ती यांनी. घारापुरी येथील शिल्पांचे शैलीच्या दृष्टीने विश्लेषण केले तर असे दिसेल की येथील शिल्पे अजिंठ्यापेक्षा अगदी वेगळ्या ढंगातील आहेत ही एक गोष्टा नीट ध्यानात ठेवली पाहिजे. शिवराममूर्तीच्या चुकीच्या निष्कर्षाला तीच कारणीभूत असली पाहिजे. ती अशी की, ख्रिस्तोत्तर पाचव्या शतकापासून नवव्या शतकापर्यन्तच्या काळातील महाराष्ट्रातील सुरुवतीच्या शिल्पकाला कृतीत, मग त्या घारापुरी, अजिंठा वेरूळ किंवा औरंगाबाद अशा कुठल्याही असोत आणि बौद्ध, ब्राह्मणी किंवा जैन अशा कोणत्याही पंथाच्या असोत. काही समान वैशिष्ट्ये आहेत. परंतु त्यांच्या शैलीचे सखोल विश्लेषण केल्यास असे उघड होते की अजिंठ्याचे वाकाटक शिल्पकार हे घारापुरीचे शिल्पकार निश्चितच नव्हेत. घारापुरीचे शिल्पकार हे त्यावेळी मुख्य भूभागापासून अलग असलेल्या मुंबई बेटावरील परेलनजिक शिवडी येथील स्थानिक कोकणी शिल्पकार संघटनेचे सदस्य असले पाहिजेत.
डॉ. शिवराममूर्तीच्या मतांचा डॉ. स्पिंक यांनी खुलासेवार विस्तार केला. त्यानुसार विस्थापित वाकाटक कारागीरांनी घारापुरी येथील खोदकाम केले आहे हा खुलासा वाकाटक राज्यात काय घडेल त्यासंबंधीचा एका गंभीर आपसमजुतीवर आधारलेला आहे. त्याशिवाय घारापुरी आणि अजिंठा येथील शिल्पशैलीतील भेदाचीही दखल त्यात घेतलेली नाही. उत्तर कोकणात उच्च दर्जाच्या शिल्पिक कलेची सहाशे वर्षांची अखंड परंपरा होती. त्यामुळे घारापुरीचे भव्य शिल्प उभारण्यासाठी कारागीर वाकाटक राज्यातून उत्तर कोकणात येण्याची काहीच गरज नव्हती. घारापुरी येथील विलक्षण देखणी महेशमूर्ती किंवा गंगाधर, अर्धनारी, अंधकमूर्ती नटराज आणि मंदिराचे द्वारपाळ, यांच्याशी तुलना करता येईल असे काहीही अजिंठा येथे नाही. मात्र वेरूळ येथील रामेश्वर गुंफेत (गुंफा क्र. २१)काही वाकाटक प्रभाव पोचलेला जाणवतो. परंतु अजिंठ्याच्या विस्थापित कारागीरांना वेरूळ येथे काम पत्करावे लागले हे त्या प्रभावाचे कारण नव्हे.
अजिंठा
अजिंठा येथील सुप्रसिद्ध पाषाणगुंफमंदिरे, शिल्पे आणि गुंफा क्रमांक १६,१७, १ आणि २ या मधील विलोभनीय भित्तीचित्रे हा सुद्धा महाराष्ट्राचा दख्खन प्रदेशातील घारापुरीच्या आधीच्या काळापासुन वारसा.
