marathi calendar marathi dinadarshika

चला मित्रांना बोलावुया महाराष्ट्राच्या विलोभनीय सफरीवर..

Travel Maharashtra State - Join MarathiMati.com

HOME | ABOUT | CONTACT | FEEDBACK | SITE MAP | HELP CENTER   

Marathi eMail - Send eMail in Marathi Language Marathi Greetings - Send Marathi Greeting Card For Free AksharMancha - Open Stage For Marathi Poet Writer Artist Bhagyavedh - Astrology in Marathi Marathi Websites & Useful Links, Directory of Marathi Websites Maharashtra Art - Art (Kala) of Maharashtra State MarathiMatitale Kohinoor - the Legends of Maharashtra State
Marathi Lekh - Marathi Articles Marathi Dinadarshika Marathi Calendar Maharashtra State Resource - Travel, Culture, Art, Letrature and more... Shatayushi - 100 Years of Fitness Marathi Tarun - Maharashtra Youth Guide Marathi Sahitya - Marathi Language Literature Aapali Marathi - All about Marathi Language
Samwad - World of Words Maharashtra, Marathi Related News & Events in Marathi Language Mazha Balmitra - Special Section for Marathi Kids Karamnuk - Entertainment Section for Marathi Film Marathi Drama Marathi Jokes Marathi Vinod Maharashtra Travels - Maharashtra State Travel Information Marathi Culture - Maharashtra State Culture Information Marathiche Mandand - Legends of Marathi Language
MarathiMati - Home

मराठीमाती डॉट कॉम / महाराष्ट्र राज्य संदर्भ कोष

BACK | MAHARASHTRA HOME

Maharashtra State Information about Travel, Literature, Culture, Art, Sports

Print this page Print this Information | Send to your friends Send to Friends

 

पाषाणगुहातील देवळेप्राचीन बांधकामेमध्ययुगीन स्मारक

मध्ययुगीन स्मारके - शंकर मेनन

पर्वताच्या उंचच रांगा आणि खोल दऱ्या पाहिल्या की कोणाचीही छाती दडपून जाते. दार्जिलिंग येथे टायगर हिलवर सूर्योदयाच्या वेळी हिमालयाच्या उंच उंच शिखरांवरून मेघ विरत जाऊन दऱ्याखोरी व समोरच्या पर्वतराजी दिसू लागतात तेव्हा पर्यटकाच्या तोंडातून विस्मयामुळे शब्द फुटत नाही, हातातल्या चहाचा कप तसाच रहातो. निसर्गदृश्ये रंगविणारा चिनी चित्रकार असे दृश्य पाहिल्यावर निसर्गापुढे आपण किती क्षुद्र आहोत या विचाराने अंतर्मुख होतो. परंतु, याउलट, मराठा वीरांनी अशाच दऱ्याखोऱ्यांना आणि पहाडांन आपणापुढे नमविले. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांचा आणि पठरांचा उपयोग तटबंदी आणि किल्ले बांधण्यासाठी करून मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून आलेल्या आक्रमाकाना थोपवून हिंदुपद पातशाहीच्या स्थापनेसाठी आपल्या छातीचे कोट केले.
आज महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाच्या मध्ययुगीन इतिहासाने छत्रपती शिवाजीच्या वैभव काळात गड-लिल्ल्यांच्या वास्तुशिल्पकलेचे व बांधकामांचे गौरवास्पद ननुने पाहिले. तथापि स्न १६४६ मध्ये, आपल्या वयाच्य अवघ्या १६ व्या वर्षी आपल्या नावाची मुद्रा करूनआपली सत्ता प्रस्थापित करण्यास शिवाजीने प्रारंभ केला तेव्हापासून इ. स. १६८० मध्ये त्यांचे निधन झाले तोपर्यंतच्या कालखंडात त्याने अनेक किल्ले बांधले हे खरे असले तरी त्याआधीपासून देखील महाराष्ट्राच्या किनारी प्रदेशात व पश्चिमेकडील पठारी प्रदेशात किल्ल्यांचे फार मोठे जाळे होते अशी इतिहासाची साक्ष आहे. किल्ल्यांसारख्या वास्तूंचे बांधकाम करता येण्याजोगा भूप्रदेश निसर्गानेच निर्माण केला होता. फार फार पुरातन काळी डोंगराची खोरी भरून जाऊन पठारी व मैदानी प्रदेश निर्माण झाला होता. तदनंतरच्या हजारो वर्षात ऊन-पावसाचा मारा खाऊन त्यातील ठिसूळ खडक घळत गेले तरी कठिण भाग कायम राहिला आणी महाराष्ट्राच्या भूप्रदेशाला विचित्र असे उंचसखल रूप प्राप्त झाले. सध्या जेथे मुंबई आहे तेथेपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत समुद्रकिनाऱ्यापासून फार दूर नाही अशा सह्याद्रीच्या रांगा तयार झाल्या आणि किल्ले बांधण्याचा दृष्टीने उत्कृष्ट परिस्थिती निर्माण झाली. भारताच्या द्वीपल्पीय प्रदेशावर सत्ता गाजविणाऱ्या अधिपतीनी तिचे मर्म ओळखून या भौगोलिक वैविध्याच पुरेपूर उपयोग करून घेतला. या खडकाळ प्रदेशापासून नजिकच असलेल्या समुद्राकडे खाड्यांच्या किंवा नद्यांच्या मुखांशी किल्ले बांधून सभोवारच्या प्रदेशातून जाणाऱ्या नजर ठेवणे किंवा त्यांच्या हालचालींन रोखणे शक्य झाले.