ख्रिस्तपूर्व दुसऱ्या आणी पहिल्या शतकातील अनुक्रमे गुंफा क्रमांक १ आणि १० या सर्वांत आधीच्या गुफांपासून तो ख्रिस्तोत्तर ४८५ ते ५०० या काळातील गुंफा क्रमांक १६,१७ आणि १९ या गुंफापर्यन्तच्या अजिंठा येथील पाषाणगुंफा बौद्धपंथीयांच्या आहेत. क्रमांक १,२,आणि २६ च्या गुंफा बहुधा ख्रिस्तोत्तर ५२० ते ५४० या काळातील असाव्या. अजंठ्याच्या गुंफांचा कालानुक्रम हा वादग्रस्त विषय आहे. परंतु सोळा क्रमांकाच्या गुंफेमध्ये आढळणाऱ्या कोरीव लेखाचा योग्य अर्थ लावला तर असे कळते की वाकाटकांचा सचिव वराहदेव याने आपल्या वृद्धावस्थेत या गुंफेसाठी देणगी दिलि होती. ही गुंफा पुरी होण्यासाठी कमीतकमी पंधरा वर्षे तरी लागली असली पाहिजेत. ती पुरी झाल्यावर तिच्यात शिलालेख कोरवून आपल्या देणगीचा उल्लेख वराहदेवाने करवला असावा. पुष्कळदा असे सांगितले जाते की अजिंठा गुंफांतील चित्रकारी बुद्ध भिक्षूने व्यावसायिक चित्रकारांच्या बरोबर एखाद्या गुंफेच्या काही भाग रंगवलाही असेल. परंतु एरवी बहुतेक सगळी चित्रकारी वाकाटक राजांच्या आश्रयाला असलेल्या व्यावसायिक चित्रकार संघटनांमधील कलावंतांची आहे. त्यावेळी राजवाड्यांच्या आणि अन्य इमारतींच्या सजावटीसाठी धर्मनिरपेक्ष आशयाची चित्रे काढली असली पाहिजेत. अजिंठा गुंफांतून रंगवलेल्या बुद्ध-जातक कथाचित्रांतून वाकाटकांच्या दरबारी जीवनाचे - राजवाडे आणि नगरवेशी, मिरवणुका, त्याकाळातील खास पेहेराव केलेले उच्च वर्गातील स्त्री-पुरूष, नर्तक आणि गायक-वादक, शिकारी आणि राजसेवक यांचे दर्शन घडते. या सुंदर चित्रांना नेपथ्य आणि पार्श्वभूमी आहे देखण्या शिल्पित विहारांची. परंतु गेल्या शतकात या चित्राचा शोध लागण्यापूर्वीच काळाचा तडाख्यात त्यांना मोठी हानी पोचली होती. गुंफा जतन करण्यासाठी सद्‌भावाने पण अयोग्य रीतीने केलेले प्रयत्न, गुंफा पाहायला येणाऱ्या पर्यटकांची बेसुमार गर्दी आणि गुंफातील कृत्रिम प्रकाशाचा प्रखरपणा, यांच्यामुळेसुद्धा मागील काळात गुंफांना झळ लागली आहे. आता या सगळ्या गोष्टींत सुधारणा करण्यात येत आहे.
अजिंठ्याच्या चित्राचे, त्यांच्या सिद्धहस्त रेखांकनासाठी नेहमीच मोठे कौतुक केले जाते. परंतु त्यांच्या रूपशीलतेकडे कधीही दुर्लक्ष केले जाता कामा नये. ती साधण्यासाठी निरनिराळे खुबीदार उपाय योजले आहेत. मात्र त्या रंगछटांकन नाही. नाही म्हणायला गुंफा क्रमांक १ आणि २ या दोन उत्तरकालीन गुंफात तेवढा रंगछाटांकनाचा उपयोग केलेला दिसतो.