महाराष्ट्राच्या ह्या दोंगरी प्रदेशात मोठमोठ्या शिलाखंडांवर किनाऱ्यालगतच्या प्रदेशात, इतकेच नव्हे तर खुद्द समुद्रातही प्राचीन काळापासून बांधलेले ३५० हून अधिक किल्ले आहेत. कान्हेरी, अलिबाग, रेवदांडा, जंजिरा, बाणकोट, जयगड, रत्नागिरी, देवगड आणि सुवर्णदुर्ग ही त्यांची काही उदाहरणे. हे बहुतेक सर्व किल्ले शिवाजी राजांनी बांधले अशी सर्वसामान्यांची समजूत असली तरी तशी वस्तुधिती नाही ए वर सांगितलेच आहे. दुर्ग या संस्कृत शब्दाचा अर्थ आहे `जाण्यास कठिण जागा' आणि किल्ला हा शब्द त्याच्या समानार्थी वापरला जातो. सह्य पर्वतराजीमधील दुर्गम ठिकाणावरून किल्ले बांधण्याची कल्पना सुचली असावी. वेदांमध्ये देखील दुर्गांचा उल्लेख आढळतो आणि वास्तुशिल्पाशास्त्रावरील शिल्पशास्त्र या प्राचीन ग्रंथात स्वसंरक्षणासाठी म्हणून कश्यपांनी विकासित केलेल्या मूळ कलेचे, तटबंदी, खंदक, चर आणि संरक्षणाच्या अन्य पद्धतींनी युक्त सामुदायिक संरक्षणाच्या अन्य पद्धतीनी युक्त सामुदायिक संरक्षणाच्या कलेत कसे रुपांतर झाले त्याचे वर्णन केलेले आहे.
शिवाजीचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला तो ख्रि. पू. तिसऱ्या शतकात बौद्धांच्या ताब्यात असावा. त्या किल्ल्यातील भिंतीव्रील कोरीव लेख आणि तळी यावरून असा तर्क करता येतो. शिवाई देवीच्या मंदिराचे तळघर एका बौद्ध गुंफेच्या माथ्यावर आहे. काही शतकांनी बौद्धधर्मविरोधी जनमत तयार होऊन श्रीमत्‌ शंकराचार्याचा ब्राह्मणी संप्रदायाचे महत्त्व या भागात वाढले असावे असे त्या काळातल्या वास्तुशिल्पांवरून वाटते. रेडी येथील किल्ल्यातील गणपतीची मूर्ती, तसेच त्या किल्ल्याच्या तळघरात सापडलेले मूर्तीचे भग्नावशेष, यावरून तो किल्ला ब्राह्मणी संप्रदायाच्या एकाद्या अधिपतीच्या स्वामित्वाखाली असावा असे दिसते. महाराष्ट्रातील किनारी व पठारी प्रदेशात आढळणारे अनेक किल्ले कलचुरी, आंध्रभृत्य शिलाहार आणि यादव राजवंशांतील हिंदू राजांनी बांधलेले असावेत; तर पन्हाळा व सातारा येथील किल्ले शिलाहार राजवंशातील राजा दुसरा भोज याने बांधलेले असावेत. पुढे अकराव्या ते तेराव्या शतकापर्यन्तच्या दोनशे वर्षात दख्खनमध्ये इस्लामि सत्ता आल्यावर ह्या किल्ल्यांच्या आवारात खास शैलीची बांधकामे करण्यास सुरुवात झाली. त्यामुळेच त्यांच्या बांधकामात व प्रांगणांच्या स्वरूपात मुसलमानी छाप स्पष्ट दिसते. शिवाजीने हे किल्ले जिंकून त्यांची डागडुजी व सुधारणा करून आपल्या कल्पनेप्रमाणे त्यांना नवे रूप दिले; रायगड, पुरंदर, सिंहगड, विजयदुर्ग, यासारखे किल्ले त्याची साक्ष देतात. मालवणचा सिंधदुर्ग आणि सज्जिलकोट यासारखे किल्ले त्याने स्वतः बांधले.
महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास पाहू गेले तर त्यापैकी बरेच शिवाजी राजांच्या उदयापूर्वी अस्तित्वात असले तरी त्या महान योद्ध्याने आपल्या राज्यस्थापनेच्या प्रयत्नात त्यांचा पूर्ण उपयोग करून घेतला. त्याच्या यशामधील या किल्ल्यांन वाटाही महत्त्वाचा होता. स्वराज्या स्थापनेच्या प्रयत्नात शिवाजीच्या मावळ्याना हे किल्ले त्यांच्या गनिमी काव्याच्या लढ्यात शत्रूवर हल्ला चढविण्याकरता, लपून छपून बसण्याकरता आणि प्रसंगी शत्रूवर चढाई करण्यासाठी चांगले उपयोगी पडले. शिवाजीचे रणकौशल्य हा भारतीय सैनिकी इतिहासात एक आख्यायिकांचा आणि प्रसंगी शत्रूवर चढाई करण्यासाठी चांगले उपयोगी पडले. शिवाजीचे रणकौशल्य हा भारतीय सैनिकी इतिहासात एक आख्यायिकांचा आणि दंतकथांचा विषय बनला आहे. तोरणा, रायगड, प्रतापगड, रांगण, पुरंदर आणि सिंहगड हे किल्ले तर, पुढे पेशव्यांच्या काळात लढायांचे क्षेत्र किल्ल्यांकडून व डोंगरी मुलखाकडून मैदानी प्रदेशाकडे सरकले, तोपर्यंत उपयोगी पडत असत.
भु-प्रदेशाच्या वैशिष्टयांन धरून हे बहुतेक किल्ले मुख्य लष्करी वाहतूक मार्गावर बांधलेले आढळतात. उदाहरणार्थ, मनमाड ते अहमदनगर मार्गावरील अंकाई-तंकाई, थळ खिंडीवर नजर ठेवण्यासाठी बलवंतगड, नाना खिंडीजवळील जीवधन, चंदर आणि हडसळ किल्ले, कोकणच्या दुर्गम प्रदेशावर लक्ष ठेवणे सोपे जाण्यासाठी बांधलेला किल्ले रत्नागिरी, साताऱ्याजवळील अजमगड आणि पुण्याजवळील पुरंदर हे किल्ले असेच जवळपासच्या वाहतूक मार्गावर नजर ठेवण्यासाठी बांधले गेले असावेत.
मराठी इतिहासाच्या प्रारंभीच्या काळात जे सुमारे ३५० किल्ले अस्तित्वात होते त्यांची वर्गवारी स्थूल मानाने तीन प्रकारात करता येते. ती अशीः विरीदुर्ग (डोंगरी किल्ले) जलदुर्ग आणि भूईकोट, याखेरीज निवासस्थानांभोवती तटबंदी असणाऱ्या ठिकठिकाणच्या गढ्या.
गिरीदुर्ग
सह्य पर्वताच्या रांगांमध्ये जेथे शिखरावर पुरेसा सपाट प्रदेश आढळला तेथे नैसर्गिक भू-रचनेचा शक्य तितक्या चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊन हे गड-किल्ले बांधण्यात आलेले आहेत चढण्यास कठिण असे कडे सर्व बाजूंनी असल्याकारणाने फार कडेकोट तटबंदी करण्याची गरज नसे. सिंहगड, पुरंदर, सातारा, पन्हाळ आणि इतर बरेच किल्ले असे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहेत. दुरून बघायला ते फार भव्य व प्रेक्षणीय दिसतात आणि त्यांच्या बांधणीत वास्तुशिल्पीय कौशल्यही आढळते. उदा. सध्या जेथे पि. डब्ल्यु. डी. खात्याचे विश्रामगृह आहे तो पन्हाळ किल्ला डोंगराच्या पायथ्याशी उभे राहून बघितला तर डोंगरच्य कडेवर बांधलेला एक साधा किल्ला वाटतो, परंतु वर जाऊन पाहिले की तीन दरवाजांच्या कमानी, कोठाराचा दर्शनी भाग आणि चर दरवाजाचे विविध भाग यावर कोरलेली शोभिवंतकलाकुसर स्पष्ट दिसते. त्याच्या प्रचंड भिंती, स्नानासाठी बांधण्यात येणाऱ्या घाटांच्या स्वरूपातील तेथील तळी, दीपमाळांसह असणारी मंदिरे ही वास्तुशिल्पीय वैविध्याची व परिपूर्णतेची साक्ष देतात.
अधिक संरक्षणासाठी म्हणून बऱ्याचदा एका मागे एक भिंतीच्या रांगा बांधीत. उदाहरणार्थ, पन्हाळा किल्ल्यांवर अशा जाड व भक्कम भिंतीच्या तीन रांगा आहेत. चांदण्या रात्री तारे दिसत असताना, नीरव शांततेत, बाहेरच्या व्हरांड्यात गस्त घालणाऱ्या चौकीदाराच्या घुंगरे लावलेल्या काठीच खुळखुळ आवाज ऐकला की त्या मराठेकालीन लढायांच्या प्रतिध्वनी तर नव्हे असा भास होत राहतो. या किल्ल्यांना पाण्याची सोय त्यामध्ये बांधलेल्या तळ्यांमुळे होत असे.