अजिंठ्यांबद्दल लिहिणाऱ्या अनेक समालोचकांचा एक असा विचित्र समज झालेला दिसतो की या गुंफा अत्यंत अल्प कालावधीत पुऱ्या झाल्या आहेत. परंतु हा समज मुख्यतः चुकीच्या गृहीतामुळे आणि भारतीय कलाकार संघांची कार्यपद्धती ठाऊक नसल्यामुळे झाला आहे. नाशिक येथील बालासिरी गुंफा अजिंठ्याच्या विहारंइतकी मुळीच संपन्न नाही. तथापि तेथे असलेल्या कोरीव लेखातील पुराव्यावरून असे निःसंदिग्धपणे लक्षात येते की ती पुरी होण्यासाठी तब्बल वीस वर्षांचा कालावधी लागला होता. आपण असे धरून चालू की राजाश्रय असलेले अनेकानेक पाथरवट आणि चित्रकार बौद्ध नवकर्मिकांच्या मार्गदर्शनाखाली अजिंठा येथे सातत्याने काम करत होत. तरीसुद्धा गुंफा क्रमांक १६, १७, १, २, आणि २६ यांच्यापैकी प्रत्येक गुंफा पुरी होण्यासाठी किमान पंधरा वर्षे तरी लागली असली पाहिजेत. आणि या सर्व गुंफाचे काम एकाच वेळी सुरू झाले असणे सुतराम संभवनीय नाही. क्र, १७ च्या गुंफेचे काम बहुधा ख्रिस्तोत्तर ४९० मध्ये सुरू झाले असावे; पण तोपर्यन्त सोळा क्रमांकाच्या गुंफेच्या कामाला पाच किंवा त्याहून अधिक वर्षे होऊन गेली होती. ही गुंफा म्हणजे वाकाटक राजा हरिषेण याच्या एका अज्ञात मांडलिकाची देणगी होय. वाकाटकांचा प्रख्यात सचिव वराहदेव याने दिलेल्या पवित्र देणगीचे अनुकरण करण्याची या मांडलिकाची इच्छा होती. आणि या बाबतीत त्याला सचिव वराहदेव आणी राजा हरिषेण या उभयतांकडून उत्तेजन मिळाले. त्या दोघांनी राजाश्रयित कलावंत संघांमधील पाथरवट, शिल्पकार, चित्रकार यांचे सहाय्य नक्कीच दिले असले पाहिजे. १६ क्रमांकाच्या गुंफेतील चित्रांत, शैलीच्या दृष्टीने पुष्कळच साम्य आहे. हे लक्षात येते, या साम्यस्थळांच्या आधारे, वाकाटक काळातील अजिंठा गुंफांचा काळ कोणता हे ठरवताना त्यांची वास्तुकलात्मक आणि शिल्पकलात्मक वैशिष्टयेच तेवढी विचारात घेतली तर आपली फसगत होईल. त्या वैशिष्टयांपेक्षा त्या गुंफांतील चित्रशैलीची वैशिष्टये कालनिश्चितीसाठी अधिक महत्त्वाची आहेत. असे आम्हाला वाटते. सतरा क्रमांकाची गुंफा ख्रिस्तोत्तर ५१० मध्ये पुरी झाली असली पाहिजे. तोपर्यन्त अजिंठ्यापासून सुमारे अकरा मैलांवर असलेल्या घटोत्कच येथे, वराहदेवाच्या अन्य देणगीने एका विहाराच्या उभारणीला सुरूवात झाली होती. त्या विहारात चित्रे मात्र कधीच काढली गेली नाहीत.
या टप्प्यावर महाकवी दण्डीच्या दशकुमारचरित या कथेची साक्ष काढणे युक्त होईल. दशकुमाचरितात ऐतिहासिक घटनांनाच साहित्यकृतीचा संबंध दिला आहे. हे कै. डॉ. मिराशींनी निर्णायकपणे सिद्ध केले आहे. दशकुमारचरिताच्या आम्ही लावलेल्या अन्वयार्थाप्रमाणे निष्कर्ष असा निघतो की ख्रिस्तोत्तर ५१० किंवा त्यानंतर थोड्याच वर्षांनी हरिषेणानंतर राज्यावर आलेला वाकाटक राजा अनाचारी निघाला. वाकाटकांच्या मांडलिकांनी एकत्र होऊन त्याचा पराभव केला; परंतु एका मुत्सद्दी सचिवाने, ( हा सचिव वराहदेवाशिवाय दुसरा कोण असू शकतो?), त्याच्या वृद्धपणी, पराभूत वाकाटक राजाच्या पुत्राला ख्रिस्तोत्तर ५२० मध्ये त्याचे गतवैभव परत मिळवून दिले. त्यानंतर क्रमांक १ आणि २ या विशाल बौद्ध गुंफा खोदण्यात आणी आकर्षकपणे चित्रांकित करण्यात आल्या. हे काम केले होते राजाश्रयित वाकाटक कारागीरांच्या संघांनी. कारण वाकाटक राजसत्तेच्या पुनःप्रतिष्ठापनेमुळे बौद्धविहारंच्या देणगीदारांना हे कारागीर पुन्हा एकदा उपलब्ध झाले होते. पण हे कारागीर म्हणजे १६ आणि १७ क्रमांकांच्या गुफांचे कारागीर नव्हेत. त्यांचे वारस किंवा शिष्य असले पाहिजेत. कारण १६ आणि १७ क्रमांकांच्या गुंफा आणि १ आणि २ क्रमांकाच्या गुंफा यांच्यातील मांडणी, आकृती-रेखाटन पशुपक्षी, वास्तुस्थिती अशा कलेच्या प्रत्येक पैलूत एका पिढीचे अंतर आहे, असे जाणवते. मात्र १ आणि २ क्रमांकाच्या गुंफा उभारणारे कलावंत हे १६ आणि १७ क्रमांकाच्या गुंफा उभारणाऱ्या कलावंताच्या संघामधलेच आहेत. त्यांनी चित्रकारीमध्ये, छटांकन, विशिष्ट शैलीबद्धता अधिक रूपशीलता साधण्यासाठी काळ्या केशसंभाराच्या पार्श्वभूमीवर चेहेरा रेखाटण्याची पद्धत या काही नवीन कल्पना आणल्या.