जलदुर्ग
जलदुर्ग स्थानिक भाषेत जंजिरा म्हणतात. जंझिराह या अरबी शब्दाचे ते अपभ्रष्ट रूप आहे. हे किल्ले बऱ्याचदा मुख्य भूमील जवळ असणाऱ्या बेटावर बांधण्यात येत. अशा किल्ल्यांमुळे समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूची टेहेळणी करणे शक्य होत असे आणि शिवाय वेळप्रसंगी किल्ल्यातील लोकांना मुख्य भूमीवर पळून जाणे शक्य होई. इतर जलदुर्ग जवळपास खाडी किंवा नदी असलेल्या खडकाळ समुद्रकिनाऱ्यावर बांधले जात. बाणकोट, गोपाळगड, जयगड, देवगड, रत्नागिरी, विजयदुर्ग आणि अलिबाग हे किल्ले पहिल्या प्रकारात तर वराई तालुक्यातील अर्नाळा, रायगड जिल्ह्यातील जंजिरा आणि मालवण येथील सिंधदुर्ग हे दुसऱ्या प्रकारात.
कोकण किनाऱ्यावरील या सर्व किल्ल्यांवरून एका बाजूला फार मोठे सागरी क्षेत्र नजरेच्या टप्प्यात येते तर दुसऱ्या बाजूला फार मोठ्या पठारी प्रदेशावर नजर ठेवणे शक्य होते. खाडीच्या किंवा नदीच्या मुखाशी असल्याने ते सागरी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यास उपयोगी पडत; तसेच खाडीतून किंवा नदीमुखापासून अंतर्गत प्रदेशाकडे जलमार्गे जाणाऱ्या शत्रूला तोफा डागून रोखणे शक्य होत असे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे किल्ल्याच्य तटबंदीच्य आतही मोठाने चर किंवा खंदकही खणलेले असल्याचे आढळून येते. विजयदुर्ग आणी रेडी येथील किल्ल्यांच्या आवारात भक्कम खडक फोडून तयार करण्यात आलेल्या खंदकामुळे शत्रूला किल्ल्याच्या सर्वात आत असणाऱ्या अशा महत्त्वाच्या बालेकिल्ल्यापर्यंत पोहोचणे सहज शक्य होत नसे. तसेच किल्ल्याच्या आत असणारे वाडे, महाल, मंदिरे आणि इतर वस्ती यांचेही संरक्षण होत असे.
दुसऱ्या प्रकारातील बेटांवर उभे केलेले जलदुर्ग समुद्र किनाऱ्यापासून काही थोड्या अंतरावर बांधले जात. त्यामुळे ओहोटीच्या वेळी मुख्य भूमीपासून किल्ल्यावर चालत जाता येत असे. अशा प्रकारे हे किल्ले गावचाच भाग असे वाटण्याइतके जवळ असल्यामुळे तेथून सभोवतालच्या भूप्रदेश नजरेच्या टप्प्यात येत असे. तसेच शत्रूच्या हालचालीवर लक्ष ठेवता येत असे. शिवाय शत्रूची जहाजे तोफांच्य माऱ्याच्या टप्प्यात येईपर्यंत त्यांचे अस्तित्व शत्रूच्या लक्षात येत नसे. समुद्रसपाटीवर असल्याने किल्ल्यातील लोकासाठी तो सोयीचे असत. शिद्दीच्या ताब्यातील जंजिर काबीज करण्यासाठी केलेल्या चढाईत शिवाजील अशा किल्ल्यांचे महत्त्व लक्षात आले. म्हणून त्याने मालवण नजीक सिंधदुर्ग बांधला. मागाहून त्याच्याच जवळ सर्जेकोट बांधून त्या किल्ल्यास अधिक संरक्षण दिएल. जंजिरा व अर्नाळा किल्ल्यांचा उपयोग शिवाजी महाराजांच्या अस्तानंतर चांच्यानी आपले अनिष्ट उद्योग चालवण्यासाठी सुरक्षित ठिकाणे म्हणून केलेला आढळतो.
भुईकोट
भुईकोट बांधण्यासाठी उंचवट्याची जागा निवडण्यात येई आणि हे किल्ले मुख्यत्वे निवासस्थाने म्हणूनच बांधले जात. गावातून वा गावाजवळून जाणाऱ्या नदीच्या काठावर ते बांधलेले आढळतात त्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीला नदीकाठाची नैसर्गिक शोभा प्राप्त होत असे आणि पाण्याची सोयही होई. संरक्षणाच्या दृष्टीने नद्यांची किनारपट्टी कृत्रिमरीत्या मजबूत करावी लागे आणि ही गरज या भुईकोटांच्या भिंतीत मधून मधून बांधलेल्या बुरुजानी भागत असे. शत्रू दिसलाच तर या तटबंदीत ठेवलेल्या माऱ्याच्या जागातून शत्रूवर तोफा डागता येत. तशीच वेळ आली तर पसार होण्यासाठी किल्ल्यत भूपृष्ठाखालून बांधलेले गुप्त भुयारी मार्गही असत.
नैसर्गिक तटबंदी किंवा अडथळे नसणाऱ्या भुईकोटांच्या बाबतीत सभोवार मोठा चर खणून जवळपासचा झरा, तळे किंवा नदी यांमधून पाणी घेऊन तो भरून काढीत. बांद्याचा किल्ला हे या प्रकारच्या भुईकोटाचे उत्तम उदाहरण आहे. दुर्दैवाने वास्तुशिल्पशास्त्र दृष्टया महत्त्वाचे असे या किल्ल्यातील एकही बांधकाम आज आस्तित्वात नाही. फक्त विजापूरच्या सुलतानांच्या वंशातील लोकांच्या काही कबरी आहेत. सिंधदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचा किल्ला हे भुईकोटाचे आणखी एक अप्रतिम उदाहरण. त्याच्या मुख्य बांधकामा भोवताली असणारा खंदक १५० फूट रूंद आणि १००-२०० फूट खोल असून त्यामध्ये जवळच्या मोतीतलावातील पाणी सोडण्यात येई.