दण्डीच्या दशकुमारचरिता खऱ्या नावांचे जरी गोपन केले असले तरी वाकाटकांचा इतिहास हाच त्याचा गाभा आहे, हे उघड आहे. वाकाटकांचे आधिपत्य लयाला गेल्यावर दीडशे वर्षे हा दण्डीचा काळ आहे. त्याकाळी ऐतिहासिक घटना सर्वविदित असल्या पाहिजेत; आणि फारशा जुनाट न झालेल्या परंपरेने त्यांचे तथातथ्य (आणि विश्वासार्ह) संक्रमणा झाले असले पाहिजे. अजंठा-घटोत्कच प्रकल्पातील कित्येक वैशिष्टये दण्डीच्या तपशीलाला पूरक आहेत. योग्य अन्वयार्थ लावलेले दशकुमारचरित आणि पुढील परिस्थितीजन्य पुरावा यांची सांगड घालता येते:
(अ) अपुऱ्याच राहिलेल्या आणि चित्रांकित नसलेल्या घटोत्कचयेथील विहाराचे खोदकाम निःसंशय, १६ क्रमांकाच्या गुंफा-उभारणीच्या कामाची चांगली प्रगती झाल्यानंतरच सुरू झाले असले पाहिजे.
(आ) घटोत्कच गुंफा आणि नंतरच्या काळातील १ क्रमांकाची गुंफा यातील वास्तुशास्त्रीय साम्य आणि घटोत्कच-गुंफा या दोन्हीतील कोरीव लेख.
(इ) अजिंठा येथील १६ व १७ क्रमांकाच्या गुंफा.
(ई) १६ आणि १७ क्रमांकंच्या तुलेनेने १ आणि २ क्रमांकांच्या गुंफातील चित्रांत आढळणारे तपशीलवार चित्र रेखाटण्याचे तंत्र.
प्रस्तुत पुराव्याची सांगड दशकुमारचरिताशी घातली तर पुढील निष्कर्ष निघतात:-
१) वाशिम शाखेच्या श्रेष्ठ वाकाटक राजाची-हरिषेणाची-कारकीर्द ख्रिस्तोत्तर ४७५ ते ५१० अशी होती असे अनेक अभ्यासक योगयपणे मानतात, आणि हे मत आम्हालाही स्वीकारणीय वाटते. राजा हरिषेणाचा वराहदेव नावाचा मुख्य सचिव होता. वराहदेवाने काही काळ हरिषेणाच्या पित्याच्या-देवसेनाच्या-पदरी चाकरी केली होती असे दिसते. वराहदेवाचे वडील हस्तीभोज हे देवसेनाचे सचिव होते.
२) अजिंठा येथील १६ क्रमांकाच्या गुंफेतील वराहदेवाच्या कोरीव लेखाचा यथायोग्य अन्वयार्थ लावला तर असे समजते की बुद्धाबद्दलच्या एकनिष्ठ भक्तिभावामुळे, आपल्या परिपक्व वृद्धपणी, वराहदेवाने १६ क्रमांकाच्या गुंफा-विहारला देणगी दिली होती. या गुंफा-विहाराच्या कामाचा आरंभ ख्रिस्तोत्तर ४८०-४८५ पूर्वी झाला असणे असे शक्य नाही; तशीच त्यांची समाप्तीही ख्रिस्तोत्तर ४९५-५०० पूर्वी झाली नसावी.