याउलट, सोलापूरच्या किल्ल्याला नदीचा फायदा मिळालेला नाही, त्याची वास्तुशिल्पात्मक वैशिष्टये मात्र इतर भुईकोटांसारखीच आहे. नैसर्गिक उंचसखलपणानुसार किल्ल्याच्या भिंती ३० ते ७० फूट उंच आहेत.
रेडी आणि विजयदुर्ग किल्ल्यांच्या भिंती ६०-८० फूट उंचीच्य आहेत. भिंतीची जाडी सुमारे १५ फूट आहे. अशा भक्कम भिंतीमुळे शत्रुला आतील शिबंदीवर एकदम व प्रत्यक्ष हल्ला करणे शक्य होत नसे हे तर खरेच, परंतु भिंतीच्या जाडीमुळे मारा करण्यासाठी तोफ बसविण्यासाठी भक्कम पाया मिळत असे.
मोठ्यामोठ्या भक्कम दगडांचा वापर करून बांधकामाच्या खर्चात बचत करण्यात येई. विटा व चुन्याचे काम आवश्यक तेथे करण्यात येई. बाहेरचा भाग सामान्यतः ३फुट जाडीचा व गच्चीच्या कडेला बांधण्यात येणाऱ्या ठेंगण्या भिंतीसारखा असे. त्यामुळे ऐन लढाईतही पहाऱ्यावरील संत्री व शिपाई यांना संरक्षण मिळत असे. मात्र पन्हाळा किल्ल्याच्या बाबतीत अशी संरक्षणात्मक तटबंदी आढळत नाही. हे आश्चर्य आहे.
अशा जाड भिंतीचा उपयोग आतल्या बाजूला कोठे कमी जाडी ठेवून हत्ती व घोडे बांधण्यासाठी, गुप्त खजिना ठेवण्यासाठी, गुप्त जागा तयार करण्यासाठी किंवा लपण्यासाठी जागा करण्यासाठी केला जाई. तसेच त्यांच्यामधून गुप्त मार्गाने जाण्यासाठी भुयारेही काढण्यात येत.
सुमारे ३० ते ५० फूट व्यासाचे अर्धवर्तुळाकार बुरुज या तटाला अधून मधून बांधलेले असत. त्यांच्यामुळे सर्व बाजूंना टेहेळणी, मारगिरी आणि हल्ला करता येई. बुरुजाच्या प्रत्येक दाराला पाच झरोके असत. आणि बुरुजांवर भारी तोफा चढविण्यात एत. हे बुरुज भिंतीच्या इतर भागापेक्षा मजबूत असण्याची गरज असल्याने तेथे भूमीगत खडकांच पायासारखा उपयोग करून त्यावर बांधण्यात येत. मालवण येथील किल्ल्याच्या बुरुजांच्या बाबतीत ही गोष्ट विशेषत्वाने आढळून येते. तेथील बुरुज एकमेकाशी अशा नागमोडी रचनेने जोडलेले आहेत की किल्ल्याचा मुख्य दरवाजा नक्की कोठे आहे ते सहजासहजी लक्षात येत नाही.
या किल्ल्यांचे आणखी एक वैशिष्टय असे की, त्यांच्य तटाच्या कडेने ठेंगणी व ५-६ फूट जाडीची भिंत बांधलेली असून मधूनमधून २ते४ झरोके ठेवलेले असत. ते अशा प्रकारे आतून जोडलेले अस्त की भिंतीच्या आड लपून एक सैनिक एकाच वेळी मारगिरी करू शकत असे. याउलट काही काही वेळा ३-४ झरोक्याना बाहेरच्या एकच तोंड असे. त्याचा उपयोग ३-४सैनिकांना एकाच ठिकाणाहून मारगिरी करण्यासाठी होई.
या किल्ल्यांच्या वास्तुशिल्पकलेचे महत्त्वाचे अंग म्हणजे त्यांचे प्रवेशद्वार. भक्कम भिंतीच्या रांगांच्या दोन्ही बाजूंन जाण्यायेण्यासाठी द्वारे ठेवलेली असत. विजयदुर्ग किल्ल्याला अशी तीनद्वारे आहेत. रेडीला पाच तर सिंधुदुर्गासारख्या पश्चिम किनारपट्टीवरील बऱ्याच किल्ल्यांना एकच प्रवेशद्वार आहे. दोन शक्य तितक्या उंचीवर आणि बाहेरच्या बाजूने अजिबात दृष्टीला न पडणारे असे. बुरुजामधील मारगिरीच्या झरोक्यांतून मुख्य प्रवेशद्वाराकडे येणार मारग स्पष्ट दिसावा अशा प्रकारे त्यांची रचना रुंदीचा असे. प्रवेशद्वाराचे दोन्ही दरवाजे, (फळ्या,) भक्कम धातूचे असून त्यावर अणकुचीदार खिळे ठोकलेले असत ही द्वारे फोडण्यासाठी धडका मारण्याकरिता वापरल्या जाणऱ्या हत्तीनीही तसे करण्यास धजू नये या हेतूने व्यवस्था होती.
या बांधकामामध्ये सामान्यतः बसाल्ट, लाल जांभा दगड किंवा मध्यम प्रतीच ग्रॅनाइट प्रकारचा दगड वापरला जात असे. पाटीचा दगडही वापरला जाई. मालवणचा सिंधुदुर्ग तर फक्त ग्रॅनाइट दगडाचे बांधलेला आहे. पश्चिम किनारपट्टीतील बहुतेक सर्व किल्ले लाल जांभ्या दगडानेच बांधलेले आहेत. हा दगड काळवथरी दगडापेक्षा नरम असल्याकारणाने उत्तम ताशीच काम करता येत नसे. इतकेच नव्हे त्याच्या अंगभूत दोषामुळे या सर्व किल्ल्यांच्या बांधकामावर वारा-वादळे व पावसाने खूपच अनिष्ट परिणाम झाला आहे.
शिवाजील अनायासेच मालवणाचे खडकाळ बेट ग्रॅनाईट दगडाने भरलेले आढळले आणि अर्थातच आपला सिंधुदुर्ग त्याने दगडाने बांधला. पन्हाळ्याला `निळा बॅसॉल्ट' हा दगडाचा प्रकार वापरलेला आहे आणि म्हणून आजसुद्धा तो किल्ला बऱ्याच शाबूत स्थितीत आहे.
अभिजात प्रासाद वास्तुशिल्प
अठराव्या शतकाच्या आरंभापासून एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या, पेशव्यांची सत्ता असेतोपर्यंतच्या काळात, गड-किल्ल्यांऐवजी निवासासाठी मोठमोठे प्रासाद बांधण्याच्या कलेचा खूपच विकास झालेला आढळतो. सधन मराठा सरदारंनी स्वतः भव्य व टोलेजंग वाडे बांधले. त्याआधीच्या धामधुमीच्या काळात अशा प्रासादतुल्य इमारती बांधणे शक्य नव्हते आणि त्याची भरपाई जणू या काळात मराठा सरदारांनी शोभिवंत व भव्य निवासस्थाने बांधून केली.
वाडा हा शब्द केवळ राजवाडा या अर्थी वापरला जात नसून श्रीमंत, व्यापारी, सावकार इ. सधन वर्गातील लोकांच्य प्रशस्त हवेल्यांनही वाडा म्हटले जाते. किंबहुना या नवीन धाटणीच्या वास्तुशिल्पकलेच्या विकासास त्यावेळच्या सावकार वर्गाचा बराच हातभार लागत आहे.
धन्याची संपत्ती, वाड्याची जागा आणि बांधकाम साहित्य यानुसार वाड्याचा आकार आणि त्याची सजावट यात फरक आढळत असला तरी वास्तूचे एकंदर स्वरूप व रचना एकसारखी असे. नंतरच्या काळातील मराठा वाडे आधीच्या अशा वड्याहून फ़ारसे भिन्न नाहीत . बांधकाम तंत्रातील सातत्य त्यावरुन दिसून येते. वाड्यातील चौक आणि लाकडी (फ़्रेमवर्क) यातही परंपरा दिसून येते. महाराष्ट्रात बांधकामासाठी वापरलेल्या साहित्यामुळेही बांधकामाच्या परकी तंत्राच्या प्रभावाचे खास दख्खनी शैलीत रुपांतर झालेले आढ्ळते. दगडाऐवजी लाकडामधे कोरीव काम केल्यामुळे वाड्यातील तक्तपोशींना एक प्रकारची भव्यता येई. महाराष्ट्रातील बरेच वाडे सातारा, कोल्हापूर, पुणे, वाई आणि नाशिक या ठिकाणी बांधन्य़ात आएल. राज्स्थानमधील हवेलीच्या तुलनेत महाराष्ट्रातील वाडे वास्तुशिल्पकलादृष्टया साधेच आहेत. युरोपीय प्रासादांप्रमाणे या वाड्यांच्या सभोवार हिरवळ आणि बागा नाहीत किंवा मोगल प्रसादांप्रमाणे हवेशीर गच्च्या नाहीत. प्रासादासभोवार बांधलेली संरक्षक भिंत काळ्य़ पत्थराची, भाजलेल्या विटांची असे आणि तिला गवाक्षे व प्रवेशद्वारे असत. द्वाराच्या दोन्ही दरवाजांन पोलादी पत्रे बसविलेल्या जाड लाकडाची मोठी झडपे (शटर्स) असत. आणि ती विशिष्ट प्रसंगीच उघडाली जात. प्रवेशद्वारापाशी दोन्ही अंगास रक्षकाच्या जागा असत, त्यांच देवडी म्हणतात. दिवाबत्ती व शस्त्रात्रे ठेवण्यासाठीही त्यांचा उपयोग होई. या देवड्या बऱ्याचदा हनुमान, गरूड, द्वारपाल किंवा हिंदू पौराणिक कथांपैकी देवदेवतांची चित्रे काढून सुशोभित केलेल्या असत. काही वाड्यांच्या बाबतीत वाड्याबाहेर देवडी असे. उदा. पुणे येथील विश्रामबाग वाडा. बाहेरून पाहिले असता वाड्यांचा आकार चौकोनी किंव काटकोन चौकोनी असे आणि आत चौकोनी अंगणाच्या बाजूने इमारती बांधलेल्या असत. त्या मोकळ्या जागांणा चौक म्हणत.