३) क्रमांकाच्या गुंफेचे काम करणारे वास्तुशास्त्रज्ञ, शिल्पकार, चित्रकार यांचे संघ वाकाटक राजांच्या प्रत्यक्ष सेवेतील होते किंवा राजाश्रयित होते आणि त्यामुळे वराहदेवाला गुंफाकामासाठी सहज उपलब्ध होणारे होते. त्या अगोदर या कारागीर संघांनी वाकाटकांचे राजवाडे, दरबार दालने, इतर इमारती आणि त्यातील भित्तीचित्रे यांचे पुष्कळ काम केले होते. यात संशय नाही. १६ आणि १६ क्रमांकांच्या गुंफांतील चित्रांवरून हे सहज स्पष्ट होते. अजिंठ्याची चित्रे भिक्षू-चित्रकारांनी काढली आहेत. या मताचा गंभीरपणे विचार करण्याचे मुळीच कारण नाही. कदाचित, अगदी मोजक्या काही वेळा, चित्रकारी अवगत असलेल्या एखाद्या भिक्षूने, व्यावसायिक चित्रकारांच्या संगतीने, क्वचित काही आकृती चितारल्याही असतील. असा एक भिक्षू-चित्रकार गांधार देशाहून आला असणेही संभवनीय आहे.
४) १६ क्रमांकाची विहार-गुंफा ज्यावेळी खोदली जात होती, शिल्पित आणि चित्रांकित होत होती, त्याच वेळी सचिव वराहदेवाच्या सदाचाराचे अनुकरण करण्याच्या इच्छेने हरिषेणाच्या संपूर्ण सहकार्याने, कोण्या बुद्ध भिक्षूवर्गासाठी १७ क्रमांकाच्या गुंफा-विहाराची खोदाई आणि सजावट सुरू केली असावी, असे दिसते. परिणामी या मांडलिकाला वाकाटकांच्या वास्तुशास्त्रज्ञाच्या, शिल्पकारांच्या आणि चित्रकारांच्या संघाचे कसब गुंफा कामासाठी लाभले. या संघामध्ये कारागीर मोठ्या संख्येने असले पाहिजेत, आणि १६ क्रमांकाच्या विहार-गुंफेच्या कामात त्यांपैकी सगळेच्या सगळे कारागीर गुंतून पडलेले नसावे. १७ क्रमांकाच्या गुंफाविहारातील कोरीव लेखांमध्ये त्या मांडलिकाचे नाव सापडलेले नाही.
५) १६ आणि १७ क्रमांकाच्या गुंफा बांधल्या आणि सजवल्या जात असतानाच, वराहदेवाने आपल्या उत्कट श्रद्धेने अजिंठ्याच्या ठिकाणापासून अकरा मैल अंतरावर घटोत्कच येथे देणगीने आणखी एका विहार-गुंफेच्या उभारणीला सुरूवात केली. ही विहार-गुंफा जरी अपुरीच आणि चित्रविरहितच राहिली असली तरी वाकाटक काळातील अजिंठा गुंफांचा अचूक कालानुक्रम ठरवण्यासाठी आणि दण्डीचा वृतान्त पडताळून पाहण्यासाठी, ती अत्यंत महत्वाची आहे. घटोत्कच येथील विहार-गुंफा सदाची अपुरीच आणि अचित्रांकितच राहिली याचे कारण आपल्याला दण्डीच्या वृतान्तावरून समजू शकते. श्रेष्ठ वाकाटक राजा हरिषेण याच्या मृत्यूनंतर राज्यावर आलेला त्याचा वारसदार दुबळा आणि चारित्रशून्य होता. अनाचारी वर्तनामुळे आणि पित्याच्या शहाण्या, वृद्ध, विश्वासू सल्लागारांचा सल्ला न मानल्यामुळे विश्वासघातकी मांडालिकांनी त्याला सिंहासनावरून पदच्युत केले.