या वाड्यांना निरनिराळ्या हेतूने एकाहून अधिक प्रवेशद्वारे असत. शनिवार वाड्याचा मस्तानी दरवाजा पहिल्या बाजीरावाची मुस्लिम प्रेयसी मस्तानी हिला खूष करण्यासाठी खास तयार केलेला होता. त्या दरवाजातून तिला पाहिजे तेव्हा प्रवेश करता येई तसेच बाजीरावाच्या इतर कुटुंबियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाण्याचेही त्यामुले टळे. अनेक प्रवेशद्वारांच्या वरील भागात कोरीव काम केलेले असे.
वाड्यांच्य आत म्हणजे चौकोनी मोकळ्या जागेछ्या सभोवार, वाड्याचे बांधकाम असे आणि अशा चौकांच्या संख्येवरून वाड्याचा मोठेपणा गणला जाई. चारचौकी, आठचौकी इ. अशा एकेका चौका भोवतालच्या दालनातून चित्रे, नक्षीकाम इ. सजावट केलेली असे. काही दालने विविक्षित कार्यासाठी म्हणजे धार्मिक समारंभ व इतर कार्यक्रम साजरे करण्यासाठी म्हणून विशेष सुशोभित केकेली असत.
श्रीमंत लोक काचेचे दिवे, हंड्या, मोमदाने, झुंबरे इत्यादी वाड्याची शोभा वाढवीत. भिंती आणि छत या ठिकाणी आरसे बसवून तयार केलेला आरसे महाल हा वाड्यातील सर्वात प्रतिष्ठेचा भाग असे. बेताची सांपत्तिक स्थिती असणारे देखील शयन दालनात किंवा बैठकीच्य दालनास तरी भिंतीवर आरसे बसविण्याची आकांक्षा बाळगीत, बऱ्याच वाड्याना अस्मानी महाल म्हणून ओळखले जाणारे एकादे दालन असे. हा भाग वाड्याचा इतर भागापेक्षा अधिक उचीचा असे. पेशव्यांच पुण्यातील शनिवार वाडा सात मजली होता व बहुतेक वाड्यांमध्ये जमिनीखाली साठवणीच्या जागा असत. तेथे शस्रास्त्रे व दारुगोळा साठवला जाई. अशा प्रकारचे सर्वांत मोठे तळघर चांदवडच्या राजवाड्यात आढळते. वाड्याच्या एकूण जोत्याएवढे त्याचे क्षेत्रफळ आहे.
दिवाणखाना, शयन दालन आणि समारंभाचे दालन यांच्या भिंतीवर तसेच पूजादालनात भारतीय महाकाव्यांतील प्रसंग चितारलेले असत, वाड्यांची रचना, चित्रकारी आणि सजावट यांतील सूक्ष्म फरकावरून वाड्याचा धनी ब्राह्मण, लढवय्या मराठा की सावकार-व्यापारी पेशाचा आहे हे समजून येई. शनिवारवाडा, रास्ते वाड, चिमणबाग इ. वाड्यांतील कारंजी मोगल प्रभाव दर्शवितात. अगदी अलीकडेपर्यंत म्हणजे पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत राहाण्याच्या जागांसाठी वाड्याचे रेखाटन व बांधणी लोकप्रिय होती.
मंदिरे
तेराव्या शतकात दख्खनमधे इस्लामी सत्ता स्थिर झाल्यावर धार्मिक वास्तुशिल्पकलेच्या अभिजात परंपरेचे पाऊल मागे पडले. सत्ताधीशांच्य विरोधी वृत्तीमुळे हिंदू धार्मिक मूर्तीचे प्रदर्शन करने अशक्य झाले. नवीन देवळे तर बांधली गेली नाहीतच. परंतु जुन्यांच्य डागडुजीकडेही पाहिजे तितके लक्ष दिले गेले नाही. पुढे तीनशे वर्षांनंतर मराठा राज्यकर्त्यांनी आपले प्रभुत्व पुनः प्रस्थापित केल्यानंतर आपल्य धर्मस्थानाचे व मंदिराचे नूतनीकरण करण्यास तसेच नव्याने बांधण्यास हिंदूनी प्रारंभ केला. मंदिर वास्तुशिल्पकलेची परंपरा पुनः पुनरुज्जीवित झाली आणि त्याच प्रत्यय मराठाकालीन मंदिरांतून येऊ लागला.