वाकाटक-इतिहासातील या दुर्दैवी घटनेमुळेच घटोत्कच येथील गुंफा काम स्थगित झाले यात संशय नाही. वाकाटकांचे राज्य उलधून पडण्याचा हा प्रकार १६ आणि १७ क्रमांकांच्या विहारांचे काम पुरे झाल्यानंतर, ख्रिस्तोत्तर ५१० मध्ये, घडूनआला असावा. खिर्स्तोत्तर ४८५ किंवा ४९० मध्ये १६ क्रमांकाच्य विहार-गुंफेचे कामसुरू झाल्यानंतर सुमारे पाच वर्षांनी १७ क्रमांकाच्या विहार-गुंफेच्या कामाला प्रारंभ झाला असे मानले तर १७ क्रमांकाची विहार-गुंफा लौकरात लौकर म्हणजे ख्रिस्तोत्तर ५०५ किंवा ५१० मध्येच पुरी होणे शक्य आहे. कारण वाकाटक कारागीर-संघामधल्या कारागिरांचे भरपूर संख्येने सहाय्य असले तरी सुद्धा यापैकी कोणतीही गुंफा प्रत्येकी पंधरा वर्षापेक्षा कमी कालावधीत पुरी होणे शक्य नाही. भारतीय कारागीर, अगदी आजच्या काळात सुद्धा, किती धीम्या गतीने काम करतात याची कल्पना नसणाऱ्या पाश्चात्यांना या कारागीरांची प्रवृत्ती समजू शकत नाही. त्यामुळे, बाघ, अजिंठा आणि घटोत्कच इत्यादी ठिकाणी असणाऱ्या विहार-गुंफा अशक्यप्राय अल्प कालावधीत उभारण्यात आल्या असे मानताना आपली फार मोठी चूक होते आहे. हे त्या पाश्चात्यांच्या लक्षात येत नाही.
६) दण्डीच्या वृतान्तावरून आपल्याला समजते की वाशीम शाखेच्या वाकाटकांच्या अंमलात मधेच खंड पडला. परंतु एका वृद्ध सल्लागाराने आपल्या दुर्दम्य आत्मबळाने अन्य राजांच्या साहाय्याने अखेर वाकाटकांचे गमावलेले वैभव पुन्हा प्रस्थापित करण्यात यश मिळविले. (हा सल्लागार वराहदेव हाच असणार.) १६,१७, १ आणि २ या सर्व वाकाटक गुंफा सुमारे पंधरा वर्षात, साधारणतः ख्रिस्तोत्तर ४८५ मध्ये पुऱ्या झाल्या, असे प्रतिपादन करणारी विविध अभ्यासकांची मते दण्डीच्या कथनामुळे खोडली जातात. हरिषेणाच्या कारकीर्दीचे आरंभवर्ष ख्रिस्तोत्तर ४७५ पेक्षा मागे सरकवणे, अप्रयोजक होय.
७) ख्रिस्तोत्तर ५१० च्या सुमारास जरी वाकाटक आधिपत्यात खंड पडून त्यामुळे वराहदेवाच्या त्याचा आश्रयाखाली असलेल्या घटोत्कच विहाराचे काम स्थगित झाले असले तरी त्याचा अर्थ असा नव्हे की कारागिरांचे संघ तडकाफडकी विस्कळित व कार्यशून्य झाले. या खंड काळात अन्य राजांचा अंमल वाकाटक प्रभावक्षेत्रावर असताना हे कारागीर संघ विविध बांधकाम-योजनांवर कामाला असले पाहिजेत. कदाचित ही लाकडी बांधकामे असून आता त्यांचे अस्तित्व मागे राहिले नसावे. १६ आणि १७ क्रमांकाच्या गुंफातील कामावर अखेरचा हात फिरवण्यातही ते गुंतून पडले असण्याची शक्यता आहे. परंतु वराहदेवाच्या घटोत्कच गुहेचे काम त्यांनी पुष्कळ प्रमाणात सोडून दिले असावे.
८) वाकाटक राज्य बळकावून घेणाऱ्यांच्या सुमारे दहा वर्षाच्या अंमलानंतर जेव्हा ख्रिस्तोत्तर ५२० मध्ये वाकाटक राजघराण्याचे गतवैभव