मराठाकालीन मंदिरे, इस्लामी आक्रमण येण्याआधी आस्तित्वात असलेल्या यादव परंपरेवर आधारित होती. तथापि लवकरच ही शैली. या मंदिरांचे नवीन आश्रयदाते बनलेले मराठा सैनिक व सरदार-दरकदार यांच्या अपेक्षा पुऱ्य करण्यास अपुरी पडू लागली. मराठी सत्तेच्या विस्तारामुळे मराठा सैनिक व सरदार यांनी भारताच्या निरनिराळ्या भागातील मोहिमांच्य वेळी, भिन्न भिन्न कलात्मक परंपरा पाहिल्या होत्या. आणि म्हणून त्यांच्या उदाअ आश्रयाखाली झालेल्या नवीन मंदिरांच्या बांधकामात उत्तर आणि दक्षिण भारतीय शैलींचा मिलाफ होऊन एक नवीन शैली साकार झाली.
ह्या मराठाकालीन मंदिरांची रचना साधी आढळते. चौकोनी गर्भगृह, पुढे प्रवचे-कीर्तने यासारख्या कार्यक्रमांन जमणाऱ्या लोकांन बसण्यासाठी प्रशस्त सभामंडप हे मुख्य भाग.
सभामंडप म्हणजे एक खुले प्रेक्षागृहच. शोभिवंत कोरीव काम व नक्षी काढलेल्या स्तंभावर तो उभा असतो. स्तंभ एकमेकांना कमानीनी जोडलेले असतात. हे स्तंभ व वरील छत यामुळे मंदिराच्या अंतर्भाग मोठा शोभिवंत दिसतो.
मंदिरांचा विशेष नजरेत भरणारा भाग म्हणजे निमुळता होत गेलेला कळसाच भाग. तो निमुळता होत जाताना मध्ये प्रत्येक मजला स्पष्टपणे दिसतो. प्रत्येक मजल्याच्य बाहेरील बाजूस कोनाडे व एक सोडून एक छोटे छोटे मनोरे असत. कोनाड्यातून देवादिकांच्या किंवा पौराणिक कथांतील मूर्ती असत. सर्वात वरचे टोक घुमटाकार भागातून वर आलेले असे. कळसापर्यंतच्या या बांधकामात वर म्हटल्याप्रमाणे चढत, निमुळता होत जाणारा कळस ही बाब दक्षिण भारतीय वास्तुशिल्पेतून उचललेली असावी, तर कोनाडे व मनोरे इ. कलाकुसर उत्तर भारतीय छाप सांगते.
महाराष्टातील मंदिरासमोर दीपमाळ असल्यावाचून ते पुरे होत नाही. वर निमुळाता होत गेलेला स्तंभ आणि त्याला सभोवार अंतरा-अंतराने दिवे लावण्यासाठी कोनाडे किंवा बाहेर आलेले हात यामुळे हे बांधकाम एकंदर मंदिरवास्तुशिल्पता शोभा देते. दीपमाळा बऱ्याचदा दगडांची बांधलेल्या असत तर क्वचित स्टुको या चुना-रेतीच्या गिलाव्याने मढविलेल्या असत.
काही महत्त्वाच्य मंदिरांना विस्तीर्ण आवारे असून सभोवार जाड भिंतीची तटबंदी आहे. भिंतीच्या आतल्या बाजूस कमानीदार ओवऱ्या काढलेल्या आढळतात. परगावहून येणाऱ्या यात्रेकरूना उतरण्यासाठी त्यांचा उपयोग होत असे. डोंगरमाथ्यापर्यंत अशा मंदिरांची तटबंदी मंदिराला एकाद्या किल्ल्याचे रूप देते.
बऱ्याचदा मंदिरे नदीकाठी बांधलेली आढळतात. ह्या मंदिरांसमोर नदीपर्यंत जाणाऱ्य पायऱ्यापायऱ्यांचे घाट बांधलेले घटक आहेत. वाई, टोके व नाशिक येथे मंदिरानजीक नद्यांच्या तीरावर प्रशस्त फरसबंदीही केलेली आढळते. उत्सवांच्या व जत्रांच्या दिवशी यात्रेकरूंची गर्दी उसळते तेव्हा रात्रीच्या वेळी ते दृश्य मोठे रम्य दिसते.
जे भाविक स्वतः मंदिरे बांधू शकत नसत ते देवळांच्या प्रांगणातील दीपमाळा बांधण्यासाठी धन देत. मराठाकालीन मंदिरांच्या साधेपणातील सौंदर्य हे ती बांधऱ्यांच्य सांस्कृतीक व सौंदर्यवादी मूल्यांचे प्रतीकच म्हणायला हवे.

  LEGAL PLACE ADVERTISE  
Write to: Harshad Khandare
All Rights Reserved Worldwide to OWNWAY Art & Technology Master.Harshad N Khandare.
मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारी एक अस्सल मराठमॊळी वेबसाईट © २००१ - २००८
OWNWAY Art & Technology
Channel Websites -MarathiMati™.com - MarathiMati™.net - MarathiMati.org - MarathiMati™.tv - MARATHIPATRA.com - NashikDiary.com - PUNEPRIME.com - NamdeoShimpiSamaj.org - MAHARASHTRAPRIME.com